बदला! 'Operation Sindoor' राबवत अधर्मावर धर्माचा विजय
07-May-2025
Total Views |
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Indian Army Operation Sindoor) काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या इस्लामिक दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला त्यांच्याच भाषेत उत्तर दिले आहे. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यात आलंय. बुधवार, ७ मे रोजी पहाटे, भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केले, जे लष्कर, नौदल आणि हवाई दलाने संयुक्तपणे राबवलं. यामध्ये, भारतीय लढाऊ विमानांनी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील नऊ दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केला. ज्या ठिकाणांवर हल्ला करण्यात आला ते या प्रदेशातील काही सर्वात महत्वाचे आणि दीर्घकालीन दहशतवादी प्रशिक्षण केंद्र होते. पहलगाम येथे झालेल्या इस्लामिक दहशतवादी हल्ल्यात धर्म विचारून हल्ला निष्पाप पर्यटकांना टार्गेट करण्यात आलं. धर्मावर बोट उचलल्याने तळपायाची आग मस्तकात जाणे स्वाभाविकच होतं. त्यातच भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर राबवलं आणि पाकिस्तानला योग्य धडा शिकवला.
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर लगेचच ऑपरेशन सिंदूरचे नियोजन सुरू करण्यात आले होते, ज्यामध्ये पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली एक बैठक बोलावण्यात आली होती. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्याकडे या संपूर्ण मोहिमेचे नेतृत्व होते. ते सतत हवाई दल, नौदल आणि लष्कराच्या संपर्कात होते. पहलगाम हल्ल्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुप्तचर संस्था आणि एनटीआरओ सह पाकिस्तानमधील उच्च दर्जाच्या दहशतवादी तळांची ओळख पटवण्याची जबाबदारी अजित डोभाल यांना दिली होती.
पहलगाम हल्ल्यामागे पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबा गटाचा सहभाग असल्याचे समोर आले होते. लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद (जेईएम), हिजबुल मुजाहिदीन आणि त्यांच्याशी संबंधित इतर दहशतवादी नेटवर्क्सनी वापरलेल्या प्रमुख पायाभूत सुविधा नष्ट करण्यासाठी भारताने आपले प्रत्युत्तरात्मक हवाई हल्ले आखले. या कारवाईसाठी निवडलेल्या नऊ लक्ष्यांपैकी प्रत्येकाचा भारतात मोठ्या दहशतवादी कट रचण्यात आणि घुसखोरीच्या प्रयत्नांमध्ये सहभाग असल्याचा इतिहास आहे. भारत-पाकिस्तान सीमापार दहशतवाद परिसंस्थेत भारताने त्यांचे महत्त्व विश्लेषित केल्यानंतर या स्थळांची ओळख पटवण्यात आली. या हल्ल्यात जैश-ए-मोहम्मदचे भावलपूरमधील कार्यालय, मुझफ्फराबाद सेंट्रल ग्रिड सिस्टम आणि हाफिज सईदचे मरिदके येथील कार्यालय यासह नऊ ठिकाणी हल्ला करण्यात आला.
पाकिस्तानच्या दक्षिण पंजाबमधील बहावलपूरला भारताने सर्वात मोठे लक्ष्य बनवले. कारण हे शहर मसूद अझहरच्या नेतृत्वाखालील दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय म्हणून सर्वत्र ओळखले जाते. या दहशतवादी गटाने २००१ च्या संसदेवरील हल्ला आणि २०१९ च्या पुलवामा आत्मघाती बॉम्बस्फोटासह भारतातील अनेक हाय-प्रोफाइल हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली आहे किंवा त्यांच्याशी संबंध आहेत.
मुरीदके हे लाहोरच्या उत्तरेस सुमारे ४० किलोमीटर अंतरावर आहे. हे दीर्घकाळापासून लष्कर-ए-तोयबा आणि त्याची शाखा जमात-उद-दावा यांचे केंद्र आहे. २०० एकरांवर पसरलेल्या, मुरीडकेच्या दहशतवाद्यांच्या बालेकिल्ल्यात प्रशिक्षण क्षेत्रे, शिकवण केंद्रे आणि लॉजिस्टिक्स पायाभूत सुविधा आहेत. भारताने हेच लक्ष्य केले आहे.
कोटली हे पाकव्याप्त काश्मीरमध्ये आहे. आत्मघाती हल्लेखोर आणि बंडखोरांसाठी हे एक प्रमुख प्रशिक्षण केंद्र म्हणून वारंवार ओळखलं गेलंय. अशी माहिती आहे की, कोटलीमध्ये कोणत्याही वेळी ५० हून अधिक दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्याची क्षमता आहे. २०२३ आणि २०२४ मध्ये जम्मू आणि काश्मीरमधील राजौरी आणि पूंछ येथे झालेल्या कारवायांसाठी गुलपूरचा वापर वारंवार फॉरवर्ड लाँचपॅड म्हणून करण्यात आला होता असे मानले जाते. या ठिकाणाचा वापर त्या भागात भारतीय सुरक्षा काफिल्यांवर आणि नागरी लक्ष्यांवर हल्ले करणाऱ्या दहशतवाद्यांसाठी स्टेजिंग पोस्ट म्हणून केला जात होता.
सवाईचा संबंध उत्तर काश्मीरमधील हल्ल्यांशी आहे, विशेषतः सोनमर्ग, गुलमर्ग आणि पहलगाममधील हल्ल्यांशी संबंधित होता. सरजल आणि बर्नाला बद्दल सांगायचे तर.. आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेजवळ असलेले सरजल आणि बर्नाला हे घुसखोरीचे प्रवेशद्वार मानले जातात. सियालकोटजवळील महमूना कॅम्पचा वापर काश्मीरमध्ये ऐतिहासिकदृष्ट्या सक्रिय असलेल्या हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेने केला होता. अलिकडच्या काळात हा गट कमकुवत झाला असला तरी, भारतीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की जिवंत दहशतवाद्यांना अजूनही सीमेपलीकडून प्रशिक्षण आणि मार्गदर्शन केले जात आहे, विशेषतः महमूना सारख्या भागातून, जिथे स्थानिक समर्थन नेटवर्क अबाधित आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे, भारतीय लष्कराने भारतीय सीमेत घुसण्याचा प्रयत्न करणारे एक पाकिस्तानी लढाऊ विमान पाडले आहे. ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताने अत्याधुनिक शस्त्रांचा वापर केलाय. यामध्ये स्काल्प क्रूझ क्षेपणास्त्र, हॅमर प्रिसिजन बॉम्ब आणि लोटेरिंग दारूगोळा यांचा समावेश होता. स्काल्प क्रूझ क्षेपणास्त्र हे ब्रिटनमध्ये स्टॉर्म शॅडो म्हणून ओळखले जाते. फ्रँसीसी-ब्रिटिश लांब पल्ल्याचे, कमी दृश्यमानतेचे हवेतून जमिनीवर मारा करणारे क्रूझ क्षेपणास्त्र आहे. हे युरोपियन संरक्षण कंपनी एमबीडीए ने तयार केलंय. आज हे भारताच्या ३६ राफेल विमानांचा भाग आहे.
ऑपरेशन सिंदूरनंतर सीमावर्ती भागात अलर्ट जारी करण्यात आला असून जम्मू आणि काश्मीरमधील सध्याची परिस्थिती पाहता, जम्मू, सांबा, कठुआ, राजौरी आणि पूंछ येथील सर्व शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात आल्या आहेत.