मुंबई, राज्याला लवकरच एका नव्या वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे. सध्या महाराष्ट्रात ११ वंदे भारत एक्सप्रेस सुरू असून राज्याला लवकरच बारावी वंदे भारत एक्सप्रेस मिळणार आहे. ही बारावी वंदे भारत ट्रेन महाराष्ट्रातील दोन राजधान्यांना जोडणारी असेल. सद्यस्थितीत राज्यातील मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद, सीएसएमटी ते सोलापूर, सीएसएमटी ते शिर्डी, सीएसएमटी ते जालना, सीएसएमटी ते मडगाव, नागपूर ते बिलासपूर, नागपूर ते इंदोर,नागपूर ते सिकंदराबाद, पुणे ते कोल्हापूर आणि पुणे ते हुबळी या ११ महत्त्वाच्या मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहे. दरम्यान आता राज्यातील वंदे भारत एक्सप्रेसचे जाळे आणखी वाढणार आहे कारण की राज्याला लवकरच बारावी वंदे भारत ट्रेन मिळणार आहे.
भारतामध्ये सध्याच्या घडीला तबब्ल १३६ वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन धावत आहेत. त्यामध्ये आणखी भर पडणार आहे. मात्र, रेल्वेचे जाळे विस्तारण्यासोबतच जलद प्रवासासाठी भारतीय रेल्वेकडून आणखी वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे ताफ्यात आणण्याचे नियोजन सुरू आहे. वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनमुळे प्रवास वेगवान आणि आरामदायी होत आहे. वंदे भारत एक्सप्रेसमुळे देशातील दोन मोठ्या शहरांना जोडले जात आहे. लवकरच नागपूर ते मुंबई या दोन शहरादरम्यान वंदे भारत ट्रेन सुरू होणार आहे. या मार्गावर ट्रेनची संख्या आणि प्रवाशांची वाढती गर्दी पाहून रेल्वेकडून वंदे भारत सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येऊ शकतो.