Operation Sindoor : "मीही मेलो असतो तर बरं झालं असतं", भारताच्या हवाई हल्ल्यात संपूर्ण कुटुंब ठार झाल्यानंतर अझहरची प्रतिक्रिया

    07-May-2025   
Total Views |

JeM terrorist Masood Azhar first reaction after indias air strike against pakistan under operation sindoor
 
मुंबई : (Operation Sindoor) ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने केलेल्या हवाई हल्ल्यात जैश-ए-मोहम्मद (JeM) या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मसूद अझहरच्या कुटुंबातील १४ जण ठार झाल्याची माहिती समोर येत आहे. या हल्ल्यानंतर मसूद अझहरची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
 
 
"भारताने केलेल्या हल्ल्यात मी ही मेलो असतो तर बरं झालं असतं"
 
बहावलपूर हे मसूद अझहरचे मूळ गाव असून भारताने केलेल्या एअर स्ट्राइकमध्ये त्याची पत्नी, मुलगी, भाऊ-बहिणींसह संपूर्ण कुटुंब ठार झाल्याची माहिती आहे. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यानंतर मसूद अझहर याने निवेदन प्रसिद्ध करून दावा केला आहे की बहावलपूरमध्ये भारताच्या हवाई हल्ल्यात त्याच्या कुटुंबातील १० सदस्य ठार झाले आहेत. दरम्यान, मसूद अजहरचे एक वक्तव्य समोर आले आहे. "भारताने केलेल्या हल्ल्यात मी ही मेलो असतो तर बरं झालं असतं', असं मसूद अजहरने म्हटले आहे.
 
 
 
अझहरचा मदरशा 'मरकज सुभानअल्लाह' उद्ध्वस्त
 
भारताने केलेल्या एअर स्ट्राइकमध्ये मसूद अझहरचा भाऊ रौफ अजहरसुद्धा मारल्या गेल्याची माहिती आहे. भारतीय लष्कराने बहावलपूरमधील मसूद अजहरच्या मदरशाला लक्ष्य केले. बहावलपूरच्या या मदरशावर चार क्षेपणास्त्रे डागण्यात आली. ज्यामुळे हा संपूर्ण परिसर उद्ध्वस्त झाला आहे. या मदरशाचे नाव मरकज सुभानअल्लाह आहे. हा परिसर जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे मुख्यालय म्हणून ओळखले जात होते. बहावलपूरमधील हा मदरसा जैशचा प्रमुख मौलाना मसूद अझहरसह इतर अनेक दहशतवाद्यांचंही घर होते. गेल्या तीन दशकांपासून या मदरशात दहशतवादी प्रशिक्षण शिबिरं सुरू आहेत.
 
कोण आहे मसूद अजहर?
 
मौलाना मसूद अझहर हा जैश-ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख आहे. २०१९ मध्ये भारतातील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी जैश-ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनेने घेतली होती .पुलवामाच्या हल्ल्यात भारताचे ४० हून अधिक सैनिक शहीद झाले होते.पठाणकोटमधील दहशतवादी हल्ला घडवून आणण्याचा आरोपही मसूद अजहरवर होता . संयुक्त राष्ट्रांनी जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केलेला जैश ए मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहर आयएसआयने २००१ मध्ये संसदेवर केलेल्या हल्ल्याचा तसेच पुलवामा हत्याकांडासह भारतावर झालेल्या अनेक दहशतवादी कारवायांचा सूत्रधार आहे.
 
२००२ मध्ये जैश-ए-मोहम्मदला अधिकृतपणे बेकायदेशीर घोषित करण्यात आले असले तरी ही बंदी केवळ कागदावरच असल्याचं दिसून येतं. कारण या दहशतवादी संघटनेद्वारे अनेक प्रशिक्षणाची शिबिरं चालवली जात आहेत. १९६८ मध्ये बहावलपूरमध्ये जन्मलेला अझहर हा एकेकाळी अफगाणिस्तानातील हरकत-उल-मुजाहिद्दीनचा (HuM) सदस्य आणि धर्मगुरू होता. १९९४ मध्ये दहशतवादाच्या आरोपाखाली भारतात त्याला अटक करण्यात आली होती. परंतु नंतर त्याला सोडण्यात आले होते. जानेवारी २००० मध्ये त्याने कराचीमध्ये जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेची स्थापना केली. कट्टरपंथी देवबंदी विचारसरणीवर आधारित ही संघटना भारतातील अनेक मोठ्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहभागी आहे.
 

अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\