अहो सपकाळ...धीर धरा...

    06-May-2025
Total Views |
 
congress sankpal
 
एका सामान्य कार्यकर्त्याला थेट महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षपदी बसविल्याचा टेंभा काँग्रेसने मिरवला खरा. पण, हा टेंभा फार काळ टिकला नाही. काँग्रेसचे नवीन प्रदेशाध्यक्ष सध्या माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचाच कित्ता गिरवताना दिसतात. दररोजची बेताल वक्तव्ये, सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका, यापलीकडे सध्या तरी सपकाळ यांची कामगिरी समोर आलेली नाही. सपकाळदेखील ‘महाराष्ट्राचे नवीन टोमणेसम्राट’ हा किताब पटकावतात की काय, अशी स्थिती. सपकाळ यांची वक्तव्ये सध्या काँग्रेसची पुढील वाटचाल कशी असेल, याचे दिशादर्शक म्हणावे लागेल. “भाजप ही काँग्रेसचे नेते खाणारी चेटकीण आहे,” असा साक्षात्कार सपकाळ यांना झाला. महाराष्ट्रात ‘अंधश्रद्धा निर्मूलन कायदा’ अस्तित्वात असताना आणि स्वतःला ‘पुरोगामी’ म्हणवून घेणार्‍या काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षाला अशा प्रकारचे बोलणे शोभत नाही.
 
काँग्रेसच्या नेत्यांना व्यक्तिस्वातंत्र्य आहे. त्यांनी कुठे जायचे हे ते स्वतः ठरवू शकतात. त्यात काँग्रेसमध्ये हुजरेगिरी केल्याशिवाय पदे पदरात पडत नाही. त्यामुळे वरिष्ठांचे मन जिंकण्यासाठी काँग्रेस नेत्यांमध्ये कायम चढाओढ सुरू असते. आतापर्यंत माजी मुख्यमंत्री नारायण राणे, अशोक चव्हाण यांच्यासह नुकतेच भाजपमध्ये दाखल झालेले संग्राम थोपटे अशी अनेक उदाहरणे आहेत, ज्यांनी काँग्रेस सोडली. हे सर्व नेते भाजपमध्ये आल्यानंतर मात्र त्यांना मानाचे पान मिळाले. या नेत्यांना काँग्रेससारखे अडगळीत न टाकता, त्यांचा उपयोग करून घेतला गेला. मोदी, शाह, फडणवीस आणि संघावर बोलले की राहुल गांधी खूश होतात, असा सबंध काँग्रेसी नेत्यांचा समज झालेला असतो. त्यातून ते लवकर बाहेर पडत नाही. त्यामुळे स्वतःचे तर नुकसान होते, मात्र त्यांच्याकडे आशेने पाहणार्‍या भोळ्याभाबड्या जनतेचाही भ्रमनिरास होतो. अंतर्गत राजकारणाने पोखरलेल्या काँग्रेसला नेत्यांचा सन्मान करायला कधी जमले नाही. कार्यकर्ते म्हणजे आपले गुलाम आणि नेते म्हणजे गांधी घराण्याचे सेवक अशा आविर्भावात काँग्रेसचे वरिष्ठ सदैव वावरत असतात. विशेष म्हणजे, भाजपला ‘चेटकीण’ म्हणणार्‍या सपकाळ यांना कुणीतरी सांगायला हवे की, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे कधीकाळी भाजपचे खासदार होते. त्यामुळे स्वतःचे हसे करून घेऊ नका, धीर धरा!
 
ताईंचा ‘नेमका’ टिवटिवाट
 
राजकारण करताना समाजमाध्यमांचा वापर नेमका आणि पुरेपूर कसा करावा, याबाबतीत शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा हात कुणीही धरु शकत नाही. राजकारणाबरोबरच ताई समाजमाध्यमांचा वापर समाजकारणासाठीही अगदी नेमकेपणाने करतात. बारामती सोडा, राज्यात, देशात, परदेशात कोणतीही घटना झाली तरी ताईंचे ‘ट्विट’ हमखास येणारच. त्यात त्यांनी नेमकेपणाने असे काहीतरी लिहिलेले असते, ज्यामुळे एक तर वाद होतो, नाही तर मनसोक्त प्रसिद्धी तरी मिळते. नुकतेच पौड गावातील अन्नपूर्णा देवीच्या मंदिरात मुस्लीम तरुणाने देवीची विटंबना केली. त्याला अटकही करण्यात आली. मात्र, सुप्रियाताईंनी आपल्या समाजमाध्यमातील पोस्टमध्ये मुस्लीम युवक असूनही त्याचा उल्लेख टाळला. त्या म्हणतात, “पौड गावातील अन्नपूर्णा देवीच्या मंदिरात एका तरुणाने गैरकृत्य केल्याचे समोर आले आहे. ही घटना अतिशय घृणास्पद व संतापजनक आहे. कोणत्याही संवेदनशील व्यक्तीने हे सहन करणे कदापि शक्य नाही.
 
माझी शासनाला विनंती आहे की, कृपया या तरुणावर तातडीने कठोरात कठोर कारवाई करावी. सामाजिक सलोखा बिघडविणार्‍या कोणत्याही व्यक्तीला माफी मिळता कामा नये, अशी आमची भूमिका आहे.” याद्वारे स्पष्ट होते की, लांगूलचालन करण्याकरिता ताई कोणत्या पद्धतीने समाजमाध्यमांचा वापर करतात. हिंदू समाजातील व्यक्तीने असे गैरकृत्य केले असते, तर एव्हाना ताईंनी रान पेटवले असते. भेटीगाठी, मीडिया बाईट्स आणि ठिय्या देऊन आंदोलनाही बसल्या असत्या. मात्र, ताई आता एकदम शांत बसणार. या घटनेत त्यांना फक्त एक तरुण दिसला. एकवेळ मतदारसंघातले प्रश्न बाजूला राहतील, पण महाराष्ट्रात, देशात काय चालले आहे, यावर ताईंना हमखास बोलायचे असते. वांगे शेतीतून शेतकर्‍यांना भरघोस उत्पन्न कसे घ्यावे, याचा वस्तुपाठच त्यांनी घालून दिला आहे. लवासासारखे अत्युच्च दर्जाचे पर्यटनस्थळ आहेच. दरम्यान, अनेकदा मटण खाऊन देवदर्शन केल्याचे आरोप त्यांच्यावर होत आले आहेत. मात्र, त्याचा त्यांना फारसा फरक पडत नाही. सहिष्णू हिंदूंना कसलेही स्पष्टीकरण दिले की चालून जाते, हे त्यांना चपखल माहिती आहे. नेमकेपणाने समाजमाध्यमांचा वापर कसा करावा, यात ताईंचा हातखंडा. पौड घटनेतील त्यांचे ‘ट्विट’ हे त्याचेच उत्तम उदाहरण.