- परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे प्रतिपादन; सदस्य राष्ट्रांकडून ‘वेव्हज’ जाहीरनाम्याचा स्वीकार
03-May-2025
Total Views |
मुंबई: ( Waves conference will shape the future of the entertainment world External Affairs Minister S. Jaishankar ) “जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषद’ ही माध्यम आणि मनोरंजनविश्वाच्या भविष्याची रुपरेषा ठरवणार आहे. सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी परस्परांच्या सांस्कृतिक संवेदनशीलता जाणून जागतिक सहकार्य हाच प्रगतीचा मार्ग आहे,” असे प्रतिपादन परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी शुक्रवार, दि. 2 मे रोजी केले.
‘जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर’ येथे सुरू असलेल्या ‘वेव्हज’ परिषदेत जागतिक माध्यम संवादसत्राला संबोधित करताना ते बोलत होते. परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले की, “तंत्रज्ञान आणि परंपरा यांनी हातात हात घालून चालले पाहिजे. कारण तंत्रज्ञान आपल्या विशाल वारशाबद्दलची जागरूकता आणि त्याबद्दलच्या जाणिवेची सघनता वाढवत असते. कौशल्य विकासाद्वारे तरुण प्रतिभेला सर्जनशील करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. विकसित भारत उभारण्याच्या दृष्टीने झेप घेण्यासाठी नवोन्मेष ही गुरुकिल्ली आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी झालेल्या चर्चासत्रात, मंत्रिस्तरीय वरिष्ठ प्रतिनिधींनी आपली मते मांडली. “वेव्हज’ परिषदेच्या पहिल्या हंगामात ‘क्रिएट इन इंडिया’ चॅलेंज उपक्रमाअंतर्गत झालेल्या 32 स्पर्धांमधून जगभरातील 700 अव्वल आशयकर्ते जगासमोर आले आहेत, अशी माहिती भारताने सहभागी देशांना दिली. तसेच, पुढील हंगामापासून हे चॅलेंज 25 जागतिक भाषांमध्ये घेतले जाईल, ज्यामुळे जगभरातील विविध भाषांमधील सर्जनशील प्रतिभा ओळखता येईल,” अशी माहिती राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन, माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू यांनी दिली.
डिजिटल तंत्रज्ञानातील तफावत दूर करण्यासाठी एकत्र या : अश्विनी वैष्णव
केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात सांगितले की, “संस्कृती ही सर्जनशीलतेला प्रेरणा देते. त्यामुळेच ती सीमा ओलांडून लोकांना जोडते. तंत्रज्ञानामुळे आपल्या कथाकथनाच्या पद्धतीत बदल होत असल्याने आशयनिर्मिती आणि वापरही वेगाने बदलत आहेत. आपण अशा वळणावर आहोत, जिथे आपल्याला स्थानिक आशयनिर्मितीला प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे. डिजिटल तंत्रज्ञानातील तफावत दूर करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. आपल्याला सर्जनशीलतेचा वैश्विक सेतू नवकल्पनांच्या महामार्गापर्यंत विस्तारला पाहिजे,” असे त्यांनी नमूद केले.