लहानपणापासून संघर्षाचा यशस्वी सामना करून, अभिवाचनाच्या माध्यमातून वेगळी वाट निवडत आपला ‘स्व’ जपणार्या अक्षय वाटवे यांच्याविषयी...
कोकणच्या मातीने महाराष्ट्रालाच नव्हे, तर देशाला आणि जगाला अनेक हिरे दिले. आपल्या प्रतिभेच्या जोरावर या महापुरुषांनी, आपापल्या कार्यक्षेत्रात स्वतःची वेगळी छाप सोडली. धडपडणार्या असंख्य कलाकारांना या मातीत स्वतःचा सूर सापडला आणि त्यांनी या आपल्या विश्वाला नवीन आकार दिला. अंगभूत कला-कौशल्यांचा विकास करून, आपल्या आवाजाच्या माध्यमातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारा असाच एक कथाकार म्हणजे अक्षय वाटवे. सिंधुदुर्गमधील सावंतवाडी येथे अक्षय यांचा जन्म झाला. आयुष्याच्या प्रारंभीच कौटुंबिक पातळीवर त्यांनी संघर्षाचे धडे गिरवले. वडिलांची खासगी कापड दुकानातली नोकरी आणि भाड्याच्या खोलीतील संसार, यामुळे एक प्रकारची अस्वस्थता जीवनाच्या सुरुवातीलाच त्यांनी अनुभवली. जीवन अस्वस्थ असले, तरी अस्थिर नव्हते. आहे त्या परिस्थितीतसुद्धा संस्कारांचे आणि सुयोग्य आचार-विचारांचे बाळकडू त्यांना मिळाले.
शाळेत असताना एक दिवस अक्षय यांनी चिठ्ठी लिहून घर सोडून पळून जाण्याचा प्रयत्न केला. रागाच्या भरात घेतलेला हा निर्णय त्यांच्या पचनी पडला नाही आणि पुन्हा माघारी फिरून ते घरी आले. पलायनाचा हा अयशस्वी प्रयत्न त्यांच्या मनावर कायमचा कोरला गेला. कारण, नंतर त्यांच्या आईने त्यांना पाठ दाखवून पळून जायचे नाही, हा धडा दिला. भविष्यात ज्या ज्या वेळेला आयुष्याच्या वळणावर कठीण प्रसंग उद्भवले, त्या त्या वेळेला त्यांनी हा धडा लक्षात ठेवला. “शाळकरी वयात वक्तृत्व, कथाकथन या गुणांना प्रोत्साहन मिळाले. यामुळे आत्मविश्वास वाढला आणि एक सकारात्मक स्पर्धकवृत्ती तयार झाली. यामुळेच पुढे टिकून राहायचे बळ मिळाले,” असे अक्षय म्हणतात. महाविद्यालयातसुद्धा त्यांच्या या गुणांचे कौतुक झाले. मुंबई विद्यापीठाच्या वक्तृत्व स्पर्धेत त्यांनी रौप्यपदक पटकवले. वेळ जसा जात होता, तसे घरातल्या मंडळींसोबत संघर्ष सुरू झाला. महाविद्यालयात शिकत असताना आपल्या जीवनाची पायवाट अक्षय शोधत होते. या शोधामुळेच पुढे रत्नागिरीच्या आकाशवाणी केंद्रावर, उद्घोषक म्हणून त्यांना काम करण्याची संधी मिळाली. दोन वर्षे त्यांनी झपाटल्यासारखे काम केले आणि सोबतच ‘एलएलबी’ला प्रवेश घेतला. यानंतर त्यांच्या जीवनातील संघर्षाच्या अध्यायाला सुरुवात झाली.
घराची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत गेली. याच काळात दुर्दैवाने अक्षय यांच्यावरचे मायेचे छत्र हरपले. त्यामुळे पुन्हा एकदा ते आपल्या गावाला गेले. माघारी फिरल्याची सल त्यांच्या मनाला पोखरत होती. परंतु, त्यांची पावले थांबली नाही. या कठीण परिस्थितीवरही मात करत अक्षय यांनी, परत एकदा मुंबई गाठली. 2010 ते 2013 या काळात त्यांच्या जीवनात, मोठ्या प्रमाणात उलथापालथ झाली. दरम्यानच्या काळात त्यांची मैत्रीण, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. पुढे 2013 साली त्या दोघांनी लग्न करून संसाराला सुरुवात केली.
आपल्याला चांगले बोलता येते, हे वक्तृत्व स्पर्धांच्या माध्यमातून अक्षय यांच्या लक्षात आले होते. त्यामुळे व्यासपीठावर उभे राहून गाण्याचे, नृत्याचे आदी सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी निवेदन करण्यास अक्षय यांनी सुरुवात केली. निवेदकाच्या भूमिकेत असताना कुठल्या गोष्टीचे भान आपण बाळगायला हवे, याची जाणीव त्यांना झाली. प्रत्येक कार्यक्रम म्हणजे शिकण्याची एक संधीच होती. अक्षय म्हणतात की, त्यांनी ठरवून निवेदकाच्या भूमिकेला करिअर म्हणून निवडले नाही. मिळेल ते काम करत गेले आणि पुढची वाट दिसू लागली.
अक्षय वाटवे यांनी मग अभिवाचनाचे वेगवेगळे प्रयोग करायला सुरुवात केली. प्रेक्षकांना हे अभिवाचनाचे प्रयोग आवडू लागले. अक्षय ‘गीतरामायणा’चे अभिवाचन करायचे. अभिवाचनाचे हेच प्रयोग लोकांच्या पसंतीस् उतरले. नागपूरच्या एका महिलेने त्यांना ‘गीतरामायणा’ची आकाशवाणीने प्रकाशित केलेली प्रत भेट म्हणून पाठवली. या प्रतीला बोरकरांची प्रस्तावना आहे. 92व्या ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’चे अध्यक्षपद अरुणा ढेरे यांनी भूषवले होते. त्यांच्यासोबतही काव्यवाचनाचा कार्यक्रम अक्षय यांनी केला. यानंतर ना. धो. महानोर यांच्या ‘अजिंठा’ या काव्यसंग्रहावर आधारित, अभिवाचनाचा कार्यक्रम अक्षय आणि त्यांच्या सहयोग्यांनी सादर केला. यामुळेच त्यांना खरी ओळख मिळाली. 2021 सालापासून या कार्यक्रमाची निर्मितीप्रक्रिया सुरू झाली. आतापर्यंत 20पेक्षा अधिक प्रयोग या अभिवाचनाचे झाले आहेत. प्रत्यक्ष ना. धो. महानोर यांनी या अभिवाचन करणार्या कलाकारांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली.
अक्षय वाटवे आजसुद्धा शिकत आहेत. वेगवेगळ्या प्रकारची आव्हाने निवेदन आणि अभिवाचनाच्या क्षेत्रातसुद्धा आहेत. अक्षय म्हणतात की, “यशाचे माप सातत्याने आपल्याच पदरात पडते असे नाही. परंतु, संघर्षाला सामोरे जाण्याची मानसिक तयारी आपण ठेवायला हवी. अपयशाची चिकित्सा करणेसुद्धा तितकेच गरजेचे आहे. आपल्या कामाला आपले सहकारी, मित्र, कुटुंबीय जो प्रतिसाद देतात, निरीक्षणे नोंदवतात ती टिपून ठेवून, त्यावर चिंतन करायला हवे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, जगण्याला ठोस वैचारिक आधार हवा.” अक्षय वाटवे यांच्या पुढच्या प्रवासाला दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!