भारतावर भयानक दहशतवादी हल्ले होऊनही केंद्रातील काँग्रेस सरकारने त्याविरोधात पाकिस्तानवर कारवाईचे धाडस दाखवले नाही. भारतावर जागतिक महासत्तांचा दबाव असल्याची सबब मनमोहन सिंग यांनी पुढे केली. पण, काँग्रेस सरकारवर जागतिक महासत्तांचा नव्हे, तर देशातील मुस्लीम मतपेढीचा दबाव होता, हे आज स्पष्ट झाले, अन्यथा मोदी सरकारने तीन-तीनदा पाकिस्तानवर लष्करी कारवाई करूनही कोणत्याच देशाने किंवा अमेरिकेनेही भारतावर दबावापोटी निर्बंध कसे लादले नाहीत?
पहलगाममधील निरपराध हिंदू पर्यटकांच्या हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी भारताने पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून जो दुबळा प्रतिकार होत आहे, हे पाहता या संघर्षाला ‘युद्ध’ म्हणणे ही अतिशयोक्ती होईल. भारताच्या सामर्थ्याचा विचार करता त्याच्यासाठी ही तर लुटुपुटूची लढाई आहे, असेच म्हणावे लागते. लुटुपुटूची असली, तरी भारत सरकारने त्यासाठी पूर्ण जय्यत तयारी केली आहे. ही तयारी केवळ सामरिक साहित्याची नव्हे, तर राजनैतिक डावपेचांचीही आहे. म्हणूनच भारताच्या जबरदस्त लष्करी हल्ल्यानंतर जगातील एकाही देशाने भारतावर टीका केलेली नाही किंवा ही कारवाई तत्काळ थांबविण्याचे आवाहन केलेले नाही. पाकिस्तान हा जगात पूर्णपणे एकाकी पडला आहे. हे कसे घडले?
आधुनिक काळात युद्ध हे केवळ रणभूमीवर खेळले जात नाही, तर ते विविध देशांच्या परराष्ट्र खात्यांमध्ये आणि विदेशी राजदूतांच्या कार्यालयांमध्येही खेळले जाते. त्याला ‘राजनैतिक डावपेच’ किंवा ‘मुत्सद्देगिरी’ म्हणतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अशा राजनैतिक डावपेचांमध्ये कसलेले योद्धे आहेत, हे आतापर्यंत अनेकदा सिद्ध झाले. त्यांच्या यशात त्यांचे प्रामाणिक हेतू आणि निखळ राष्ट्रप्रेम आहे, हे परदेशातील शासकांच्याही लक्षात आले. मोदी हे आपला अहंकार कुरवाळण्यासाठी किंवा देशांतर्गत विरोधकांवर राजकीय कुरघोडी करण्यासाठी लष्करी कारवाई करीत नसतात, हे जगाने पाहिले. पाकिस्तानशी चार युद्धे खेळल्यावरही भारताने सिंधू पाणीवाटप करार स्थगित केला नव्हता. यावेळी मात्र भारताच्या सहनशक्तीचा अंत झाल्यामुळे त्याने हा करार स्थगित केला असून, झेलम आणि चिनाब नद्यांचे पाणी रोखून धरल्याने पाकिस्तानात खळबळ माजली.
भारतावर दहशतवादी हल्ले हे केवळ मोदी यांच्या काळातच झाले, असे नव्हे. पूर्वी संपुआच्या सरकारमध्ये तर दि. 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर जो दहशतवादी हल्ला झाला, तो आजवरचा सर्वांत भीषण हल्ला होता. पण, तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग सरकारने त्या हल्ल्यास प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानवर लष्करी कारवाई केली नव्हती. किंबहुना, तत्कालीन हवाई दलप्रमुख फली मेजर यांनी आपली फौज पाकिस्तानवर कारवाई करण्यास सज्ज आहे, असेही त्यांना कळविले होते. पण, मनमोहन सिंग यांनी तसा आदेश काही दिला नाही. पाकिस्तान हा अण्वस्त्रसज्ज देश असल्याने त्यावर लष्करी कारवाई करून अणुयुद्धाचा धोका निर्माण करण्याविरोधात भारतावर जागतिक समुदायाचा दबाव आहे, अशी सबब त्यांनी दिली होती. पण, आजही त्या वस्तुस्थितीत काहीच फरक पडलेला नसताना मोदी यांनी तीन-तीनदा पाकिस्तानवर लष्करी हल्ले चढविलेच ना? त्यामुळे सिंग सरकारवर जागतिक समुदायाचा नव्हे, तर भारतातील अल्पसंख्याकांच्या मतपेढीचा दबाव होता, ही गोष्ट आता स्पष्ट झाली आहे. परंतु, मोदी यांच्यावर कोणत्याच मतपेढीचा दबाव नाही. असलाच तर देशहिताचाच दबाव असल्याने त्यांनी पाकिस्तानला जोरदार तडाखा दिला आहे.
मोदी यांना अमेरिकेनेच नव्हे, तर बहुसंख्य मुस्लीम देशांनीही पाठिंबा दिला. त्यामागे मोदी यांनी पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांचे सादर केलेले भरभक्कम पुरावे आहेत. सौदी अरेबिया असो की संयुक्त अरब अमिरात, या सर्व मुस्लीम देशांनी भारताविरोधात एक शब्दही काढलेला नाही. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी या कारवाईच्या दोन दिवस आधी मोदी यांना फोन करून त्यांना हवा तो निर्णय घेण्यास पाठिंबा दिला होता. मोदी यांना जगभरातून मिळालेल्या या व्यापक पाठिंब्यामागे त्यांची ही मुत्सद्देगिरी आहे. मोदी परदेशात भटकतात, असा आरोप करणार्या संकुचित दृष्टीच्या विरोधकांना त्या ‘भटकण्या’मागील खरा हेतू अजूनही उमगलेला नाही. मोदी यांनी अनेक देशांशी सलोख्याचे संबंध राखले आहेत. काही देशांच्या राष्ट्रप्रमुखांशी तर त्यांनी वैयक्तिक सौहार्दाचे संबंध राखले असून, त्यामागे भारताच्या हितसंबंधांची जपणूक करणे हाच हेतू आहे. अनेक देशांना त्यांनी त्यांच्या संकटकाळात सढळ हस्ते मदत केली. तुर्कीयने आता आपली एक युद्धनौका पाकिस्तानात आणून उभी केली. पण, दोन वर्षांपूर्वी सीरिया, तुर्कीय या देशांमध्ये झालेल्या भीषण भूकंपानंतर सर्वप्रथम भारतानेच तुर्कीयेला मदत पाठविली होती. यावरून त्या देशाच्या शासनकर्त्यांची मानसिकता दिसून येते. काही वर्षांपूर्वी आलेल्या ‘कोविड’च्या साथीत तर भारताने अनेक देशांना औषध आणि लसपुरवठा करून वाचविले होते. त्यात काही विकसित देशांचाही समावेश आहे.
हे सारे करताना मोदी यांचा उद्देश स्पष्ट होता. परराष्ट्र धोरणात भारताने ‘वसुधैव कुटुम्बकम्’ हे तत्त्व स्वीकारले. भारतात झालेल्या ‘जी 20’ देशांच्या बैठकीचीही तीच मध्यवर्ती संकल्पना होती. मोदी यांनी पाकिस्तानकडून दहशतवादाला पोसण्याचे भरभक्कम पुरावे संयुक्त राष्ट्रांना आणि अन्य देशांनाही सादर केले होते. त्यामुळे जागतिक मत पाकिस्तानच्या विरोधात गेले. आज पाकिस्तान सार्या जगात एकाकी पडला, त्यामागे मोदी सरकारचे हे राजनैतिक प्रयत्नच कारणीभूत आहेत. भारताच्या निरपेक्ष आणि सात्विक हेतूंबद्दल जगाची खात्री आहे. पाकिस्तानला धडा शिकविण्यास भौगोलिकदृष्ट्या भारतच सक्षम आहे, हे जगालाही शतप्रतिशत पटलेले. भारत आपल्या सामर्थ्याचा वापर पाकिस्तानी भूमी बळकाविण्यासाठी किंवा त्या देशाला नष्ट करण्यासाठी करणार नाही, याचीही खात्री जगाला आहे. म्हणूनच भारताकडे शक्तिशाली अण्वस्त्रे असतानाही पाकिस्तानवर सलग दोन दिवस केलेल्या लष्करी हल्ल्यांनंतरही जग शांत आहे.
पाकिस्तान हा अण्वस्त्रसज्ज देश आहे, त्या देशात लष्करशहांची हुकुमशाही आहे आणि हे लष्कर रोग म्हणजे कुटिल प्रवृत्तीचे आहे, हे सारे ठाऊक असूनही मोदी यांनी पाकिस्तानवर बेधडक लष्करी कारवाई केली. केवळ नियंत्रण रेषाच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय सरहद्द ओलांडून पाकिस्तानच्या मुख्य भूमीवरही हल्ले केले. इतके होऊनही कोणत्याच देशाने भारतावर ना टीका केली, ना त्याला आपल्या लष्करी कारवाईवर नियंत्रण आणण्याचे आवाहन केले. भारतही अण्वस्त्रसज्ज देश आहे. तरी भारताकडून या शक्तीचा वापर प्रथम केला जाणार नाही, याचा विश्वास जागतिक समुदायाला होता. हे यश मोदी आणि परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्या राजनैतिक डावपेचांचेच!