नवी दिल्ली : (Rajnath Singh on Operation Sindoor) पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू-काश्मीरमधील ९ दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केला. या लष्करी कारवाईनंतर गुरुवार दि. ८ मे रोजी सरकारने केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक पार पडली आहे. या बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मोहिमेची माहिती देताना ऑपरेशन सिंदूरमध्ये जवळपास १०० अतिरेकी मारले गेल्याचीही माहिती दिली.
"ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू आहे"
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सर्वपक्षीय बैठकीत सांगितले की, "ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू आहे. त्यामुळेच यासंबंधित महत्त्वाची माहिती उघड करता येत नाही. जर पाकिस्तानने आगळीक केली, तर भारताकडून पुन्हा उत्तर दिले जाईल." तसेच माहितीनुसार, सदर मोहीम संवेदनशील असल्यामुळे याव्यतिरिक्त केंद्र सरकारकडून अतिरिक्त माहिती देण्यात आलेली नाही.
१०० दहशतवाद्यांचा खात्मा
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत ऑपरेशन सिंदूरच्या यशाची माहिती देताना म्हटले की, या एअर स्ट्राईकमध्ये भारतीय सैन्याकडून १०० दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत केलेल्या यशस्वी कारवाईबद्दल त्यांनी भारतीय लष्कराचे कौतुक केले.