भारतीय स्त्रीवादाची संकल्प रूपरेषा

    03-May-2025
Total Views |

भारतीय स्त्रीवादाची संकल्प रूपरेषा



1975 साली संयुक्त राष्ट्रसंघाने ‘आंतरराष्ट्रीय महिला वर्ष’ जाहीर केले, त्या घटनेस यावर्षी 50 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने भारतातील समाजवादी तसेच डाव्या स्त्रीवादी संघटनांनी व चळवळींनी त्यांचा इतिहास व ऐतिहासिक टप्पे सांगणारे लेख वृत्तपत्रांमधून लिहायला सुरुवात केली. त्यानिमित्ताने दि. 8 मार्च हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ म्हणून साजरा करण्याची प्रथा सुरू होऊनही आता अर्धशतक झाले आहे. समाजवादी व डाव्या विचारांच्या संघटना यावर त्यांचे स्त्रीवादी विचारांची गेल्या 50 वर्षांमधील वाटचाल पुस्तक स्वरूपात दस्तावेज तयार करत आहेत. या पार्श्वभूमीवर देशातील उजव्या राष्ट्रवादी विचाराच्या पायावर वास्तवाचे, इतिहासाचे भान असणारा ‘भारतीय स्त्रीवाद’ (इंडियन फेमिनिझम) यावर स्वतंत्र विचारमंथन होणे आवश्यक आहे. राष्ट्रीय पातळीवर ‘भारतीय स्त्री शक्ती’तर्फे नुकतेच भारतीय स्त्रीवादाचे नेमके स्वरूप व व्याप्ती दाखवणारे ‘वूमेन, जेंडर अ‍ॅण्ड सोसायटी इन इंडिया : पर्स्पेक्टिव्ह ऑन फेमिनिझम’ हे उपयुक्त इंग्रजी पुस्तक निघाले, असून नयना सहस्रबुद्धे त्याच्या मुख्य संपादक आहेत. शुद्ध अकादमिक पातळीवरील हे मौल्यवान लेखन ‘भारतीय स्त्रीवादा’वरील विचारांना पुढची सकारात्मक दिशा देण्यास उपयुक्त ठरणारे आहे. त्यानिमित्ताने प्रस्तुत केलेले हे चिंतन...


‘वूमेन, जेंडर अ‍ॅण्ड सोसायटी इन इंडिया : पर्स्पेक्टिव्ह ऑन फेमिनिझम’ या नयना सहस्रबुद्धे यांच्या पुस्तकात भारतातील प्राचीन, मध्ययुगीन आणि आजची आधुनिक स्त्रीवादाची समकालीन मांडणी केली आहे. त्यातील विविध लेखांमधील विचार, सिद्धांत आणि त्यानुसार केलेल्या भूमिकेतून काही मूलगामी विचार मांडले आहेत. त्यामध्ये पाश्चिमात्य स्त्रीवादी प्रारूपाचा (मॉडेल) भारतीय स्त्रीवादावर पडलेला प्रभाव, पाश्चिमात्य स्त्रीवाद, त्याच्या मर्यादा, तसेच उणिवा यांचाही वेध घेतला आहे. पाश्चिमात्य स्त्रीवाद हा महिला हक्क आणि अधिकारांसाठी चळवळी आणि संघर्षावर आधारलेला आहे. तसेच तो प्रामुख्याने पुरुषसत्ताक किंवा पितृसत्ताक जीवनशैलीतून स्त्रीला मिळालेल्या दुय्यम वा गौण स्थानातून आला आहे. पुरुषी अहंभावाचा स्त्रीला होणार्‍या त्रासातून वा जाचातून स्त्रीच्या उद्गाराला दिलेला तो आकार आहे. त्यामुळे पाश्चिमात्य स्त्रीवाद हा सहानुभूतीवर आधारलेला आहे. तो पुरुषसत्ताक पद्धतीला दिलेली एक तीव्र प्रतिक्रिया आहे. त्यातून स्त्रीला दिलेला दुजाभाव, दुय्यम स्थान आणि दास्यत्व यावर पाश्चिमात्य स्त्रीवाद भर देतो. परंतु, या परिस्थितीतून स्त्रीला अपेक्षित असणारी समानता, प्रतिष्ठा व स्वातंत्र्य यापलीकडे जाऊन त्यामध्ये फारसा सखोल विचार करत नाही. याशिवाय युरोप आणि अमेरिकेचा हा पाश्चिमात्य स्त्रीवाद आपल्याकडे भारतीय परिप्रेक्षात जाणीवपूर्वक निर्माण केला गेला आहे, अशी चर्चा ही या पुस्तकातून झाली आहे.

जगातील सर्वांत प्राचीन संस्कृती (सिव्हिलायझेशन) म्हणून भारतीय समाजाकडे बघितले जाते. येथील सांस्कृतिक, धार्मिक, आध्यात्मिक विचारमंथनातून केला जाणारा ‘आत्मशोध’ हा जगाच्या दृष्टीने आदर्शवत मानला जातो. म्हणूनच प्राचीन ते आजच्या आधुनिक कालखंडातील व्यापक परिप्रेक्षात ‘स्त्रीचे नेमके स्थान’ हा महत्त्वाचा विषय बनला आहे. या दीर्घ कालखंडातून स्त्रीकडे आलेली भूमिका व जबाबदारीबाबत धर्म आणि समाजाने तिचे निश्चित केलेले स्थान, याचा जास्तीत जास्त तटस्थ व भारतीय दृष्टिकोनातून विचार करणे आवश्यक आहे. महत्त्वाचे म्हणजे, तो विचार स्त्रीबरोबर पुरुषानेही करायला हवा, म्हणूनच हा लेखनप्रपंच.

भारतीय संस्कृती वेद काळात स्त्री-पुरुष समानता मानणारी असून, त्यातून समतेची भारतीय धारणा असणारी स्त्रीवादाची पहिली सैद्धांतिक भूमिका तयार झाली, असे मानली जाते, तर आधुनिक काळात देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी व त्यानंतरच्या चळवळींमध्ये भारतीय स्त्रीचा सहभागही तितकाच महत्त्वाचा मानला जातो. ‘भारतीय स्त्रीवाद’ हा त्या अर्थाने परस्परांवर (स्त्री-पुरुषांवर) आधारलेला, एकमेकांशी जोडला गेलेला याशिवाय सर्व चराचर जीवसृष्टीशीही व्यापक अर्थाने संबंध प्रस्थापित करणारा आहे. अशा या भारतीय स्त्रीवादातील संपन्न भर म्हणजे तो बहुविध आहे. तो केवळ स्त्रीवादी न राहता, अखिल मानवतेपर्यंत पोहोचला आहे. आपली ‘रामायण’ व ‘महाभारत’ ही प्राचीन महाकाव्ये सीता व द्रौपदी या स्त्रियांचा गौरव करतात. तिथून आपली कर्तृत्ववान स्त्रियांची गौरवशाली परंपरा मानली जाते. असे असतानाही आपण आज पाश्चिमात्य स्त्रीवादाच्या परिप्रेक्षातून भारतीय स्त्रीवादाकडे मर्यादित नजरेने पाहतो. यामागे अनेक कारणे दिसतात. आंतरराष्ट्रीय महिला वर्षाची सुरुवात झाल्यानंतर स्त्रीच्या परिस्थितीसंबंधी अभ्यास करणारे गेल्या 50 वर्षांमधील प्रसिद्ध झालेल्या विविध अहवालांतून एकीकडे स्त्रियांचे शिक्षण व विविध क्षेत्रांतील वाढत्या संधी दाखवतानाच दुसरीकडे तिच्यावरील अत्याचारात होत गेलेली वाढ पाहून चिंता वाटते. त्याचा लावला गेलेला टोकाचा अन्वयार्थ हा पाश्चिमात्य स्त्रीवादी विचारांनीच प्रामुख्याने व्यापला आहे. तो अपुरा, पूर्वग्रहदूषित तसेच संपूर्ण नकारात्मक वाटतो.

स्वातंत्र्यपूर्व काळात गांधी यांच्या 1942 सालच्या ‘चले जाव’ या उठावात महाराष्ट्रातील मुंबई-पुणे यांसारख्या शहरांमधील महिलाही सहभागी झाल्या होत्या. त्याकाळात पुरुषांप्रमाणे ध्येयवादी स्त्रियांही प्रसंगी अविवाहित राहून राष्ट्रसेवेची स्वप्ने उराशी बाळगून होत्या. या लढ्यातून वाट्याला आलेला कारावास, मानहानी, राजद्रोहाचा आरोप पुरुष आणि स्त्रिया या दोघांनी एकत्रित भोगला. किंबहुना, या लढ्यामुळेच भारतीय स्त्रीचा सामाजिक दर्जा वाढला, तिला लोकशाहीतील मतदानाचा अधिकार (पाश्चात्य स्त्रीने केलेल्या संघर्षाच्या आधीच) मिळाला. अर्थात, स्त्रीच्या प्रश्नाबरोबरच किंवा स्त्रीकडे बघण्याच्या दृष्टिकोनाबरोबरच स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशापुढील सारेच प्रश्न सुटतील, ही समजूत भ्रामक ठरली.

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्त्रियांवरील अन्याय करणार्‍या प्रश्नांबाबत विचारविनिमय झाला व तो दूर करण्यासाठी शिक्षण तसेच अर्थार्जन करता येईल व ती स्वयंपूर्ण होऊ शकेल, असे प्रयत्नही झाले. मताधिकाराबरोबरच स्त्रीला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तिला समान संधी व दर्जा दिला गेला. त्यानंतर स्त्रीला राजकारणातही 35 टक्के आरक्षण मिळाले. असे असतानाही त्याचे अपेक्षित परिणाम मात्र म्हणावे तसे दिसले नाहीत.

भारतीय स्त्रीवादाला सामाजिक, नैतिक, तात्त्विक, आध्यात्मिक आणि धार्मिक विचारांची अस्सल भारतीय वैचारिक बैठक आहे, असे बोलले जाते. कारण, भारतीय स्त्रीवादाचा पाया हा भारतीय कुटुंबपद्धतीच्या भक्कम पायावर आधारलेला आहे. ज्या वेदकाळात भारतीय विद्वान स्त्रीला पुरुषाच्या बरोबरीने वाद-चर्चा घालता येत असे, त्याच स्त्रीला मध्ययुगात असुरक्षित करणारी विविध परकीय आक्रमणांनी चार भिंतींच्या मर्यादेत अडकवले गेले. त्यामुळे तिचेे शिक्षण थांबले आणि तिच्यातली निरक्षरता वाढत गेली. पूर्वीचा तिचा पुरुषाच्या बरोबरीने असणारा शिक्षणाबरोबर सामाजिक सहभागही कमी होत गेला. त्यातून ती पुढे कुटुंबात अडकून केवळ परंपरा व रितीभाती पाळू लागली.

काही समाजशास्त्रज्ञांच्या मते, यातून भारतीय समाजातील मध्ययुगीन चालीरीती, बालविवाह, विधवांचे समाजातील स्थान, पतीच्या निधनानंतर सती जाण्याची प्रथा यांसारखे प्रश्न अधिक वाढत गेले. महाराष्ट्रात ब्रिटिशांच्या आगमनानंतर आलेल्या प्रबोधन काळात सतीच्या चालीला विरोध, विधवा पुनर्विवाह आणि स्त्रीशिक्षण यावर भर देण्यात आला. लोकहितवादी, गोपाळ गणेश आगरकर, महादेव गोविंद रानडे, नाना शंकरशेट, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि महर्षी कर्वे, तसेच ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांचे योगदान मोठे आहे. त्यातील अनेकांनी त्यासाठी स्त्रीशिक्षणाचा पाया भक्कम केला.

आपल्याकडे एकीकडे स्त्रीवरील होणारा अन्याय पाहता, दुसरीकडे मात्र कर्तबगार स्त्रियांचा उदय व त्याची सशक्त परंपराही अखंड राहिलेली दिसते. शिक्षणाच्या क्षेत्रात 19व्या शतकात केवळ महाराष्ट्रातील नव्हे, तर देशातील पहिल्या महिला डॉक्टर होण्याचा मान आनंदीबाई जोशी यांना मिळाला. तसेच, 20व्या शतकातील निरक्षर असणार्‍या बहिणाबाई चौधरींनी मानवी जीवन व माणूसपण यावर भाष्य करणार्‍या अर्थपूर्ण काव्यरचना केल्या, त्यामागेही मराठी साहित्यातील स्त्रीमधील सर्जनशीलता व तिची अर्थपूर्ण अभिव्यक्ती कारणीभूत आहे.

राजकीय क्षेत्रात महाराष्ट्रात अहिल्याबाई होळकरांसारख्या कर्तृत्ववान स्त्रिया झाल्याच. त्यांनी राजकीय कर्तृत्वाबरोबरच देशाचा सांस्कृतिक, धार्मिक व आध्यात्मिक वारसाही जपला. महाराष्ट्रातील प्रतिकूल परिस्थितीतही 28 कर्तृत्ववान वीर स्त्रिया होऊन गेल्या. तेव्हा ‘स्त्रीवाद’ हा शब्दही माहीत नव्हता. आपल्या संत परंपरेत मुक्ताबाई, बहिणाबाई, सोयराबाई अशा महिला संतांची परंपराही तितकीच गौरवशाली आहे. भारतीय विरागिनी यांची मोठी परंपरा लल्लेश्वरी ते अहमकम्मादेवींपर्यंत आपल्या देशात होऊन गेली. या सर्व स्त्रियांचे सामाजिक, धार्मिक व आध्यात्मिक योगदान पाहाता, त्याचा भारतीय स्त्रीवादी दृष्टिकोन काय आहे, हे समजावून घेण्यासाठी स्वतंत्र अभ्यास व्हायला हवा.

भारतीय स्त्री-पुरुष भेद हे काही प्रमाणात कुटुंबातून व सामाजिक कारणांमधून निर्माण होत गेले. 19व्या व 20व्या शतकात या दोन्हींवर पाश्चिमात्य आधुनिकतेचा व ब्रिटिश वसाहतवादाचा प्रभाव पडलेला दिसतो. मुळात स्त्री-पुरुषातील भेद हा अमानुष असून मानवतेला काळिमा फासणारा आहे. याला उत्तर म्हणजे जाणीवपूर्वक सर्वत्र सुसंस्कृत समाजाची निर्मिती आवश्यक आहे. यासाठी स्त्रीबरोबर पुरुषानेही स्वतःमध्ये जाणीवपूर्वक बदल घडवायला हवा. त्यावर वेळोवेळी विचारमंथन व त्याला अनुसरून तशी कृती व्हायला हवी. किंबहुना, भारतीय स्त्रीवाद जागवण्यासाठी त्याची एक निश्चित भूमिका घेऊन त्यातून सकारात्मक चळवळ उभी राहायला हवी. आपल्याकडे मनूने सांगितलेल्या स्त्रीचे समाजातील दुय्यम स्थान यावर प्रामुख्याने भाष्य केले जाते. ते व तेवढेच फक्त खरे आहे, असे मानून प्रतिवाद केला जातो. त्यावरही अधिक व्यापकपणे चर्चा व्हायला हवी.

स्थूलमानाने भारतीय स्त्रीवाद हा सखोल, अर्थपूर्ण व नैसर्गिक असून पाश्चिमात्य स्त्रीवाद हा काहीशा अनैसर्गिक परिस्थितीतून निर्माण झाला, असे सांगितले जाते. भारतीय स्त्रीवादाचा प्रवास हा प्रामुख्याने सकारात्मकतेकडे व जोडण्याकडे असून पाश्चिमात्य स्त्रीवाद हा नकारात्मकतेतून तसेच बंडखोरीतून निर्माण झाला असल्याने त्याची वृत्ती तोडण्याकडेच जास्त आहे. हा मुख्य भेद लक्षात घेता, या सार्‍यांतून एकंदरच विशाल ‘स्त्रीत्वा’बद्दल जागृती निर्माण व्हायला हवी. त्याला जोडून आधुनिकतेच्या नावाने आलेल्या आजच्या भौतिक प्रगतीचाही गांभीर्‍याने पुनर्विचार व्हायला हवा. यामागे असणारे सत्य व वस्तुस्थितीच्या पायावर स्त्रीची स्वतःची भूमिका नेमकी काय असायला हवी, हा मूलभूत प्रश्न असून त्याची व्यवस्थित उकल होत त्याची पुनर्मांडणी गरजेचे आहे.

स्त्रीमुक्तीचा विचार हा परकीय आहे, यावरही प्रतिवाद केला जातो. युरोपीय व अमेरिकन स्त्रीपेक्षा भारतीय स्त्रीच्या मनाची जडणघडण वेगळी आहे. याचे कारण तेथे औद्योगिक क्रांती आपल्याआधी झाली. त्याचा तेथील समाजजीवनावर झालेल्या परिणामातून स्त्रीमुक्तीचा प्रश्न निर्माण झाला. आपल्याकडे महाराष्ट्रात औद्योगिक वाढीला 1950 सालानंतर प्रारंभ झाला. 1960 सालानंतर प्रामुख्याने स्त्रियांना नोकर्‍या कराव्याशा वाटू लागल्या. त्याला जोडून आर्थिक स्वातंत्र्य मिळाले, तरीही समाजातील स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन म्हणावा तसा बदलला नाही. ‘स्त्रीमुक्ती’ व ‘स्त्रीवाद’ हे शब्द 1970 सालानंतर ऐकू येऊ लागले, ते आता आणखी आक्रमक रूप घेऊ लागले आहेत.

या पार्श्वभूमीवर 2023 साली झालेल्या ‘जी-20’ परिषदेचे अध्यक्षपद भारताकडे आले. त्यामध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने घालून दिलेल्या 17 शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांची (सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स) यशस्वी पूर्तता करण्यासाठी सर्वसमावेशक व लवचिक विकासाचा दृष्टिकोन, आरोग्य, शिक्षण व त्याबरोबर महिला सबलीकरणावर प्रामुख्याने भर देण्यात आला. कुटुंब व समाजातील स्त्रीचे स्थान आणि तिचा योग्य तो सन्मानही त्यातून अधोरेखित करण्यात आला आहे. यातून स्त्रीशक्तीचा एकप्रकारे सन्मान केला आहे.

भारतीय स्त्रीवादात स्त्री-पुरुष नाते हे नातेसंबंध कुटुंब आणि समाजाच्या दृष्टीनेही परिपूर्णतेकडे नेणारे असते. दोघांचे सृष्टीत काही स्थान व भूमिका आहेत. त्यानुसार या दोघांमध्ये कोणतीही स्पर्धा नसून उलट सहकार्य व एकात्मता आहे. त्यात एकमेकांबद्दलची आत्मियता आहे. स्त्री-पुरुष हे दोन्ही आपापली वैयक्तिक तसेच समष्टीने नेमून दिलेली कर्तव्ये पूर्ण करण्यासाठीच निर्माण झालेली आहेत. तेच खरे ‘एकात्म जीवनदर्शन’ आहे, असे भारतीय तत्त्वज्ञान सांगते. आपल्याकडे स्त्रीप्रश्नाची सुरुवात स्त्रीवादातून झालेली नसून, ती मानवतावादातून निर्माण झाली आहे. त्याअर्थी भारतीय स्त्रीवाद हा कुटुंबसंस्था व सामाजिक बंधन मान्य करतो. शिवाय भारतीय संस्कृती ही केवळ कुटुंबाशी व समाजाशी जोडलेली नसून, ती थेट विश्वाशी नाते सांगते. ती ‘वसुधैव कुटुम्बकम्’ हे तत्त्व मानणारी आहे.

या पार्श्वभूमीवर ‘भारतीय स्त्रीवाद’ नावाची गोष्ट, तिचे स्वरूप व व्याप्ती यावर आता पुन्हा नव्याने विचार करण्याची व त्याची मांडणी करण्याची गरज आहे. हा प्रश्न केवळ स्त्रीपुरता मर्यादित नसल्यामुळे पुरुषानेही त्याचा गांभीर्याने विचार करायला हवा. त्यामध्ये विविध कल्पना व संकल्पनांची नवी भर पडायला हवी. भारतीय तसेच महाराष्ट्राचा सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय इतिहास पाहता, त्यामध्ये दडलेली भारतीय स्त्रीकर्तृत्वाची परंपरा विसरून चालणार नाही. या विचारमंथनातून केवळ पाश्चात्य स्त्रीवादाला ते उत्तर दिलेले नसेल, तर त्यातून एक स्वतंत्र अशी भविष्यवेधी विचारधारा निर्माण होईल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही. तसेच भारतीय स्त्रीवादाचा नव्याने विचार करताना पाश्चिमात्य प्रभावाने निर्माण झालेली सामाजिक शास्त्रे (सोशल सायन्सेस), मानव्यशास्त्रे (ह्यूमनिटीज) आणि निसर्गशास्त्रे (नॅचरल सायन्सेस) आणि भाषाशास्त्र (लिंग्विस्टिक्स) यांचीही पुनर्मांडणी भारतीय परिप्रेक्षात व्हायला हवी, असे सुचवावेसे वाटते.

यानिमित्ताने भारतीय स्त्रीवादावरील प्रकल्पात त्यावरील विचारमंथन पुढील मुद्द्यांवर व्हायला हवे. त्यामध्ये निरोगी समाज आणि स्त्रीवाद, राजकारण आणि स्त्रीवाद, अर्थकारण आणि स्त्रीवाद, सामाजिक बदल आणि स्त्रीवाद, सधनता, समृद्धी आणि स्त्रीवाद, प्रसारमाध्यमे आणि स्त्रीवाद, समाजमाध्यमे आणि स्त्रीवाद, शिक्षण आणि स्त्रीवाद, पाश्चिमात्य स्त्रीवाद आणि स्त्रीवाद, पर्यावरण आणि स्त्रीवाद, आरोग्य आणि स्त्रीवाद, महाराष्ट्रातील प्रबोधन आणि स्त्रीवाद, वेदकाल, मध्ययुग आणि स्त्रीवाद, सुरक्षा आणि स्त्रीवाद, शाश्वत जीवनशैली आणि स्त्रीवाद, अर्थशास्त्र व स्त्रीवाद, भारतीय तत्त्वज्ञान व स्त्रीवाद, राज्यशास्त्र व स्त्रीवाद, पुरातत्त्वशास्त्र व स्त्रीवाद, वैज्ञानिक शास्त्रे व स्त्रीवाद इत्यादी अनेक नवनवे विषय त्यात समाविष्ट करता येतील.

भारतीय स्त्रीवादावरील हा एक प्राथमिक स्वरूपाचा संकल्प कृती आराखडा असून, त्याआधारे पुढील प्रकल्पाची आखणी करणे आणि आजच्या आधुनिक काळात भारतीय स्त्रीवादाची भविष्यातील वाटचाल काय असू शकेल, याचा मागोवा घेणे शक्य होईल.



विवेक सबनीस
9373085948