पाकिस्तानचा झेंडा पायदळी तुडवू नये, म्हणून भारतातच भारतीयांशी भांडण-वाद करणार्या काही मुस्लीम महिला दिसल्या. कोण आहेत या? यांना पाकिस्तानचा इतका पुळका आहे, तर त्या भारतात का राहतात? या महिलांवर भारत सरकारने तत्काळ कारवाई करणे गरजेचे आहे. पदरातले निखारे नव्हे, तर देशाला पोखरणार्या मानवीरूपातील वाळवी आहेत या बायका! असे हे लोक!
भारतात राहायचे, भारताचे खायचे आणि यांच्या निष्ठा पाकिस्तानशी! संविधानाने अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे; पण ते इतकेही नाही की देशाअंतर्गत कुणी व्यक्ती शत्रूराष्ट्राशी निष्ठा राखेल. देशभरातल्या घटना आणि मुख्यतः विलेपार्लेमधली घटना तर धक्कादायकच. ती बुरखाधारी महिला पाकिस्तानी झेंड्याच्या सन्मानासाठी कासाविस झाली. तिथे उपस्थित भारतप्रेमी नागरिकांशी ती वाद घालत होती. कुठून येते इतकी हिंमत? महिला आहे आणि त्यातही अल्पसंख्याक महिला आहे, त्यातही बुरखाधारी, या सगळ्याच्या आड तिचे शत्रूराष्ट्र प्रेम आणि त्याअर्थाने देशद्रोहीपण कसे आणि का खपवून घ्यायचे? आता यावर काही तथाकथित पुरोगामी लोक म्हणतील, “तिने दुसर्या देशाच्या झेंड्याचा सन्मान केला. आपल्या तिरंग्याचा अपमान तर केला नाही ना? मग ती देशद्रोही कशी?” पण, हा असा विचार करणार्या लोकांना प्रश्न आहे की, या असल्या लोकांच्या निष्ठा आणि प्राथमिकता काय असतील? भारत की पाकिस्तान? तसेच कुणी म्हणेल की, “त्या महिला मानवतावादी असू शकतात, त्यांना हिंदू-मुस्लीम वाद नको असतील.” पण, पहलगाममध्ये पत्नी आणि लहान मुलांसमेार 26 लोकांची हिंदू आहेत म्हणून हत्या करण्यात आली. तेव्हा या बायकांचा, या लोकांचा मानवतावाद मेला होता का? रस्त्यावर उतरून निषेध तर सोडाच, पण साधा शाब्दिक निषेध तरी यांनी केला होता का?
उत्तर आहे नाही! याचाच अर्थ त्यांना केवळ आणि केवळ त्यांचा ‘जिहाद’ प्यारा आहे. त्यापुढे देश आणि मानवता यांचे काही देणेघेणे नाही. त्यामुळेच भारतात राहणार्या या पाकिस्तानप्रेमींवर कठोर कारवाई व्हायलाच हवी. कायदा-सुव्यवस्था काय करायचे ते करेल. पण, भारतीयांनी आता या अशा लोकांचा चांगला समाचार घ्यायला हवा. किती काळ सहिष्णूतेच्या नावाने देशातल्या या शत्रूंंचा पाहुणचार करायचा?
‘हे’ यश असते का?
म्हाला जिंकायचे होते म्हणून आम्ही कपडे उतरवले. त्यात ‘हाऊस अरेस्ट शो’चे होस्ट एजाज खान यांचा दोष नाही. त्याला का ट्रोल करता,” असे नुकतेच या शोमध्ये सहभागी असलेल्या सारिका साळुंखे हिने म्हटले आहे. वा! जिंकायचे होते म्हणून समाजमाध्यमांवर कपडे उतरवण्यात काहीही गैर नाही, असे तिला वाटते. जणू ‘उल्लू’ अॅपवरची ती ‘हाऊस अरेस्ट’ शो जिंकणे म्हणजे दिग्विजयच करणे की काय? कुठून येते ही मानसिकता? शरीर स्वतःच्या मालकीचे आहे. पण, त्या शरीराचे प्रदर्शन करून तुटपुंजी प्रसिद्धी पदरात पाडण्याचे प्रशिक्षण या असल्या लोकांना कुठून मिळत असेल? देहविक्री करणार्या महिलांना अनेकदा पर्याय नसतो म्हणून त्या स्वतःच्या देहाचा बाजार मांडतात. पण, कुठच्या तरी शोमध्ये स्वतःच्या देहाचा असा बाजार मांडणार्या महिलांना आणि पुरुषांनाही काय म्हणायचे?
कोणते कपडे घालावे किंवा घालू नये, हा सर्वस्वी वैयक्तिक निर्णय असला, तरीसुद्धा समाजभान आणि आत्मसन्मानही महत्त्वाचा. अंग उघडे-नागडे दाखवून जर जगात मान्यता मिळत असती, तर ती कुत्र्या-मांजरींना आणि तमाम पशू-पक्ष्यांना मिळाली असती, कारण ते कपडे घालत नाहीत. पण, माणसाने कपड्यांचा शोध ज्या कारणासाठी लावला, ते कारण चिरंतन आहे. त्यामागची जी भावना आहे, तीच माणूस आणि पशूमधील भेद ठरवण्यास पुरेशी आहे. तसेही वैयक्तिक अंगप्रदर्शन करणार्यांना काय वाटते की, देवाने इतरांपेक्षा त्यांना काही वेगळे शरीर दिले का?
असो. सारिका साळुंखे ज्याचे समर्थन करते, त्या शोचा होस्ट एजाज खानवर नुकतेच एका महिलेने बलात्काराचा आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. ‘हमारे मैं चार शादी होती हैं।’ असे म्हणत आणि शोमध्ये संधी देतो, असे आश्वासन देत म्हणे त्याने तिला भुलवले. तिच्यावर बलात्कार केला. हे खरे असेल तर एजाज गुन्हेगार आहेच. पण, त्या महिलेच्या बाबतीत काय म्हणावे, तिची फसवणूक? अज्ञान? स्वार्थ की काय? थोड्याशा फायद्यासाठी धर्म, संस्कृती, स्वत्व यांना सोडणारी स्त्री काय किंवा पुरुष काय, यांची मानसिकता अशी का होत असेल? यश मिळवायचे आहे, पण त्या यशाची किंमत आपल्या शरीरासोबत आत्म्याचा बाजारही असेल, तर हे यश खरेच यश असते का?