मुंबई : ‘बिग बॉस ७’ फेम अभिनेता आणि हिंदी चित्रपटसृष्टीत विविध भूमिका साकारणारा एजाज खान सध्या मोठ्या अडचणीत सापडला आहे. मुंबईतील एका अभिनेत्रीने त्याच्यावर बलात्काराचा आरोप केल्यानंतर चारकोप पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणानंतर एजाज खान फरार असून, त्याचा मोबाईल फोनही बंद आहे. मुंबई पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.
प्राप्त माहितीनुसार, संबंधित अभिनेत्रीने एजाज खानविरोधात तक्रार दाखल करताना म्हटले आहे की, एजाजने तिच्या विश्वासाला तडा देत जबरदस्ती केली. या तक्रारीच्या आधारे चारकोप पोलिस ठाण्यात भारतीय दंड विधानातील संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तपास सुरू करताच एजाजच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा फोन बंद असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या निवासस्थानी जाऊन पाहणी केली, पण तो तिथेही हजर नव्हता.
मुंबई पोलिसांनी अधिकृत निवेदनात सांगितले की, “अभिनेता एजाज खान याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एफआयआर नोंदवल्यानंतर त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्याचा मोबाईल फोन बंद आढळला. एजाज पोलिसांच्या संपर्कात नाही. त्याच्या शोधासाठी विविध ठिकाणी तपास सुरू आहे.”
एजाज खानने ‘रक्त चरित्र’, ‘अल्लाह के बंदे’, ‘लक्ष्य’ यांसारख्या चित्रपटांत काम केलं असून, त्याला खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली ती ‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोमधून. या शोमध्ये त्याच्या वादग्रस्त वागण्यामुळे तो अनेक वेळा चर्चेत राहिला होता. यापूर्वीही त्याच्यावर विविध प्रकरणांमुळे कायदेशीर कारवाई झालेली आहे. त्याला 2021 मध्ये ड्रग्ज प्रकरणातही अटक झाली होती.
या नव्या आरोपामुळे एजाज खान पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. पोलिस तपास सुरु असून, लवकरच त्याला ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पोलिसांनी नागरिकांना संयम बाळगण्याचे आवाहन करत या प्रकरणातील सत्य परिस्थिती तपासाद्वारे पुढे येईल, असे सांगितले आहे.
या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर अजूनही एजाज खान किंवा त्याच्या वकिलांकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य देण्यात आलेले नाही. पुढील काही दिवसांत या प्रकरणात काय नवीन घडते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
ठाण्यातल्या के. जी. जोशी महाविद्यालयातून पत्रकारतेची पदवी प्राप्त. मुंबई विद्यापीठातून मराठी साहित्यात एम.ए पदवी प्राप्त. गेले ९ वर्ष मालिका, चित्रपट, नाटक यांमधून काम केले. लघुपट, नाटक लिखाणाची आवड. अभिनय क्षेत्रात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.