वापरात नसलेले क्रेडिट कार्ड आणि खबरदारी

    08-May-2025
Total Views |

वापरात नसलेले क्रेडिट कार्ड आणि खबरदारी


आर्थिक व्यवहारांचे काही मर्यादित स्वातंत्र्य देणारे क्रेडिट कार्ड हे उपयुक्त माध्यम आहे. बर्‍याचजणांना एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड ठेवायलाही आवडतात. मात्र, अशाने बरेचदा नाहक खर्च वाढू शकतो. क्रेडिट कार्ड देणार्‍या बँकांनी खर्च करण्याच्या प्रवृत्तीला प्रोत्साहन देण्यासाठी क्रेडिट कार्ड बिलाचे ‘ईएमआय’ने पेमेंट करण्याची सुविधा सुरू केली आहे. पण, यासाठी प्रचंड व्याज भरावे लागते. एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड असतील आणि त्यातील काही वापरात नसतील, तर यातील एक क्रेडिट कार्ड सोडून सर्व कार्ड रद्द करणे, हेच आर्थिकदृष्ट्या शहाणपणाचे ठरते.


सध्याचा जमाना हा उपभोगवादाचा आहे. त्यामुळे ग्राहकाच्या खिशात पैसे नसतानादेखील ‘बाय नाऊ पे लेटर’ वगैरेंसारख्या योजना ग्राहकांना आर्थिक अडचणीत आणू शकतात. 2019-20 साली क्रेडिट कार्डवरील खर्च अंदाजे सात लाख कोटी रुपये होता, तर 2023-24 साली तो 18 लाख कोटी रुपये झाला. म्हणजे, त्यामध्ये सुमारे अडीच पट वाढ झाली आहे. एखाद्या व्यक्तीकडे चार ते पाच क्रेडिट कार्ड असणे सहज शक्य आहे. प्रत्येक क्रेडिट कार्डवर खर्चासाठी एक मर्यादा आहे. या मर्यादेपलीकडे खर्च करावयाचा असेल, तर एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्डचा वापर केला जातो. क्रेडिट कार्डचे देय, रक्कम, बिल भरणे जमत नसेल, तर दुसर्‍या क्रेडिट कार्डद्वारे हे बिल भरता येते. एखादे क्रेडिट कार्ड विशिष्ट कालावधीत वापरात नसेल, तर संबंधित बँक किंवा वित्तीय संस्थेकडून ते ‘डिसकन्टिन्यू’ किंवा ‘डॉर्मंट’ झाले, असे क्रेडिट कार्डधारकाला कळविले जाते. बँका ‘कार्ड इनअ‍ॅक्टिव्ह’ किंवा ‘डॉर्मंट’ करण्यापूर्वी कार्डधारकाला कळवितात. असे कळविल्यानंतरही ग्राहकाने किंवा कार्डधारकाने जर कार्ड वापरले नाही, तर काही कालावधीनंतर बँक हे कार्ड बंद करण्याचा निर्णय घेते. कार्ड बंद करण्यापूर्वी बँक सुमारे सहा महिने त्या कार्डवर एकतरी व्यवहार करा, असे मेसेज देत असते. तरीही कार्ड वापरले नाही, तर बँकेकडून कार्ड बंद केले जाते. म्हणजे कार्डचे खाते बंद केले जाते. यानंतर हे कार्ड खातेदाराला वापरता येत नाही.

क्रेडिट कार्ड हे खरेदीचे एक मोठे माध्यम आहे. याद्वारे खर्च करण्याची एक मर्यादा दिलेली असते. ती सांभाळणे किंवा त्या मर्यादेत खर्च करणे, क्रेडिट कार्डचा वापर करणे ही मोठी जबाबदारी असते.


क्रेडिट कार्डचे वार्षिक शुल्क

काही कार्डबाबत बँक वार्षिक शुल्क आकारतात. कार्ड देतानाच नियम व अटी सांगितलेल्या असतात. विविध बँकांचे कार्डबाबत वेगवेगळे धोरण असते. कार्ड वापरात नसेल, तरीही काही वेळा वार्षिक शुल्क आकारले जाऊ शकते आणि ते वेळेत द्यावी लागते. ती रक्कम दिली नाही, तर या रकमेवरही मुदत संपलेल्या दिवसापासून व्याज आकारले जाते.

वापरात नसलेल्या कार्डचे पुनरुज्जीवन

वापरात नसलेले कार्ड पुन्हा सुरू करायचे असेल, तर बँकेशी संपर्क करून आवश्यक त्या बाबींची पूर्तता केल्यावर कार्ड पुन्हा सुरू करता येते. काही बँका यासाठी वेगळे शुल्क आकारतात.

कार्डचा गैरवापर होण्याची शक्यता

वापरात नसलेले कार्ड सुरक्षितपणे आणि गरज पडली तर तातडीने उपलब्ध होईल, अशा ठिकाणी ठेवावे. काही वेळा अशा कार्डकडे दुर्लक्ष होते. या कार्डचे तपशील जर कोणाला कळले, तर या कार्डचा गैरवापर होऊ शकतो. सायबर चोर इतके निष्णात आहेत की, अशा वापरात नसलेल्या कार्डचा तपशील हे चोरटे विविध क्लृप्त्या करून मिळवून अशा कार्डवर खरेदीदेखील करतात. बँकेच्या येणार्‍या प्रत्येक मेसेजवर लक्ष ठेवावे. गैरव्यवहाराचा मेसेज आला, तर बँकेला लगेच कळवावेे आणि कार्ड ब्लॉक करावे.

रिवॉर्ड पॉर्ईंट्सबाबत

आजकाल सर्वच कार्डवर, खरेदीवर ‘रिवॉर्ड पॉईंट्स’ मिळतात. ठराविक ‘रिवॉर्ड पॉईंट’ जमले की, बँकेच्या धोरणानुसार किंवा सेवा रिवॉर्ड बदल्यात मिळतात. क्रेडिट कार्डचा वापर करून खरेदी करण्यासाठी हे एक आकर्षण असते. वापरात नसलेल्या क्रेडिट कार्डवरील पॉईंट काही वेळा रद्द होऊ शकतात आणि कार्डधारकाचे याबाबत नुकसान होऊ शकते. वापरात नसलेल्या क्रेडिट कार्डवर बँकांचे लक्ष असते. एखाद्या व्यक्तीचे क्रेडिट कार्ड बर्‍याच काळापर्यंत वापरात नसेल, तर बँक एक खबरदारीचा उपाय म्हणून अशा कार्डवरील खर्चाची मर्यादा कमी करू शकतात. हा उपाय बँकांची जोखीम कमी करतो.

क्रेडिट कार्ड आर्थिक व्यवहारांचे काही मर्यादित स्वातंत्र्य देणारे उपयुक्त माध्यम आहे. परंतु, ते जपून वापरावे लागते. कारण, क्रेडिट कार्ड असेल, तर अनावश्यक भरमसाठ खर्च होऊ शकतो. तसेच एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड असतील, तर खर्च आणखी वाढू शकतो. आजकाल क्रेडिट कार्ड देणार्‍या बँकांनी खर्च करण्याच्या प्रवृत्तीला प्रोत्साहन देणार्‍या योजना आखल्या आहेत. पण, कायम आपल्या आर्थिक मर्यादेत राहून खर्च करावा म्हणजे तो भविष्यात बोजा होणार नाही.

गुंतवणुकीत सातत्य हवे


कोणीही कशातही आर्थिक गुंतवणूक केली किंवा करताना त्यात जोखीम किती आहे, याचा विचार गुंतवणूकदार नेहमीच करतातच असे नाही. यामुळे गुंतवणूकदार अडचणीत येऊ शकतो. एखादी योजना आपल्याला 20 टक्के व्याज देणारी आहे, म्हणून जर कोणी गुंतवणूक करीत असेल, तर हा गुंतवणूकदार या योजनेत असलेल्या जोखमीचा विचार करीत नसावा. जर सरकारी व्याजदर सात टक्के असेल आणि कोणी 20 टक्के देण्याची हमी देत असेल, तर हे अंतर परतावा देणारी व्यक्ती कशी भरून काढणार याचा गुंतवणूकदार विचार करीत नाही. गुंतवणूक, बचत, शेअर बाजार, म्युच्युअल फंड या सर्वांचा विचार करता, बाजारात नित्य होणारे बदल, परिवर्तन यांचे काय, असा प्रश्न सर्वांना पडत असतो. पण, त्याचा आपण फारसा विचार करू नये. कारण, शेअर बाजारावर अनेक घटना, घटकांचा प्रभाव पडत असतो. देशातील किंवा देशाबाहेरील अनेक कारणांमुळे बाजारात अस्थिरता निर्माण होते. या अस्थिरतेचा परिणाम आपल्या कमाईवर, आपण ज्यात गुंतवणूक करतो त्यावर होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. बाजार गडगडले की, गडबडीने आपली गुंतवणूक काढून घेतली, तर गुंतवणूकदारांचे नुकसान होऊ शकते. हे नुकसान टाळण्यासाठी धीर धरला पाहिजे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, जो बाजार आज पडला तो आणखी चार दिवासांनी वर जाणारच आहे. हे लक्षात ठेवले तरच चढलेल्या बाजाराचा फायदा घेता येऊ शकतो. अस्थिरता, चंचलता असलेल्या परिवर्तनशील बाजारपेठेत तुम्ही शांत राहून गुंतवणूक करीत राहिले पाहिजे.

भारतच नाही, तर इतर कोणत्याही देशाच्या आर्थिक स्थितीचा अभ्यास केल्यानंतर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल, ती म्हणजे संपत्ती ही दीर्घकाळ निरंतर गुंतवणूक केल्याने निर्माण होत असते. बाजारपेठ अस्थिर असली तरीही अनेक बाबी कायम राहणार्‍या असतात, त्यामुळे पैसा वाढत असतो. आपल्या देशाचा विचार केला, तर आगामी दशकामध्ये भारताची अर्थव्यवस्था वाढणारच हे नक्की! गुंतवणूक का करावी? असा प्रश्न बर्‍याच जणांना पडतो. पैशाची क्रयशक्ती कमी कमी होत जाते, जर तुम्हाला इंजिनिअर होण्यासाठी लाख-दीड लाख रुपये खर्च आला असेल, तर आज पहिलीतल्या विद्यार्थ्यासाठी लाख-दीड लाख रुपये भरावे लागतात. पूर्वी आजारपणात काही हजार रुपयांत उपचार होत. आता रुग्णालयाचे बिल काही लाखांमध्ये येतात. हे खर्च महागाईमुळे वाढते. त्यामुळे ज्या दराने महागाई वाढते, निदान त्या दराने परतावा मिळणार्‍या योजनांत गुंतवणूक करावी. निवृत्तीनंतर कर्ज मिळत नाही म्हणून निवृत्तीनंतरच्या जीवनासाठी गुंतवणूक ही करावयासच हवी.

गुंतवणूक करण्यासाठी अनेक पर्याय आहेत. शेअर, म्युच्युअल फंड, सोने, स्थावर मालमत्ता, मुदत ठेवी वगैरे वगैरे. 2014 सालापासून म्युच्युअल फंड हा पर्याय झपाट्याने गुंतवणूकदार प्रिय झाला. यापूर्वी शेअर बाजार वधारला की सोन्याच्या भावात विशेष वाढ होत नव्हती. मात्र, गेल्या दोन वर्षांत सोने व शेअर बाजार दोन्हीही वधारलेलेच आहेत. आता भारतीय शेअर बाजारातील चढ-उतार परदेशी गुंतवणूकदारांवर अवलंबून नाहीत. दरमहा नियमित ‘एसआयपी’ करणार्‍या गुंतवणूकदारांच्या भरवशावर सर्व उलाढाल होत आहे. काही वर्षांपूर्वी काही हजार गुंतवणूकदार ‘एसआयपी’ करीत होते. आता ‘कोविड’नंतर या गुंतवणूकदारांची संख्या कोट्यवधी झाली आहे. अनेक पटींनी गुंतवणूक वाढली आहे. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक सेफ्टी, लिक्विडिटी, रिटर्न्स टॅक्स इफिशिअन्सी व ट्रान्सपरन्सीयुक्त असल्यामुळे, म्युच्युअल फंडांकडे फार मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक घेत आहे. याचा विपरीत परिणाम बँकांवर झाला असून, बँकांच्या ठेवींचे प्रमाण कमी होत चालले आहे. आतापर्यंत परदेशी कंपन्या आपले बाजार चालवत होत्या. आता ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पना रूढ होत असल्यामुळे आपत्ती अर्थव्यवस्था आपणच चालवत आहोत. भविष्यात याचा लाभ आपल्याला मिळेल.

शशांक गुळगुळे