मुंबई : (Civil Defence Mock Drill) पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला आहे. दोन्ही देशांमध्ये कोणत्याही क्षणी युद्धाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. या पार्श्वभुमीवर युद्धसज्जतेच्या दृष्टीने केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना ७ मे रोजी 'मॉक ड्रिल' अर्थात युद्धकाळातील उपायांचा सराव करण्याचे निर्देश दिले आहेत. परंतु मॉक ड्रील म्हणजे नेमकं काय ते जाणून घेऊयात.
मॉक ड्रील म्हणजे नेमकं काय?
मॉक ड्रील अर्थात युद्ध सराव हा क्षेपणास्त्र हल्ले, हवाई हल्ले या दरम्यान निर्माण होणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी काय उपाययोजना करायला पाहिजे? सरकारी यंत्रणांनी कसं कार्यरत राहिलं पाहिजे यासंदर्भातील सराव असतो. थोडक्यात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतर किंवा थेट युद्ध सुरु झाल्यानंतर जर शत्रूने एखादं शहर किंवा गावावर हल्ला केला तर सामान्य जनतेनं त्या परिस्थितीला कसं तोंड द्यायचं, काय काळजी घेतली पाहिजे, सरकारी यंत्रणांनी काय करायचं? याचा सराव म्हणजे मॉक ड्रील.
मॉक ड्रीलमध्ये काय होणार?
गृह मंत्रालयाच्या निर्देशानुसार, नागरिकांचे संरक्षण आणि आपत्कालीन परिस्थितींमध्ये योग्य प्रतिसाद देण्यासाठी खालील गोष्टींवर सराव केला जाणार आहे:
- नागरिकांना अलर्ट करण्यासाठी सायरन वाजेल.
- नागरिकांना त्यांच्या ऑफिस किंवा घरातून, एखादं बंकर किंवा सेफ हाऊसकडे नेलं जाऊ शकते.
- हल्ल्याच्या वेळी शहर/क्षेत्र ‘ब्लॅकआउट’ करणे (लाईट बंद ठेवणे).
- महत्त्वाच्या स्थापत्यांनाच लपवण्याची प्रक्रिया.
- हल्ला झाल्यास नागरिकांची तातडीने स्थलांतर प्रक्रिया व त्याचा सराव.|
- रस्त्यांवर कडक बंदोबस्त असताना पोलिसांसोबत, भारतीय लष्कराचे जवानदेखील दिसतील.
पंजाबच्या फिरोजपूरमध्ये ब्लॅकआउट सराव
पंजाबमधील फिरोजपूर छावणीत ४ मे आणइ ५ मे रोजी ३० मिनिटांचा ब्लॅकआउट सराव करण्यात आला. या काळात, आसपासच्या परिसरात आणि गावांमध्ये रात्री ९ ते ९.३० या वेळेत लाईट बंद ठेवून युद्धाच्या परिस्थितीतील सज्जतेचा आढावा घेण्यात आला.