महाराष्ट्रातील सध्याच्या समीकरणांची मुहूर्तमेढ 72 तासांच्या सरकारने रोवली!

- मुख्यमंत्री फडणवीस यांची तुफान फटकेबाजी; ‘गौरवशाली महाराष्ट्र’ कार्यक्रम संपन्न

    05-May-2025
Total Views |

CM Devendra Fadnavis Gauravshali Maharashtra program
 
मुंबई: (CM Devendra Fadnavis Gauravshali Maharashtra program) “मी तीनवेळा मुख्यमंत्री झालो. आधी सलग पाच वर्षे आणि त्यानंतर 72 तास. त्यामुळे सर्वांत अधिक आणि सर्वांत कमी काळ मुख्यमंत्री होण्याचा विक्रम माझ्या नावावर आहे. तर सर्वाधिक वेळा आणि सर्वांत कमी वेळ म्हणजे 72 तास उपमुख्यमंत्री होण्याचा विक्रम अजित पवार यांच्या नावावर आहे. पण, महाराष्ट्रात सध्या असलेल्या समीकरणांची मुहूर्तमेढ त्या 72 तासांच्या काळातच रोवली गेली होती,” अशी टोलेबाजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवार, दि. 3 मे रोजी केली.
 
अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने वरळी येथे आयोजित ‘गौरवशाली महाराष्ट्र’ या कार्यक्रमात ते बोलत होते. महाराष्ट्राच्या आजी-माजी मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री नारायण राणे, अशोक चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, खा. सुनील तटकरे यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते.
 
मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, “सगळेच माजी मुख्यमंत्री आले असते, तर आनंद झाला असता. कारण, हा मंच तसा राजकीय नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जरी या कार्यक्रमाचे आयोजन केले असले, तरी हा गौरवशाली महाराष्ट्राच्या महोत्सवाचा मंच आहे. त्यामुळे मला असे वाटते की, गौरवशाली महाराष्ट्राचा ज्यांना अभिमान आहे, अशा सगळ्यांनी येथे येऊन सत्कार घेतला असता, तर ते अधिक औचित्यपूर्ण ठरले असते. पण, काही हरकत नाही. जे आले त्यांचा सत्कार आहे. जे नाही आले त्यांचा मनातून सत्कार आहे,” असा टोला त्यांनी लगावला.