मोबाईल आणि समाजमाध्यमांमुळे संवाद हरवला

- प्रभू गौर गोपाल दास यांचे मत; डिजिटल युगात माणसे दुरावली

    06-May-2025
Total Views |
 
People have become distant digital world Gaur Gopal Das
 
मुंबई: -  (People have become distant digital world Gaur Gopal Das) “धकाधकीच्या आणि डिजिटल युगात माणसे जरी एकमेकांच्या संपर्कात असली, तरी मनाने दूर जात असल्याचे चित्र समाजात दिसून येत आहे. मोबाईल आणि समाजमाध्यमांच्या सततच्या वापरामुळे प्रत्यक्ष संवाद कमी झाला आहे. त्यामुळे डिजिटल युगात संवाद महत्त्वाचा आहे. या संघर्षांवर यशस्वीरित्या मात करण्यासाठी तणावमुक्त जीवनशैली आत्मसात करणे, ही काळाची गरज आहे,” असे मत प्रेरणादायी वक्ते आणि लेखक प्रभू गौर गोपाल दास यांनी व्यक्त केले.
 
सोमवार, दि. 5 एप्रिल रोजी ‘टेक-वारी’ कार्यक्रमाच्या निमित्ताने मंत्रालयात ‘प्रभावी व तणावमुक्त जीवन’ या विषयावर ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, “सध्या जग वेगाने डिजिटल क्रांतीच्या दिशेने वाटचाल करत आहे. स्मार्टफोन, कृत्रिम बुद्धिमत्ता, इंटरनेट यांसारखे तंत्रज्ञान आपला रोजचा भाग बनत आहेत. अशा काळात ‘टेक्नोसॅव्ही’ होणे ही केवळ गरज नसून ती एक अनिवार्यता बनली आहे. विविध ऑनलाईन कोर्सेस, मोबाइल अ‍ॅप्स आणि ई-लर्निंग प्लॅटफॉर्म्समुळे तंत्रज्ञान शिकणे आता पूर्वीपेक्षा सोेपे झाले आहे.“
 
परंपरा, नीतिमूल्ये विसरू नका
 
“दररोज थोडा वेळ स्वतःसाठी राखून ठेवा. ध्यान, वाचन, मनमोकळ्या गप्पा किंवा छंद जोपासा. नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि पुरेशी झोप यांचा दिनक्रम ठेवा. या गोष्टींचा अवलंब केल्यास तणाव आणि मानसिक विकारांवर मात केली जाऊ शकते.
 
संस्कृती आणि मूल्ये ही आपल्या जीवनात महत्त्वाची आहेत. तंत्रज्ञानाच्या विकासात आपण पुढे जात असताना, आपल्या परंपरा, नीतिमूल्ये विसरता कामा नये. स्मार्ट, डिजिटल जग व भविष्यकाळासाठी सज्ज होणे महत्त्वाचे असले, तरी आपले संस्कार आणि मूल्ये यांचा विसर पडू देऊ नका” असेही प्रभू गौर गोपाल दास म्हणाले.