- "अंवतिका एक्सप्रेस" मधील घटना पालघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
05-May-2025
Total Views |
मुंबई: ( Hindu woman travelling in Avantika Express beaten up by religious fanatics) हातात रुद्राक्षाची, तुळशीची माळ आणि मनगटावर ‘छत्रपती’ नाव कोरलेले असल्याच्या रागातून मुंबईहून इंदोरकडे जाणार्या ‘अवंतिका एक्सप्रेस’मधून प्रवास करणार्या एका हिंदू महिलेला धर्मांधांनी बेदम मारहाण केली. शनिवार, दि. 3 मे रोजी हा प्रकार घडला. याप्रकरणी पालघर लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाण्यात राहणार्या अॅड. शितल भोसले या त्यांच्या मुलीला भेटण्यासाठी निघाल्या. त्या शनिवारी रात्री ‘अवंतिका एक्सप्रेस’च्या अनारक्षित डब्यामधून प्रवास करत होत्या. यावेळी भोसले यांच्या हातातील रुद्राक्षाची माळ आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव कोरलेले पाहून एका मुस्लीम महिलेने अॅड. शितल भोसले यांची कुरापत काढली. त्या महिलेने भोसले यांना हटकले आणि त्यांच्याशी हुज्जत घालायला सुरुवात केली. “आप ये रुद्राक्ष पेहेनते हो, क्या बकवास हैं,” असे ती महिला म्हणाली. यावर भोसलेंनी “तुझ्या बुरख्याचा मला त्रास होतो, असे मी म्हटले का? मग तुला माझ्या माळांचा त्रास का होतो?” असा प्रतिप्रश्न केला. यावरून वाद चिघळला आणि प्रकरण मारहाणीपर्यंत पोहोचले. अॅड. भोसले यांना धर्मांध महिलेसह तिच्या कुटुंबातील अन्य महिला आणि पुरुष सदस्यांनी मारहाण केली. ही मारहाण पालघर रेल्वे स्थानक ओलांडत असताना झाली.
बोरिवलीनंतर ‘अवंतिका एक्सप्रेस’ थेट वापी स्थानकात थांबते. वापी स्थानक आल्यानंतर अॅड. भोसले यांनी होम गार्ड आणि स्थानिक पोलीस यांच्याकडे तक्रार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना मदत मिळू शकली नाही. पुढे रेल्वे हेल्पलाईनवर तक्रार नोंदवल्याने वलसाड येथे रेल्वे पोलिसांनी हल्ला करणार्या त्या महिला व पुरुषाला ताब्यात घेतले. ही घटना पालघर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असल्याने गुजरात पोलिसांनी महिलेला प्राथमिक उपचार करून पालघर पोलिसांकडे रविवारी सकाळी 9 वाजता वर्ग केले. रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. “ती धर्मांध महिला मारहाणीवरच थांबली नाही, तर तिने आपल्यावर धारदार वस्तुने वार केला, तसेच आपल्याला विवस्त्र करण्याचादेखील प्रयत्न केला,” असा आरोप अॅड. भोसले यांनी केला.
महिलांची सुरक्षा ऐरणीवर
धावत्या रेल्वेमध्ये ‘रेल्वे सुरक्षा बला’चे म्हणजेच ‘आरपीएफ’ कर्मचारी गस्तीवर असूनसुद्धा अशा घटना कशा घडतात, असा प्रश्न उपस्थित होत आहे. धारदार वस्तू घेऊन रेल्वेत प्रवास करण्यास मनाई असताना त्या धर्मांध महिलेने पर्समधून ते काढून महिलेवर वार करणे, हे सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. पीडित महिलेला वापी स्थानकात मदत मिळाली नाही; तिला पुढे वलसाड स्थानकात मदत मिळाली, हा रेल्वे प्रवाशांच्या विशेषतः प्रवासी महिला-मुलांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न आहे. याबाबत पश्चिम रेल्वे जनसंपर्क अधिकारी यांच्याकडे या घटनेची चौकशी केली असता, त्यांना याबाबत माहिती नव्हती. “माहिती घेऊन कळवतो,” असे सांगून त्यांनी पुन्हा फोन उचलले नाहीत.
माझ्या मानेवर वार करण्याचा प्रयत्न
‘अवंतिका एक्सप्रेस’ने प्रवास करत असताना माझ्या शेजारी बसलेल्या रुबिना पठाण नावाच्या मुस्लीम महिलेने माझ्या हातातील रुद्राक्ष माळेबाबत “ये क्यो पेहेनते हो?” असे विचारून ‘बकवास!’ असे उपहासात्मक तोंड केले. त्यानंतर मीही “तुमच्या बुरख्याबाबत त्रास होतो, असे मी म्हटले का?” असे विचारले. यानंतर चर्चेदरम्यान त्या महिलेने वाद सुरू करून माझ्या मानेवर वार करण्याचा प्रयत्न केला. पण सुदैवाने तो वार मानेएवजी हातावर झेलला. संपूर्ण बोगीमध्ये तीन महिलांमध्ये मी एकटी हिंदू महिला आणि इतर सर्व मुस्लीम होते. हा एकंदरीत माझ्या धर्मावर आघात होता. जर मी हा वार हातावर घेतला नसता, तर आज मी कदाचित तुमच्यासमोर जिवंत नसते.
- अॅड. शीतल भोेसले, पीडित हिंदू महिला प्रवासी
हा तर हिंदूंना लक्ष्य करण्याचा प्रयत्न
या घटनेमुळे हिंदूंना लक्ष्य केले जात असल्याचे स्पष्ट होत आहे. धर्मांधतेचा कळस गाठणार्या पहलगाम हल्ल्यानंतर गेल्या काही दिवसांत हिंदूना अल्पसंख्याक असणार्यांकडून लक्ष्य करण्याचे प्रमाण वाढले आहे. वरील घटनेतही त्यांनी तसेच केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई करावी. एकूणच धर्मांधतेचा कळस गाठणार्यांना शासनाने कठोर कारवाई करून त्यांच्यावर जरब बसवावी.
- श्रीपाद पाटील, पालघर तालुका प्रखंड अध्यक्ष, विश्व हिंदू परिषद