मुंबई : उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी हा दावा केल्याने सध्या चर्चांना उधाण आले आहे.
शुक्रवार, २ मे रोजी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी त्यांच्या व्हाटसअॅपच्या ब्रॉडकास्ट ग्रुपमध्ये सुषमा अंधारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार का? असा सवाल केलाय. त्यानंतर सुषमा अंधारे यांनी यासंबंधीचा एक स्क्रीनशॉट ट्विट केला. "अहो दमानिया, जरा दमानं घ्या. किती तो प्रसिद्धीझोतात राहण्याचा सोस. कधीतरी अधिकृत माहिती घेत चला. ब्रॉडकास्टिंगवर टाकलेल्या मेसेजचा अर्थ काय घ्यायचा? तुम्ही माझ्या PR म्हणून काम करत आहात की, ठरवून ओबीसी नेते आणि चळवळ संपवण्याची मोहीम हाती घेतली आहे," असा सवाल सुषमा अंधारेंनी केला.
यावर अंजली दमानिया म्हणाल्या की, "मला फेब्रुवारी महिन्यात अगदी खात्रीशीर माहिती मिळाली होती की, सुषमा अंधारे अजित पवारांना त्यांच्या घरी जाऊन भेटल्या होत्या आणि त्यांच्या पक्षात जाणार होतात. हे खरं आहे की, नाही यावर उत्तर द्याल का? असा सवाल त्यांनी केला. त्यामुळे सुषमा अंधारे खरंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाणार का? असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित करण्यात येत आहे.