समाजातील दिव्यांग मुले आणि वयोवृद्धांसाठी आपले सर्वस्व अर्पण करणारे प्रा. महेश पाटील यांच्याविषयी...
समाजात अशी काही मंडळी असतात, ज्यांना समाजासाठी काहीतरी करायची तळमळ असते. त्याच व्यक्तीला जर राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या संघटनेचा परिसस्पर्श झाला, तर त्या व्यक्तीची इच्छा पूर्ण झालीच म्हणून समजा. डॉ. महेश मधुकर पाटील हे प्राध्यापक म्हणून आज कार्यरत असले, तरी समाजातील अनाथ मुलांसाठी तसेच वृद्धांकरिता त्यांचे कार्य नक्कीच प्रेरणादायी आहे. स्वतःचे वृद्धाश्रम आणि अनाथाश्रम सुरू करण्याचे स्वप्न उराशी बाळगून आज ते मोठ्या कष्टाने आणि जिद्दीने आपल्या संस्थेच्या माध्यमातून कार्यरत आहेत.
प्रा. महेश पाटील यांचा जन्म धुळ्यातला. वडील जंगल कामगार खात्यात ‘ऑडिट डिपार्टमेंट’मध्ये असल्यामुळे त्यांची विविध ठिकाणी बदली व्हायची. जन्म धुळ्यातला असला तरी महेश पाटील यांचे बहुतांश बालपण पालघरमध्ये गेले. इथल्या नवली येथील जिल्हा परिषद शाळेत नंतर इंडियन एज्युकेशन विद्यालयात त्यांचे शिक्षण झाले. १९८१ साली वडिलांचे निधन झाल्यानंतर कुटुंबाची जबाबदारी त्यांच्या आईवर आली. परिवारात दोन मोठ्या बहिणी आणि एक लहान भाऊ असून, सर्वांच्याच भविष्याची जबाबदारी एकट्या आईवर येऊन पडली. वडिलांच्या निधनानंतर महेश यांच्या आई शिपाई म्हणून रुजू झाल्या. सोबतच दहावीच्या परीक्षेचा अभ्यासही त्या करीत होत्या. दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर शिपाईवरून क्लार्क म्हणून रुजू झाल्या. त्यानंतर वडिलांच्या जागी ‘ऑडिट डिपार्टमेंट’ला नोकरी मिळाली. पुढे त्यांची बदली डोंबिवली शहरात झाली. डोंबिवलीत ते एका चाळीत राहायचे. तेव्हा महेश हे इयत्ता सहावीत होते. डोंबिवलीतील प्रसिद्ध स्वामी विवेकानंद व आदर्श विद्यालय येथे त्यांनी पुढील शालेय शिक्षण घेतले. याच ठिकाणी त्यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी परिचय झाला. कारण, शाळेच्या परिसरातच संघाची दैनंदिन शाखा भरायची. शाळेतील बरीचशी मुले शाखेत जात असत. त्यांना पाहून महेश यांनासुद्धा शाखेत जाण्याची आवड निर्माण झाली. हळूहळू त्या मुलांच्या जोडीने त्यांनीसुद्धा शाखेत यायला सुरुवात केली. मधल्या काळात त्यांनी संघाच्या अनेक शिबिरांमध्ये सहभागही घेतला. हे सर्व करत असताना महेश यांच्या व्यक्तिमत्त्वावर आमूलाग्र बदल होत गेला आणि माणूस म्हणून समाजाकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन बदलला.
पुढे मग मोठ्या बहिणींचे लग्न आणि लहान भावाचे पुढील शिक्षण या सर्व गोष्टी लक्षात घेता त्यांनी शिक्षणासोबतच नोकरी करण्यास सुरुवात केली. खासगी क्षेत्रात नोकरी करत असताना ‘वेलिंगकर’मधून ‘डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट’ व ‘डिप्लोमा इन मार्केटिंग मॅनेजमेंट’ केले. मराठी विषयात ‘बीए’ व ‘एमए’ केले. त्यांची आई ‘ऑडिट डिपार्टमेंट’मध्ये असल्याने ‘जीडीसीए’देखील करता आले. पुढे पत्रकारितेत त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले. 2003-04 सालापासून पुढे प्राध्यापक म्हणून शिक्षण क्षेत्रात नोकरीला सुरुवात झाली. सध्या ते जोशी-बेडेकर महाविद्यालयात माध्यम विभाग समन्वयक तसेच उपप्राचार्य म्हणून कार्यरत आहेत.
महेश यांना प्रारंभीपासूनच समाजकार्याची प्रचंड आवड. कळवा येथील साळवी महाविद्यालयात (मनिषा विद्यालय) शिकवत असताना त्यांनी येथील विद्यार्थ्यांना सोबत घेऊन अनेक समाजकार्यात भाग घेतला. डोंबिवली येथे ‘भरारी’ म्हणून एक अस्थिव्यंग विकलांग संस्था आहे, जी सर्व प्रकारच्या अपंग व्यक्तींच्या निवारा, शारीरिक, मानसिक आणि आर्थिक पुनर्वसनासाठी कार्य करते. त्याठिकाणी विजय प्रधान (भाऊ प्रधान) यांच्याशी परिचय आला. त्यांच्या संस्थेसाठी सेवा करण्याची संधी त्यांना मिळाली. तसेच, ठाण्यातील प्रा. बर्वे सर यांच्या ‘घरकुल’ संस्थेसोबत कार्य करण्याची त्यांना संधी मिळाली. या संस्थांमधील दिव्यांग मुले तसेच वृद्ध मंडळींची सेवा करत असताना महेश यांची समाजकार्याची आवड निर्माण होत गेली. त्यानुसार 2019 साली ‘मधुकर फाऊंडेशन संस्था’ नोंदणीकृत करण्यात आली आणि 2021 साली पब्लिक ट्रस्ट म्हणून ती नावारूपाला आली. ही संस्था समाजातील निराधार मुलांसाठी गेली सहा वर्षे कार्यरत आहे. त्यासोबतच वृद्धांचे प्रश्न आणि त्यामुळे वृद्धाश्रमांची वाढत चाललेली गरज, याकडेसुद्धा संस्थेचे विशेष लक्ष आहे.
अलीकडेच अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने वाशी येथील ‘डिझायर सोसायटी’ या अनाथाश्रमात 40 बालके व कर्मचार्यांसाठी अन्नदानाचा उपक्रम राबविण्यात आला होता. मुलांच्या शैक्षणिक विकासाच्या दृष्टीने त्यांना आवश्यक वस्तू पुरवण्याचे काम संस्थेच्या माध्यमातून होत आले. ‘कोविड’च्या काळात गरजूंना मदत करण्यात आली, तसेच चिपळूण येथील पूरग्रस्तांनादेखील मोठ्या प्रमाणावर शिधावाटप व गरजेच्या वस्तूंचा पुरवठा करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष म्हणून महेश पाटील यांचे एक स्वप्न आहे की, नाशिक किंवा जळगाव परिसरात वृद्धाश्रम तसेच अनाथाश्रम सुरू करावे. मात्र, त्यासाठी आवश्यकता आहे ती पुरेशा अर्थसाहाय्याची. त्यामुळे अशा मुलांच्या भविष्यासाठी समाज म्हणून आपले कर्तव्य नक्कीच बजावण्याचा प्रयत्न समाजातून होईल, असा महेश पाटील यांना विश्वास आहे. आजवर त्यांनी अनेक पुरस्कार-सन्मान मिळाले असले तरी अपंग, अनाथ मुलांचे भविष्य उज्ज्वल होणे हीच त्यांच्यासाठी मोठी पर्वणी आहे, असे ते म्हणतात. महेश पाटील यांच्या पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्यावतीने अनेक शुभेच्छा!
ओंकार मुळ्ये