मुंबई : 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने मंगळवारी मध्यरात्री पाकिस्तानमधील ९ दहशतवादी तळांवर हल्ला करीत दहशतवाद्यांचा खात्मा केला. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, आता कोणाला पुरावा मागण्याकरता जागा राहिलेली नाही, अशी प्रतिक्रिया दिली.
बुधवार, दि. ७ मे रोजी मंत्रालयात १०० दिवसांच्या सुधारणा कार्यक्रमातील विजेत्यांच्या गुणगौरव सोहळ्यात ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्यमंत्री फडणवीस यांनी तिन्ही लष्करी दले, केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 'ऑपरेशन सिंदूर'बद्दल अभिनंदन केले. ते म्हणाले, "भारतीय सैन्याने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे की, हा नवीन भारत आहे, जो हल्ला सहन करणार नाही. 'ऑपरेशन सिंदूर' हे नावच पुरेसे बोलके आहे. पाकिस्तान येथील दहशतवाद्यांचे ९ अड्डे अचूकपणे एअर स्ट्राईक करून पूर्णतः उद्ध्वस्त केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सर्व देशवासीयांचे मन:पूर्वक अभिनंदन!
'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत एअर स्ट्राईक करून भारतीय लष्कराने दहशतवाद्यांचे ९ अड्डे उद्ध्वस्त केले आणि या हल्ल्याचे चित्रिकरण देखील केले आहे. त्यामुळे कोणाला पुरावा मागण्याकरता जागा राहिलेली नाही. मला असे वाटते की, आपल्यावर झालेल्या हल्ल्याचा भारताने योग्य पद्धतीने बदला घेतला आहे. विशेषत: ऑपरेशन सिंदूर हे नाव अतिशय बोलके आहे, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“गेल्या १३ ते १४ दिवसांत जगातील अनेक देशांबरोबर संपर्क करून पहलगामच्या घटनेत पाकिस्तान कसा दोषी आहे? याचे पुरावे भारताने दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, राजनाथ सिंह यांनी विविध देशांबरोबर चर्चा करून पाकिस्तानने कशा प्रकारे हल्ला केला हे जगाला देखील सांगितले आहे. त्यामुळेच आज संपूर्ण जग भारताबरोबर आहे. पाकिस्तानच्या उत्तरेपासून ते दक्षिणेपर्यंत सगळीकडील दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट करण्याचे काम भारतीय लष्कराने केले आहे”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.