- भारताचे ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वी, पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचा खात्मा
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींनी दिली माहिती
07-May-2025
Total Views |
नवी दिल्ली: ( india Operation Sindoor is successful ) विशेष प्रतिनिधी भारतीय लष्कर, हवाईदल आणि नौदलाने “देव मस्तकी धरावा, अवघा हलकल्लोळ करावा” या उक्तीप्रमाणे गुरुवारी पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू – काश्मीरमधील (पीओजेके) ९ दहशतवादी तळांवर ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे अचूक हल्ले करून दहशतवाद्यांचा खात्मा केला. ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे पहलगाम हल्ल्यात आपल्या प्रिजजनांना गमाविलेल्या हिंदूंचे अश्रू मोदी सरकारने पुसले आहेत.
जम्मू – काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात शोक आणि संतापाचे वातावरण होते. पाकपुरस्कृत दहशतवाद्यांनी पहलगाम येथील पर्यटकांना त्यांचा धर्म हिंदू असल्याने ठार केले होते. त्यानंतर “मोदी सरकारने पाकला आता धडा शिकवायलाच हवा” अशी जनभावना तीव्र होती. केंद्र सरकारनेदेखील पाकविरोधात तत्काळ राजनयिक कारवाई करून सिंधू जल करार रद्द केला होता. त्याचप्रमाणे पाक नागरिकांचे व्हिसादेखील रद्द करून व्यापारही थांबवला होता. त्यानंतर अखेर संपूर्ण देश ज्याची वाट पाहत होता, ती घटना ६ तारखेच्या मध्यरात्री घडली.
भारतीय सैन्यदलांनी ऑपरेशन सिंदूर’ राबवून पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीर मध्ये दहशतवादी तळांवर हल्ले केले, जेथून भारतावर हल्ला करण्याचा कट आखण्यात आला होता आणि त्याची अंमलबजावणी करण्यात आली. यामध्ये पीओजेकेमधील ४ आणि पाकमधील ५ असे एकूण नऊ दहशतवादी तळांवर हल्ले करण्यात आले असून त्यामध्ये अनेक दहशतवादी ठार झाले आहेत. विशेष म्हणजे या ऑपरेशनमध्ये दहशतवादी मसूद अझहरच्या १४ नातेवाईकांचाही खात्मा झाला आहे.
भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारतीय सुरक्षादलांनी पीओजेकेमधील मुझफ्फराबादमधील सवाई नाला आणि सैदना बिलाल, कोटली येथील गुलपूर आणि अब्बास आणि भिंबेरमधील बरनाला हे ५ दहशतवादी तळ उध्वस्त केले. त्याचप्रमाणे पाकमधील बहावलपूर येथील जैश ए मोहंमदचे मुख्यालय, मुरिदके, सरजाल आणि मेहमूना जोया हे चार दहशतवादी तळ उध्वस्त केले आहेत.
भारताच्या कारवाईनंतर पाकमध्ये घबराट उडाली आहे. कारण, भारताने बहावलपूरसारख्या आंतरराष्ट्रीय सीमेपासून १०० किमी आत असलेल्या ठिकाणावरही भारतीय सैन्यदलांनी अचूक हल्ला घडवून दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. यामागील संदेशामुळे पाकचे राजकीय आणि सैन्य नेतृत्व धक्क्यात आहे. मध्यरात्रीनंतर अचानक झालेल्या या कारवाईमुळे पाक आणि पीओजेकेमध्ये मरणकळा पसरली आहे. भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईमुळे पाकिस्तान हादरलेल्या पाकिस्तानी लष्कराने पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्याकडून कारवाई करण्याची सूट मागितल्याचा दावा केला आहे.
कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी दिली माहिती
पहलगाम येथे इस्लामी दहशतवाद्यांनी हिंदू पर्यटकांना लक्ष्य केले. त्यातही केवळ पुरुषांना लक्ष्य करून महिलांना सूचक इशारा देण्यात आला होता. या हल्ल्यात आपल्या पतीस गमावलेल्या भगिनींना न्याय देण्यासाठीच या कारवाईचे नाव ‘ऑपरेशन सिंदूर’ ठेवण्यात आले होते. त्याचप्रमाणे ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती भारतासह संपूर्ण जगास देण्याची जबाबदारी भारतीय लष्करातील कर्न सोफिया कुरेशी आणि हवाईदलातील विंग कमांडर व्योमिका सिंह यांच्यावर सोपविण्यात आली होती. याद्वारे मानसिक युद्धात पाकला आणखी एक धक्का भारताने दिला आहे.
पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेतली भेट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली आणि त्यांना ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती दिली, ज्यामध्ये भारतीय सशस्त्र दलांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी तळांवर अचूक हल्ले केले