बालरंगभूमीची पार्श्वभूमी

    04-May-2025
Total Views |

बालरंगभूमीची पार्श्वभूमी


नाटकामधील प्रत्येक विभाग समान पद्धतीने महत्त्वाचा असतो. सगळ्या विभागांच्या संपूर्ण योगदानावरच नाटकाचे यशापयश अवलंबून असते. त्यामुळे प्रत्येक विभागाची माहिती बालकलाकारांना होणे आवश्यक असते. यातूनच त्यांची नाटकाविषयीची समज अधिक व्यापक होत जाते. या लेखात नाटकाच्या पार्श्वभूमीचा घेतलेला आढावा...
लरंगभूमीची पार्श्वभूमी म्हणजे त्याचा इतिहास, त्याची सुरुवात याबद्दल मी इथे बोलणार नाही, तर पार्श्वभूमी म्हणजे पडद्यामागील असे कार्य, जे प्रेक्षकांना कधीच दिसत नाही. प्रेक्षक फक्त कल्पना करू शकतात, अंदाज बांधू शकतात. नाटक जर एक इमारत असेल, तर त्याची बांधणी उत्तमच हवी, त्याचा पाया भक्कम हवा. कुठल्याही नाटकाचे प्रस्तुतीकरण चांगले किंवा वाईट, हे त्याची पार्श्वभूमी कशी आहे, यावरून ठरते. विषय पोहोचण्यासाठी त्याची संहिता, लेखन, दिग्दर्शन महत्त्वाचे असते, तसेच सादरीकरणासाठी कलाकार आणि पार्श्वभूमीचे कलाकार महत्त्वाचे असतात. पार्श्वभूमीवर काम करणे सोपे नाही, प्रचंड मेहनतीचे काम असते. त्यांना कामगारसुद्धा म्हणता येईल; पण हे कामगार कुशल असतात. त्यांना कलादृष्टीही असावी लागते. त्यामुळे यासाठी अनुभव संपन्न, प्रशिक्षित कामगारच हवेत. नुकताच कामगार दिवस होऊन गेला आणि आम्हीही नुकतेच महानाट्य सादर केले. काही नाटकांची मांडणी आणि मागणी असते, ती जबरदस्त पार्श्वकलाकारांची. ते जर नसतील, तर सादरीकरण अशक्यच असते. त्यात महानाट्य असेल, तर काही विचारूच नका. सगळेच विभाग महत्त्वाचे असतात आणि जबाबदार्‍याही मोठ्या असतात.

प्रौढांचे नाटक आणि बालनाट्य सादर करण्यासाठीचे पडद्यामागील कलाकार म्हणजे पार्श्वभूमीचे कलाकार, यात खूप फरक आहे. म्हणजे विभाग सारखेच, पण त्याची कार्यपद्धती आणि उद्दिष्टे वेगळी असतात. आपण ती समजावून घेणे महत्त्वाचे आहे. त्याअगोदर त्यातले विभाग जाणून घेऊ या.

मुख्यतः हे विभाग असतात नेपथ्य, प्रकाशयोजना, पार्श्वसंगीत, रंगभूषा, वेशभूषा, कपडेपट, रंगमंच व्यवस्था, तिकीट विक्री, जाहिरात विभाग, संस्थेचे व्यवस्थापन, प्रवास नियोजन. व्यावसायिक प्रौढ रंगभूमी आणि बालनाट्य यात आयोजन आणि नियोजन सारखेच लागते; पण कार्यपद्धती निराळी असते. व्यावसायिक रंगभूमी ही आर्थिक गणितावर अवलंबून असते, तर बालरंगभूमी हीसुद्धा निश्चितच आर्थिक गणितांवर अवलंबून असते. पण, त्याचा दृष्टिकोन हा शैक्षणिक अधिक असतो. बालनाट्य संस्कृती आणि कार्यपद्धती ही, कालानुरूप बदलत चालली आहे. पूर्वी ‘बॅकस्टेज’ हे प्रौढ कलानुरुप बघायचे. पण, आता मुलांना स्वावलंबी करण्याच्या दृष्टीने आणि जबाबदारीने काम करण्यासाठी तसेच नाटकाविषयीची त्याची समज वाढवी, या दृष्टीने त्यांचा सहभाग महत्त्वपूर्ण ठरतो.

बालनाट्य मी लहानपणापासून करत असल्याने मला आठवते आहे, ज्या गोष्टी आज मुलं करतात, त्या गोष्टी आम्हाला करायला देत नसत. त्या वेळेला आम्हाला फक्त अभिनयच करावा लागे, पण आता तसे नाही. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना नाटकाच्या सर्व बाजू समजावून सांगून, त्यात मुलांना पुढाकार घेण्यासाठी प्रवृत्त केले जाते. त्यांच्या इतर कलागुणांना जसे की, नृत्यकला, चित्रकला, गायन अशा कलागुणांना वाव मिळतो. एक एक विभाग घेऊन, आपण समजावून घेऊया.

नेपथ्य

मुलांना झाडे, पाने, फुले रंगवायला सांगून, रंगमंच सज्जा करणे, रंगसंगतीचा उपयोग करून ते रंगमंचावर कसे दिसेल, याचा विचार करायला लावणे. नेपथ्याची रेखाटणी करणे, रंग-वस्तूंच्या प्रमाणाचा समतोल सांभाळणे, रंग आणि वस्तूंची विषयाला धरून मांडणी करणे, त्याचा कलाकारावर होणारा परिणाम, स्थळ, काळ आणि वेळ याचा विचार करून नेपथ्य करणे, यात मुलांचा सहभाग असतो. यातून ‘इंटिरिअर डिझायनिंग’च्या कोर्समध्ये जे शिकवतात, त्यातला एक विषय ते नकळत ही मुले शिकतात. घरी जे करून पाहता येत नाही, ते इथे करतात. कचर्‍यातूनही कला करायला शिकतात. कमी सामग्रीतून विश्व उभे करायला शिकतात.

प्रकाशयोजना

खरंतर प्रकाशयोजनेचे मुलांना प्रचंड आकर्षण असते; पण प्रकाशयोजना ही नेहमीच आदल्या दिवशी होत असल्याकारणाने आणि त्याचा सराव आर्थिकदृष्ट्या शक्य नसल्याकारणाने, ते राहून जाते. पण, स्पॉट लावत आणि काढत असताना, मुलं त्या दिव्यांकडे एकटक बघतात. प्रकाशयोजनाकार आला की त्याच्या कार्यपद्धतीकडे बघत बसताना, निदान दोन ते तीन मुले तरी दिसतातच. सरकारने सांस्कृतिक मंडळाने प्रकाशयोजनेसाठी जर वेगळे आणि सुरक्षेच्या दृष्टीने ‘चाईल्ड फ्रेंडली रंगमंच’ दिले, तर या क्षेत्रात नक्कीच प्रगती होईल. बालपणीच त्यांना प्रकाश आणि त्याचा वापर तसेच त्याची हाताळणी, हा विषय घेऊन प्रकर्षाने शिकवता येईल.

पार्श्वसंगीत

पार्श्वसंगीत हे संगीतकाराने तयार करून पाठवलेले असते. कधी तरी दोन ट्रॅक्स मिसळून ते वाजवायचे असते. मुलं यात रस घेतात. “रॅडी, मी आज म्युझिक करू?” असा आल्या आल्या प्रश्न विचारतात आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण मोठ्यांनासुद्धा लाजवेल असे अचूक पार्श्वसंगीत ते देतात. ज्याला संगीताचा कणव आहे, तो पुढाकार घेतो किंवा ज्याला त्यातले तंत्र आवडते तो तयार असतो.

रंगभूषा

मुलांना प्रयोग करून बघायला खूप आवडते. पूर्वी आई मला तिच्या लिपस्टिकला हात लावायला द्यायची नाही. पण, आता सौंदर्यसामग्री सहज मिळते नि आधुनिकतेमुळे त्याची शुद्धता वाढल्याकारणाने, मुले सहज त्याचा उपयोग करतात. त्यांना त्यांचा मेकअप करायला आवडतेच. पण, सहकलाकाराचा पण करून द्यायला आवडते. हे करत असताना स्नेह वाढतो, आपुलकी वाढते, शिवाय आनंद मिळतो तो वेगळाच.

वेशभूषा

माझ्या असे लक्षात आले आहे की, आताशा विविध प्रकारची कापडे मिळायला लागली आहेत. त्यामुळे वेशभूषेतही नावीन्य आले आहे. प्राण्याचे, राजा-राणीचे चकचकीत कपडे तयार करणे सहज शक्य आहे. आता मुलंच सांगतात, आपण असे करू शकतो,असे डिझाईन करू, हे कापड वापरू. त्यांचे विचार किती प्रगल्भ आहेत, हे पाहून कोणालाही कौतुक वाटेल.

कपडेपट

स्वतःच्या कपड्यांची घडी स्वतःच करायची, त्यांना नीट ठेवायचे, दहा वर्षांच्या मुलाला, मी एखाद्या पाच वर्षांच्या मुलाची मॅनेजर करते. त्यांनी छोट्या मुलाचे कपडे घडी करायचे आणि लहान मुलालाही शिकवायचे. मुले जबाबदारी घेतात आणि आनंदाने पार पडतात.

रंगमंच व्यवस्था

हे काम करायला तर मुलांना प्रचंड आवडते. वेळेत वस्तू आणून ठेवणे, ती सुंदर ठेवणे आणि तिचे काम झाल्यावर जागेवर ठेवणे, हे काम त्यांना आवडते आणि तेही एक ते दहा या अंक मोजणीत. त्यांच्यात स्पर्धा लागते, जो पटापट करेल त्याला बक्षीससुद्धा आम्ही देतो! आम्ही ‘षटकोन बालनाट्य महोत्सव’ सादर केला, तेव्हा रंगमंच व्यवस्थेची संपूर्ण जबाबदारी अतिशय सुंदररित्या मुलांनी पार पाडली.

तिकीट विक्री

आपले नाटक आहे, त्याची तिकीट विक्री आपणच करायला पाहिजे. मोठ्यांच्या देखरेखीखाली मी तर त्यांना तिकीट काऊंटरवरसुद्धा बसवते. प्रेक्षक काय विचारतात, कसे बोलतात, तिकिटांची रांग कशी सांभाळायची, आसन क्रमांक कसा शोधून द्यायचा, अशी छोटी पण महत्त्वाची कामे दिल्यावरच मुले मोठी होतात.

जाहिरात विभाग

आपले नाटक ही आपली जबाबदारी. त्याच्याबद्दल अभिमान वाटणे, त्याचा प्रचार-प्रसार करणे, ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळे रील बनवणे, फोन करून नाटकाची माहिती सांगणे याकरिता प्रोत्साहित करते. मग मुले तसे करतात आणि येऊन सांगतात. रॅडी माझी 20 माणसे येणार आहेत आणि कोणी चुकले, गडबडले तर ओरडतात अर्थातच प्रेमाने, अरे नीट वाक्य घे, तुला बघायला एक हजार माणसे येणार आहेत!

संस्थेचे व्यवस्थापन

संस्थेचे व्यवस्थापन कसे केले जाते,याची माहितीही मुलांना दिली जाते. त्यांना एव्हाना प्रेम आणि आपुलकी वाटत असल्यामुळे, ते संस्थेचा विचार करतात आणि संस्था मोठी होण्यासाठी आणखीन काय करायला हचे यावर चर्चा करतात.

प्रवास नियोजन

प्रवासात एकत्र येऊन कोण, कुठे बसणार, सुरक्षेच्या दृष्टीने कसे वागायला हवे, गाडी कुठे थांबवायची याचे निर्णय मी त्यांच्यावर सोपवते म्हणा किंवा त्यांना नियोजनात सामील करून घेते. यातून त्यांना स्वातंत्र्य मिळते आणि आनंद द्विगुणित होतो.
अशी पार्श्वभूमी असल्यावर, बालरंगभूमी अधिक परिपूर्ण ठरते आणि तिला अधिक अर्थ मिळतो. अशा पार्श्वभूमीवर बालरंगभूमी तिचा पाया नव्याने रचते आहे, भक्कम करते आहे.


रानी राधिका देशपांडे
7767931123