‘जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन परिषद 2025’ (वेव्हज)ची सांगता रविवार, दि. 4 मे रोजी पार पडली. जगभरातील गुंतवणूकदार, कलाकार आणि विविध देशांतील पाहुणे मंडळींनी या संपूर्ण कार्यक्रमाला रंगत आणली. या भव्य कार्यक्रमाची ही फलश्रुती...
मुंबईत ‘जिओ वर्ल्ड सेंटर, बीकेसी’ येथे दि. 1 मे ते दि. 4 मे या चार दिवसात भारताची ताकद काय आहे? हे जगाला समजले. असे म्हणतात, इथल्या मातीतच ‘स्टोरी टेलिंग’ ही कला आहे. इथली प्रत्येक आई आपल्या बाळाला गोष्टी सांगते, अंगाई गाते. इथे बालपणात प्रत्येकजण आजी-आजोबांच्या गोष्टींमध्ये, केव्हा ना केव्हा तरी रमला आहे. दोन हजार वर्षांपूर्वी भरतमुनी यांनी ‘नाट्यशास्त्र’ लिहिले. तेव्हा त्यांनी म्हटले होते की, ‘नाट्यम् भावयति लोकम्’ म्हणजे कला विश्वाला भावना देते.
कालिदासांनी जेव्हा जगविख्यात ‘अभिज्ञान शकुंतलम्’ लिहिले, तेव्हा शास्त्रीय नाट्याला नवी दिशा दिली. भारताच्या प्रत्येक गावाची स्वतःची वेगळी परंपरा आहे, प्रथा आहे. आपल्याच देशात नादब्रह्माची संकल्पना आहे, हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाने जगाला सांगितले. सृजनशीलतेच्या क्षेत्रातील भारतीय शक्तीची कल्पना यातूनच जगाला समजली. ही शिखर परिषद सुरू होण्यापूर्वीच पहलगाम दहशतवादी हल्ला झाला. मात्र, भारत हा दहशतवादाला घाबरणारा देश नाही, असा ठोस संदेशही इथे जमलेल्या जगभरातील मान्यवरांनी जगाला दिला.
दृकश्राव्य आणि मनोरंजन क्षेत्राचे विश्वरूप दर्शन, जगातील कोट्यवधी आशयनिर्मितीकारांना घडले ते पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाहिलेल्या स्वप्नामुळे, केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण विभाग आणि महाराष्ट्र राज्य सरकारच्या सहकार्याने. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात ‘वेव्हज’ शिखर परिषदेचा पहिले लाभार्थी महाराष्ट्र हे राज्य ठरले. महाराष्ट्र सरकारसोबत, विविध क्षेत्रातील एकूण आठ हजार कोटींचे करार पूर्ण झाले. यातूनच नवी मुंबईत ‘वेस्टन ऑस्ट्रेलिया विद्यापीठ’ आणि ‘यॉर्क विद्यापीठ’ यांचे भव्य कॅम्पस उभे राहणार असून, यात ‘आर्टिफिशिअल इंटिलिजन्स’, सायबर सुरक्षा, अर्थशास्त्र आणि आशयनिर्मिती क्षेत्रातील जागतिक दर्जाचे अभ्यासक्रम शिकवले जाणार आहेत. ज्या पालकांना त्यांच्या पाल्यांना आर्थिक किंवा अन्य कारणास्तव जागतिक विद्यापीठात शिक्षणासाठी पाठवणे शक्य नसते, त्यांच्यासाठी ही दरी मिटविण्याचा हा प्रयत्न आहे. अशी एकूण दहा ते 12 विद्यापीठांची उभारणी याच तिसर्या मुंबईत होणार आहे.
‘गोदरेज’ म्हणजे विश्वास. हीच ‘गोदरेज’ कंपनी आता पनवेलमध्ये मोठा स्टुडिओही उभारणार आहे. यानिमित्ताने किमान दहा हजार रोजगार उत्पन्न होणार आहेत. यात किमान तीन हजार कोटींची गुंतवणूक होणार असून, ‘एआय पॉवर’ आणि जगातील उत्तम तंत्रसुसज्ज असा हा स्टुडिओ असणार आहे. जागतिक स्तरावर आशयनिर्मिती करण्यासाठी आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट एका छताखाली उपलब्ध होईल, असे या ‘वेव्हज’ परिषदेचे वैशिष्ट्य होते. व्यावसायिकांच्या झालेल्या बैठकांमध्ये, एकूण 971 कोटींचे करार खासगी क्षेत्रात झाल्याचीही नोंद आहे.
या निमित्ताने ‘वेव्हज’ मनोरंजन पुरस्कार जागतिक स्तरावर पोहोचेल, त्याची दखल घेतली जाईल, इतका प्रचंड व्याप असणारा असेल. ‘ऑस्कर’ आणि तत्सम दर्जाच्या पुरस्कारांना तगडे आव्हान देण्याच्या दृष्टीने, हे पाऊल असणार आहे. जागतिक पटलावर भारत हा आशयनिर्मितीच्यादृष्टीने ‘सॉफ्ट पॉवर’ म्हणून गणला जाईल. भारत हा पूर्वांपारच सिनेमा आणि आशयनिर्मितीमुळे जगभरात पोहोचला. रशियात राज कपूर यांची लोकप्रियता असो, ‘कान’, फ्रान्समध्ये ‘सत्यजित रे’, ‘ऑस्कर’मध्ये ‘आरआरआर’, एआर रेहमान यांची धून यामाध्यमातून, भारताने आपली छाप पाडण्यात कुठली कसर ठेवलेली नाही. वेगळी कहाणी आहे. भारत डिजिटल क्षेत्रात सुसज्ज आहे. परवडणारा मोबाईल डेटा, स्वस्त मोबाईल फोन्स आणि गावपातळीवरील ‘कनेक्टिव्हिटी’ हा पाया तयार झाला आहे.
भारतीय आशयनिर्मात्यांनी, पूर्णपणे मोबाईलवर शूट केलेला सिनेमा तयार केला. मध्यंतरी ‘कोविड’ काळात ‘फायटिंग सिन्स’ मोबाईलवर शूट करून, प्रचंड व्हायरल झालेली मुलेही आपण पाहिली. मराठी आशयनिर्मिती करणार्यांच्या दुनियेत, गावाखेड्यापासून ते घरातल्या किचनपर्यंत कॅमेरा पोहोचला. भारताच्या खेड्यापाड्यातील प्रत्येकाचीच गोष्ट जगापुढे पोहोचू लागली. ‘रेड सॉईल स्टोरी’सारखे मालवणी भाषेतील चॅनेलही, 30 हून जागतिक भाषांमध्ये प्रदर्शित केले जातात. याला पाहणारा लाखोंचा चाहता वर्ग आहे. ‘एआय’सारखे टूल्स वापरून, नक्कीच भारतातील युट्यूबर्सना जागतिक बाजारपेठेत उतरणे सहज शक्य आहे. याशिवाय भारतातील तरुणाई गेमिंग, थ्री-डी अॅनिमेशन क्षेत्रातही आपली दमदार कामगिरी दाखवत आहे. क्रोमा-शूट असो वा ‘एआय’ मॉडल निर्मिती असो, भारतीय आशयनिर्मितीकार कुठेही मागे नाही.
गरज होती ती ज्यांना एका छताखाली आणून त्यांच्यापर्यंत जागतिक बाजारपेठ खुली करण्याची, ते काम ‘वेव्हज’च्या माध्यमातून झाले. ‘वेव्हज’ बाजारमध्ये एकूण तीन हजार बी-2-बी बैठका पार पडल्या. राज्यात जागतिक दर्जाचा स्टुडिओ उभारण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी, मोशन पिक्चर्सनेही चर्चा केली आहे. पुढील पाच वर्षे भारतासाठी महत्त्वाची मानली जात आहेत. मनोरंजन क्षेत्रात भारत येत्या काळात, अधिक चांगला ठसा उमटवू शकतो.
‘वेव्हज’मध्ये झालेल्या एकूण विविध 55 ‘मास्टरक्लास’मध्ये सिनेमा, थ्री-डी, गेमिंग, व्हीएफएक्स, संस्कृती, ‘एआय’, क्रिएटर्स इकोनॉमी, वर्ल्ड स्टुडिओ, जाहिरात, संगीत, शास्त्रीय संगीत, कला, संस्कृती, सभ्यता, भारतीय खेळ आणि माध्यमे, जेन-झी आणि त्यांची आशयरुची, पत्रकारिता, ‘स्टोरी टेलिंग’, अशा आशयनिर्मिती क्षेत्राच्या सर्वांगाला स्पर्श करणार्या विविध चर्चासत्रांत, तितक्याच तोडीच्या वक्ते आणि मार्गदर्शकांनी उपस्थिती दर्शविली. असे म्हणतात, ज्ञान हे चौफेर आहे. घेणार्याला ते टीपता आले पाहिजे. तसाच आशय हा सुद्धा चौफेर आहे, तुम्ही तो कसा टीपून सादर करता, यावर गोष्टी अवलंबून आहेत.
भारतासारख्या वैविध्यपूर्ण देशाने ही गोष्ट हेरली तर भारतीय सिनेमा, डॉक्युड्रामा, वेबसिरिज भविष्यात एक नवी ताकद म्हणून उभे राहणार आहेत. भारतीय आशयनिर्मितीचा स्वतःचा एक वर्ग आहेच. शिवाय जगापुढे पर्याय दिल्यानंतर, प्रस्थापितांची मक्तेदारी मोडीत काढण्याच्या दृष्टीने हे पहिले पाऊल असेल. ज्याप्रकारे द. कोरियाने जगात आपल्या कलाकृतींनी तरुणाईला वेड लावले आहे, त्याचप्रकारे भारतीय सिनेमा, संगीत आणि आशयनिर्मिती क्षेत्रातील प्रत्येकजण, आपला प्रेक्षक जागतिक पटलावर नेऊन ठेवेल. राहिला प्रश्न प्रशिक्षण आणि गुंतवणुकीचा, तर त्यादृष्टीने सरकारही एक पाऊल पुढे आहे. केंद्र सरकार 100 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक या क्षेत्रात करणार आहे. मुंबईतील गोरेगाव दादासाहेब फाळके चित्रनगरीत ‘आयआयटी’ आणि ‘आयआयएम’ दर्जाच्या, सृजनशील आशयनिर्मितीचे ‘आयआयसीटी’ प्रमुख संस्थान उभे राहण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. भारत पूर्वांपार या क्षेत्रात पुढेच आहे, गरज होती ती जागतिक व्यासपीठावर जाण्याची, तेही काम झाले. आता गरज आहे ती नव्या गोष्टीची...
तेजस परब