"वेगळा गट म्हणून राहिल्यास अजित पवारांना कधीही मुख्यमंत्री होता येणार नाही"; संजय राऊतांचा दावा

    05-May-2025   
Total Views |
 
sanjay raut target dcm ajit pawar over cm post
 
 
मुंबई : (Sanjay Raut) 'वेगळा गट म्हणून राहिल्यास अजित पवारांना कधीही मुख्यमंत्री होता येणार नाही', असे विधान उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या इच्छेसंदर्भातील वक्तव्याबाबत मुंबईत माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
 
काय म्हणाले राऊत ?
 
"अजित पवारांना मुख्यमंत्री होण्यासाठी स्वतःचा पक्ष भाजपमध्ये विलीन करावा लागेल, त्यानंतरच त्यांना मुख्यमंत्रीपद मिळेल, वेगळा गट म्हणून राहिल्यास अजित पवारांना कधीही मुख्यमंत्री होता येणार नाही. हीच परिस्थिती एकनाथ शिंदे यांचीसुद्धा आहे. तेही भाजपमध्ये गेले तरच संधी मिळू शकते," असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. अजित पवारांच्या 'मलाही मुख्यमंत्री व्हायचं आहे' या विधानावर ते प्रतिक्रिया देताना ते बोलत होते. यावर बातम्यांमध्ये आणि प्रकाशझोतात राहण्यासाठी राऊत बोलत असतात, असे प्रत्युत्तर सुनील तटकरे यांनी दिली आहे.
 
शरद पवार अजित पवारांना कधीच माफ करणार नाही!
 
माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी शरद पवार आणि अजित पवार यांच्या नात्यांसंदर्भात वक्तव्य केले. ते म्हणाले, "अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीगाठी होत असतात. कारण दोन्ही नेते अनेक संस्थांवर एकत्र काम करत आहेत. या संस्थांच्या कामांसाठी त्यांच्या भेटीगाठी होत असतात. तसेच कौटुंबिक भेटीही त्यांच्या होत असतात. मात्र कौटुंबिक नाती आणि राजकीय संबंध वेगळे असतात, त्यामुळे राजकीयदृष्ट्या शरद पवार अजित पवार यांना कधीच माफ करणार नाही."
 

अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\