'ऑपरेशन सिंदूर’नंतर सीमेवर पाकिस्तानकडून गोळीबार! नागरिकांसाठी गृहमंत्र्यांनी जारी केले महत्वाचे निर्देश
07-May-2025
Total Views |
श्रीनगर : (Firing in Jammu and Kashmir) भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमध्ये नऊ दहशतवादी तळांना उध्वस्त केल्याने काही तासांतच पाकिस्तानकडून उत्तरादाखल गोळीबार करण्यात आला. २२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीर (पीओके) मध्ये मंगळवार दि. ६ मे रोजी नऊ दहशतवादी ठिकाणावर उध्वस्त केल्यानंतर काही तासांतच पाकिस्तानने जोरदार गोळीबार केला.
‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारताने सीमापार केलेल्या हवाई हल्ल्यांनंतर बुधवार, दि.७ मे रोजी नियंत्रण रेषा (एलओसी) जवळ तणाव होता. पाकिस्तानी सैन्याने बेछुट गोळीबार केला. त्यामुळे सीमावर्ती भागातील १० नागरिकांचा मृत्यू झाला आणि ३३ जण जखमी झाले आहेत. या नंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सीमावर्ती भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे आदेश दिले आहेत.अमित ह हे सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक दलजित सिंग चौधरी, जम्मू आणि काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा आणि मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्याशी सतत संपर्कात आहेत, परिस्थितीवर लक्ष ठेवून जलद कारवाईचे निर्देश दिले आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार भारतीय सैन्याने पाकिस्तानी गोळीबाराला त्वरित प्रत्युत्तर दिले, कुपवाडा आणि राजौरी-पूंछ सेक्टरमधील अनेक पाकिस्तानी लष्करी चौक्यांवर मोठे नुकसान झाले आणि दुसऱ्या बाजूला मोठ्या प्रमाणात लष्करी जीवितहानी झाल्याचे वृत्त आहे. अजुन पण जोरदार तोफगोळ्यांचा मारा सुरूच आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, रक्षा मंत्री राजनाथ सिंह आणि तिन्ही दलाचे प्रमुख जम्मू आणि काश्मीर प्रत्येक घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत, असे संबधित अधिकाऱ्यांनी सांगितले.