मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या मालमत्ता करात वाढ झाल्यानंतर मंत्री आशिष शेलार यांनी आता यावरून तत्कालिन महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. शुक्रवार, ३० मे रोजी त्यांनी आपल्या 'एक्स' अकाऊंटवर पोस्ट करत मविआ सरकारचा भ्रष्ट कारभार उघड केला आहे.
मंत्री आशिष शेलार म्हणाले की, "कोरोनाचे कारण सांगत तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने सन २०२१ ला बिल्डरांना प्रिमियममध्ये ५० टक्के सूट देण्याचा घसघशीत निर्णय घेतला. सामान्य मुंबईकरांना एक रुपयांची मदत केली नाही, पण बिल्डरांच्या ६०० प्रकल्पांवर सुमारे १२ हजार कोटींची खैरात करण्यात आली."
करवाढ करून मुंबईकरांना कोणत्या सेवा-सुविधा देणार?
"मुंबईकरांच्या घरांचे भाव तर कमी झाले नाहीच उलट मुंबई महापालिकेला थेट आर्थिक फटका बसला आणि पालिकेचे आर्थिक गणित कोलमडले. त्यामुळे कर वाढ करावी लागेल याचे सुतोवाच तत्कालीन पालिका आयुक्तांनी २०२१-२२ पासूनचे पुढचे सगळे अर्थसंकल्प सादर करताना वारंवार केले आहेत. त्यामुळेच आणि त्याचमुळे आता मालमत्ता करात वाढ करुन मुंबई महापालिका बिल्डरांवर खैरात केलेला तो 'महाविकास आघाडी कर' मुंबईकरांच्या खिशातून वसूल करणार आहे. ही कर वाढ करुन तुम्ही मुंबईकरांना कोणत्या सेवा-सुविधा देणार आहात?" असा सवाल मंत्री आशिष शेलार यांनी महापालिकेला केला आहे.