लक्ष्मीचा ज्ञानयज्ञ

    05-May-2025
Total Views |

Lakshmi Lele
 
 विशेष मुलांच्या आयुष्यात आनंद खुलवण्यासाठी झटणार्‍या निर्वाणा स्कूलमधील लक्ष्मी विनायक लेले यांच्याविषयी...
 
लक्ष्मी यांचा जन्म गिरगावात झाला. त्यांचे बालपण गिरगावात गेले. त्यानंतर त्या डोंबिवलीत स्थायिक झाल्या. त्यांना अक्षरओळख ही गिरगावातील चिकित्सक बालवाडीतून झाली. पुढे वयाच्या सहाव्या वर्षी त्या डोंबिवलीत स्थायिक झाल्या. त्यामुळे त्यांचे पुढील सर्व शिक्षण डोंबिवलीत झाले. डोंबिवलीतील सरस्वती विद्यामंदिर येथून त्यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. दहावी होताच त्यांचा विवाह विनायक यांच्याशी झाला. शिक्षणाची आवड असल्याने त्यांनी लग्नानंतरही आपले शिक्षण अर्धवट सोडले नाही. लक्ष्मी यांचे पती हे इन्शुरन्स कंपनीत कामाला होते. त्यामुळे त्यांची बदली होत असे. पतीची बदली झाल्याने लक्ष्मी यांनी रत्नागिरी येथून बारावीचे शिक्षण घेतले. लक्ष्मी यांनी इतिहास विषयात पदवी संपादन केली आहे. तसेच संस्कृत आणि कीर्तनशास्त्र विषयातही त्यांनी पदवी संपादन केली. तर मराठी विषयात ‘एमए’ केले आहे. दरम्यानच्या काळात त्यांनी ‘डिप्लोमा इन मेंटली रिटायर्ड’ हा अभ्यासक्रम पूर्ण केला. सासू-सासरे आणि पती यांच्या पाठिंब्यामुळेच लग्नानंतर संसार आणि शिक्षण या दोन्ही जबाबदार्‍या लिलया पेलता आल्या, असे लक्ष्मी सांगतात. लक्ष्मी या मध्यमवर्गीय कुटुंबातील होत्या. त्यांची आई स्वयंपाकाची कामे करत असे, तर वडिलांचा टेलरिंगचा व्यवसाय होता. लक्ष्मी आणि त्यांचा एक भाऊ असे त्यांचे चौकोनी कुटुंब होते. लक्ष्मी यांनी ‘बीएड’ ही पदवीदेखील संपादन केली आहे.
 
शिक्षण पूर्ण होताच त्यांना नोकरीची संधी चालून आली. त्यांना 1988 साली कल्याणच्या ‘सदिच्छा’ या गतिमंद मुलांच्या शाळेत नोकरीची संधी चालून आली. त्या विशेष शिक्षिका म्हणून, त्याठिकाणी रूजूही झाल्या. 2012 साली त्यांना शाळेत बढती मिळाली आणि त्यांच्या खांद्यावर मुख्याध्यापिका पदाची धुरा देण्यात आली. शाळेमध्ये विद्यार्थीप्रिय शिक्षिका म्हणूनच त्यांची ओळख आहे. ‘सदिच्छा’ संस्थेत काम करताना, तेथील अध्यक्ष द. अ. संत यांच्याकडून त्यांना खूप काही शिकता आले, असे त्या सांगतात. 33 वर्षे आणि आठ महिने नोकरी केल्यानंतर, सन्मानपूर्वक 2020 साली ‘सदिच्छा’ येथून नोकरीतून त्या सेवानिवृत्ती झाल्या. त्यानंतरही 2023 सालापर्यंत, त्यांनी ‘सदिच्छा’ संस्थेला आपली सेवा दिली. शारीरिक कारणामुळे कल्याणला जाणे येणे जमत नसल्याने, अखेर त्यांनी ‘सदिच्छा’मधील्स सेवा थांबवली. त्यानंतर तीन महिने डोंबिवलीत ‘सक्षम’ संस्थेत त्यांनी काम केले. त्यानंतरच्या काळात कौटुंबिक अडचणीमुळे त्यांनी नऊ महिने कामातून काही काळ विश्रांती घेतली. कौटुंबिक अडचणीतून सावरत, त्यांनी पुन्हा एकदा कामाला सुरुवात करायचे ठरविले. डिसेंबर 2025 साली त्या ‘निर्वाणा’ संस्थेत रूजू झाल्या. या संस्थेत काम करताना आनंद मिळत असून, शारीरिक व्याधीही दूर पळल्या आहेत. रक्तदाबाची गोळीही आता बंद झाली असल्याचे त्या सांगतात. सामाजिक कार्यात हिरीरीने भाग घेणार्‍या लक्ष्मी यांना, अध्यात्माचीदेखील आवड आहे. ‘गीता धर्म मंडळ, पुणे’ याद्वारे ‘ज्ञानेश्वरी’, ‘तुकारामांची गाथा’ इत्यादी ग्रंथांचा अभ्यासक्रम, विशेष प्राविण्यासह पूर्ण केला. दासबोधाचा अभ्यासक्रम त्यांनी पत्राद्वारे पूर्ण केला. डोंबिवली येथील कीर्तन महाविद्यालयातून ‘कालिदास विद्यापीठ’ नागपूर यांच्याद्वारे, कीर्तनकार अशी पदवी त्यांनी प्रथम श्रेणीत संपादन केली. याशिवाय ‘योग साधना’, ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’, ‘रेकी प्रणित ग्रॅड मास्टर ऑफ’ अशा अनेक क्षेत्रात त्यांनी, प्राविण्य मिळविले आहे.
 
“सदिच्छा’ संस्थेत काम करत असताना विशेष मुलांना शिकविणे, संस्थेचे व्यवस्थापन आणि समाजकल्याणशी मेळ घालणे अशा प्रकारची कामे त्यांनी केली. विद्यार्थी आजही त्यांच्या अडचणी घेऊन माझ्याकडे येतात. मी त्यांचा विश्वास कमवला आहे, यांचा जास्त आनंद होतो,” असे लक्ष्मी यांनी सांगितले.
 
“निर्वाणा’ संस्थेत पाच ते 11 वयोगटातील विशेष मुले आहेत. या शाळेत चाणक्य लायब्ररी, प्री-स्कूल आहे. या विशेष मुलांवर, येथे आम्ही वेगवेगळे प्रयोग करतो. हे सर्व करत असताना मला आनंद मिळतो,” असे लक्ष्मी सांगतात.
लक्ष्मी यांनी दहा ते 15 मुलांना, आतापर्यंत स्वतःच्या पायावर उभे केले आहे. विशेष मुलांना नोकरीला लावणे, यासाठी त्यांना विशेष प्रयत्न करावे लागतात. त्यासाठी त्यासंबंधित संस्थांच्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांसोबत बैठक होते. त्यातून त्या विशेष मुलांना, चांगले वातावरण नोकरीच्या ठिकाणी तयार होते. मुलांनी जो माझ्यावर विश्वास ठेवला आहे, हीच माझी खरी संपत्ती असल्याचे लक्ष्मी यांनी सांगितले.
 
लक्ष्मी यांना समाजसेवेची आवड असल्याने निवृत्तीनंतरही त्यांची गरजू विद्यार्थी, पालक व इतरांना निरपेक्षपणे अव्याहत मदत सुरू आहे. मूर्तीमधील परमेश्वरापेक्षा, माणसां-माणसांतील परेमश्वर पाहणे आणि माणसाच्या गरजेला उपयोगी पडणे, याला लक्ष्मी नेहमीच प्राधन्य देतात. लक्ष्मी यांच्या कामाची दखल घेऊन, त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. लक्ष्मी यांच्या पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा!