Indian Idol 12 फेम पवनदीप राजनचा भीषण अपघात; सध्या नोयडा येथील रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे फोटो वायरल! सविस्तर वाचा...

    05-May-2025   
Total Views |
 
 
 
indian idol 12 fame pawandeep rajan
 
 
 
 
नवी दिल्ली : इनडियन आयडोल १२ चा विजेता आणि प्रसिद्ध गायक पवनदीप राजन याचा उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग ९ वर भीषण अपघात झाला. हा अपघात रात्री सुमारे ३ वाजता गजरौला पोलीस ठाण्याजवळील CO कार्यालयाजवळ घडला. पवनदीप हा चंपावत (उत्तराखंड) येथून दिल्लीला एका कार्यक्रमासाठी प्रवास करत असताना त्यांच्या गाडीने मागून उभ्या असलेल्या ईचर कँटरला धडक दिली.
 
 
 
पवनदीप याच्यासोबत त्याचा मित्र अजय मेहरा आणि चालक राहुल सिंह हे देखील गाडीत होते. अपघातात तिघेही गंभीर जखमी झाले असून, प्राथमिक तपासात चालकाला झोप लागल्यामुळे गाडीवरील नियंत्रण सुटल्याचे निदर्शनास आले आहे.
 
 
 
गजरौला पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अखिलेश प्रधान यांनी सांगितले की, एम.जी. हेक्टर वाहनाने मागून उभ्या असलेल्या ईचर कँटरला जोरदार धडक दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना तातडीने खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल केले. मात्र, जखमांची तीव्रता लक्षात घेता त्यांना नंतर नोयडा येथील हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले.
 
 
 
पवनदीप याला दोन्ही पायांना फ्रॅक्चर असून डोक्याला देखील गंभीर इजा झाली आहे. सध्या त्याच्यावर नोयडामधील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये ऑर्थोपेडिक तज्ज्ञांच्या निगराणीत उपचार सुरू आहेत. रुग्णालयाने दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, "पवनदीप राजन यांना वाहन अपघातानंतर फोर्टिस हॉस्पिटल, नोयडा येथे दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या दोन्ही पायांमध्ये फ्रॅक्चर असून त्यांच्यावर सर्जरीची मालिका होणार आहे. ते सध्या शुद्धीवर आहेत आणि त्यांची प्रकृती स्थिर आहे. आमचा वैद्यकीय संघ सातत्याने त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे."
 
 
 
डिप्टी एसपी श्वेताभ भास्कर यांनी सांगितले की, अपघातग्रस्त दोन्ही वाहने जप्त करण्यात आली असून, लेखी तक्रार मिळाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल. दरम्यान, पवनदीप, अजय मेहरा आणि चालक राहुल सिंह यांची प्रकृती गंभीर असून डॉक्टरांच्या सततच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.
 
 
 
ही दुर्घटना गायकाच्या चाहत्यांसाठी धक्कादायक ठरली असून सोशल मीडियावरून त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली जात आहे.




अनिरुद्ध गांधी

ठाण्यातल्या के. जी. जोशी महाविद्यालयातून पत्रकारतेची पदवी प्राप्त. मुंबई विद्यापीठातून मराठी साहित्यात एम.ए पदवी प्राप्त. गेले ९ वर्ष मालिका, चित्रपट, नाटक यांमधून काम केले. लघुपट, नाटक लिखाणाची आवड. अभिनय क्षेत्रात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.