इतिहास अनेक पैलूंनी मांडता येतो, लिहिता येतो आणि सांगता येतो. छत्रपती शिवाजी महाराज या ऐतिहासिक महापुरुषाबद्दल कितीही लिहिले गेले, तरी त्यांच्या कर्तृत्वाची उंची, त्यांच्या पैलूंबद्दल वाचताना आपण नतमस्तक होतो. असेच एक पुस्तक नुकतेच हाती आले. खरं तर, या पुस्तकाबद्दल गेली चार वर्षे झाली आतुरतेने वाट बघत होतो. सुमंत टेकाडे लिखित ‘युगंधर शिवराय.’ आज डॉ.सुमंत टेकाडे यांना जाऊन चार वर्षे झाली. ‘कोविड’मुळे एक चांगली व्यक्ती आपल्यातून निघून गेली. पण, समर्थ म्हणतात ना, ‘मरावे परी कीर्तिरूपी उरावे’ याचे चालतेबोलते उदाहरण म्हणजे डॉ. सुमंत टेकाडे आणि त्यांचेच हे एकमेवाद्वितीय असे पुस्तक म्हणजे ‘युगंधर शिवराय.’
प. पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन झाले. डॉ. श्याम धोंड यांनी या पुस्तकाचे संपादन केले आहे. खरं तर हे पुस्तक म्हणजे दै. ‘तरुण भारत’मधील ‘आसमंत’ पुरवणीतील ‘शिवदीपस्तंभ’ लेखमालेतील लेखांचे संस्करण आहे. तब्बल दोन वर्षे ही लेखमाला प्रकाशित झाली होती. डॉ. श्याम धोंड यांनी तब्बल दोन वर्षे या 104 लेखांवर संस्करण करत, हे साहित्य आता देखण्या पुस्तकरूपाने वाचकांसमोर आहे.
छत्रपती शिवरायांचे उत्तुंग व्यक्तित्व साक्षात उभे करणारे अमोघ शब्द समर्थ रामदासस्वामींनी लिहिलेले आहेत. समर्थांच्या लेखणीचा विलक्षण शिवमहिमा गेली कैक वर्षे आपल्याला भारावून टाकत आहे. कधी लता मंगेशकरांच्या सूरांतून, तर कधी विविध शिवकथाकारांच्या वाणीतून. पिढ्या बदलल्या, पण ही मोहिनी तशीच कायम आहे. कारण, शिवकर्तृत्वच तेवढे रोमांचक आणि वेड लावणारे आहे आणि त्याच धारेत नियोजन आणि व्यवस्थापन याविषयीची उत्कंठा वाढवणारे ‘युगंधर शिवराय’ हे पुस्तक आहे.
‘युगंधर शिवराय’ हे काही नेहमीच्या पठडीतील शिवचरित्र नाही. शिवरायांच्या जीवनातील विविध घटना-प्रसंगांची ही अनोख्या पद्धतीने केलेली उद्बोध उकल आहे. ती जेवढी मर्मस्पर्शी आहे, तेवढीच डोळे उघडणारीही आहे. एकेका प्रसंगावर प्रकाश टाकून, त्याचे निकटदर्शन घडवताना, लेखक त्यामागील शिवरायांचे नियोजन समजावून देत आहे. त्यांचे थक्क करणारे व्यवस्थापनही स्पष्ट करतो आहे. याच निर्दोष नियोजनाने आणि प्रभावी व्यवस्थापनाने शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य उभे केले. महाबलाढ्य शत्रूंना अस्मान दाखवले. मस्तवाल मनसबदार-वतनदारांना वठणीवर आणले. मावळ्यांच्या मनात आणि मनगटांत संकटांना जिंकण्याचा आत्मविश्वास पेरला आणि सामान्य रयतेला सुखाचे अन् सन्मानाचे दिवस दाखवले. गनिमी कावा हा जसा शिवरायांच्या युद्धतंत्राचा वैशिष्ट्यपूर्ण भाग होता, तसेच नियोजन आणि व्यवस्थापन हे त्यांच्या स्वराज्यसिद्धीचे आधारभूत घटक होते. औरंगजेब, आदिलशहा, कुतुबशहा आणि सिद्दी या चांडाळ चौकडीसह पोर्तुगीज, डच, इंग्रज आणि फ्रेंचांनाही राजे पुरून उरले, ते त्यांच्या नियोजन आणि व्यवस्थापनामुळेच. किमान साधनांसह, किंबहुना तुटपुंज्या सैन्यबळानिशी महाराजांनी कमाल पराक्रम आणि परिणाम साधला, तोही या नियोजन आणि व्यवस्थापनाच्याच बळावर! या पुस्तकातून शिवरायांच्या त्याच असामान्य गुणकौशल्यांचा आजच्या आव्हानांच्या संदर्भात सोदाहरण वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे. तो विद्यार्थी आणि व्यावसायिकांनाही उपयुक्त ठरणारा आहे; जागवणारा आहे आणि त्यातून प्रेरणा देणारा आहे.
प्रा. नरहर कुरुंदकर म्हणतात, “भारतीय राज्यांमध्ये शिवाजी हा असा विरळा राजा आहे की, त्याने सदैव संभाव्य परिणामांचा विचार केला. युद्धाची योजना आखताना भूगोलाचा विचार केला. शत्रुपक्षाकडील प्रत्येक गुप्त बातमी आपल्याला मिळेल, याची काळजी घेतली. शिवाजीचे गुप्तहेर खाते आणि युद्धाचे काटेकोर नियोजन हे त्याच्या युद्धनेतृत्वाचे महत्त्वाचे भाग आहेत.” खरं तर शिवरायांचे सबंध आयुष्य म्हणजे संकटे, स्वार्या आणि हल्ले यांची एक अखंड मालिकाच आहे. त्यातील कित्येक संघर्ष तर आप्तस्वकीयांशीच झडले, अगदी सोयर्याधायर्यांशीच. त्याचा पहिला फटका खंडोजी व बाजी घोरपडेंना बसला. पुढे नाहक सतावणार्या फलटणच्या निंबाळकरांनाही महाराजांनी इंगा दाखवला. स्वराज्यावर पहिला परकी हल्ला झाला, तो आदिलशाहीच्या फतेहखानाचा. राजांनी त्याचा पाडाव करून जोराचा झटका दिला. त्यावेळी राजे होते जेमतेम 19 वर्षांचे आणि स्वराज्य ऐन बाल्यावस्थेत होते, तिकडे विजापुरात शहाजीराजे अटकेत पडलेले आणि फतेहखानाच्या पराभवाचे उट्टे काढण्यासाठी अफझलखानाला धाडण्याची तयारी सुरू झालेली. त्यामुळे राजांनी सावधपणे माघार घेत खानाचे संकटही टाळले व पित्याची सुटकाही करवली. शिवाय, नुकतेच आकारू लागलेले स्वराज्यही वाचवले. त्यामुळे ताब्यातला सिंहगड सोडून देण्यामागील राजांच्या चातुर्याला आणि दूरदर्शीपणाला आपण ‘हॅट्स ऑफ’च केले पाहिजे. 1649 ते 1656 पर्यंत राजांनी ’वेट अॅण्ड वॉच’चे धोरण ठेवले. स्वराज्याची व्यवस्था लावली. रयतेला सावरू स्थिरावू दिले. पुढच्या मोहिमांची आणि राज्यविस्ताराची आखणी केली आणि सैन्याची पूर्वतयारी केली.
खरं तर 12 हजार फौजेसह चालून आलेल्या क्रूर, कपटी खानाला शिवाजी महाराजांनी कृष्णनीतीनेच जावळीच्या जंजाळात फसवले. तिथेच ते अर्धी लढाई जिंकले आणि गनिमी काव्याने खानाची फौजही कापून काढली. पुढे पन्हाळगडावरून निसटल्यामुळे सिद्दीच्या तावडीतून सुटलेल्या राजांनी शाहिस्ताखानाचे उच्चाटन केले. याच काळात कोकणात धुमाकूळ घालणार्या कारतलबखान आणि रायबाघनला उंबरखिंडीत गाठून सपाटून मार दिला. पुढे आग्र्याची भेट, अटक आणि सुटका हा शिवचरित्रातील सर्वांत रोमांचक आणि अद्भुत अध्याय आहे. राजमाता जिजाऊंनी याची देही, याची डोळा आपल्या शिवबांना अभिषिक्त राजा होताना पाहिले. या शिवराज्याभिषेकाने हिंदुस्थानात नवे मन्वंतरच घडून आले. शिवराज्याभिषेकाने एका नवयुगाचाच शुभारंभ झाला. नव्या कालगणनेची सुरुवात झाली. यानंतरची सर्वांत मोठी कामगिरी म्हणजे दक्षिण दिग्विजय. यामुळे त्यांचे स्थान कमालीचे बळकट झाले आणि त्यानंतर काही काळाने एक युगान्त झाला.
या पुस्तकाच्या एकंदर 11 प्रकरणांतून शिवाजी महाराजांचे प्रभावी नियोजन, व्यवस्थापन, नेतृत्व, संघटन कौशल्य, नेटवर्किंग, चिकाटी, चिवटपणा, जोखीम पत्करण्याची क्षमता (रिस्क टेकिंग अॅबिलिटी), चौकटीबाहेरचा विचार (आऊट ऑफ बॉक्स थिंकिंग), स्थितप्रज्ञता, योग्य माणसांची योग्य कामाकरिता निवड, अशा विविध गुणांचे वर्णन महाराजांच्या जीवनातील विविध प्रसंगांतून आजच्या काळानुसार सुसंगती करून अतिशय प्रभावीपणे लेखक डॉ. सुमंत टेकाडे यांनी मांडले आहे. त्यामुळे विविध क्षेत्रांत कार्यरत व्यक्ती, विद्यार्थी तसेच विविध संस्था यांच्याकरिता हे पुस्तक प्रेरणादायी ठरू शकते. या पुस्तकातील नववे प्रकरण ’शिवाचे त्रिनेत्र : जिजाऊ, शहाजी, संभाजी’ हे विशेष म्हणावे असेच आहे. या संपूर्ण पुस्तकातून एक विचार आणि कार्य करण्याची ऊर्जा नक्की मिळेल.
आता या पुस्तकाच्या रूपाने डॉ. सुमंत टेकाडे यांचे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार सर्वदूर पोहोचतील , यात शंकाच नाही. शाळांमधून, विविध वाचनालय, कट्ट्यावर आणि समूहात याचे सामूहिक वाचन व्हावे, इतके देखणे आणि दर्जेदार पुस्तक आपल्याकडे उपलब्ध झाले आहे. ‘कोरोना’ काळात नियतीने डाव साधला आणि डॉ. सुमंत टेकाडे आपल्यातून निघून गेले, पण त्यांचे विचार आणि त्यांची उणीव व सामाजिक तळमळ या पुस्तकातून बर्याच अंशी भरून निघेल, याची खात्री आहे. वाचनीय आणि संग्रही असावे, असेच हे पुस्तक अर्थात ‘युगंधर शिवराय!’
पुस्तकाचे नाव : युगंधर शिवराय’
लेखक : डॉ. सुमंत दत्ता टेकाडे
संपादक : डॉ. श्याम माधव धोंड
प्रकाशक : विजय प्रकाशन - नागपूर - संपर्क : (0712)-2530539
मूल्य : 600 रु., सवलत मूल्य : 480 रु.
सर्वेश फडणवीस