नवी दिल्ली : (India banned imports from Pakistan) पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, भारताने पाकिस्तानविरुद्ध आणखी एक कठोर पाऊल उचलले आहे. भारताने पाकिस्तानमधून होणाऱ्या सर्व आयातींवर बंदी घातली आहे. राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक धोरणाच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने या संदर्भातील अधिसूचना जारी केली आहे.
हे वाचलंत का? - "जर भारतानं सिंधू नदीवर धरण बांधून पाणी अडवलं तर आम्ही हल्ला करु"; पाकच्या पोकळ धमक्यांचं सत्र सुरुच!
पाकिस्तानमधून भारतात निर्यात होणाऱ्या सर्व वस्तूंवर आता भारतात बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान, भारताच्या या निर्णयाचा थेट परिणाम पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर होण्याची शक्यता आहे. या बंदीच्या निर्णयाअंतर्गत पाकिस्तानमधून येणाऱ्या कोणत्याही उत्पादनाच्या आयातींवर पूर्णपणे बंदी असणार आहे. याचबरोबर पाकिस्तानमधून एखादी वस्तू प्रत्यक्ष किवा अप्रत्यक्षपणे दुसऱ्या कोणत्याही देशातून भारतात आयात होणार असेल, तर त्यावरही बंदी असणार आहे.
अधिसूचनेत नेमकं काय म्हटलं?
केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने या निर्णयासंदर्भात जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, "पाकिस्तानमधून भारतात होणाऱ्या सर्व वस्तूंची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आयात किंवा वाहतूक, मग ती मुक्तपणे आयात करता येण्याजोगी असो किंवा नसो, पुढील आदेशापर्यंत प्रतिबंधित असेल, राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक धोरणाच्या हितासाठी हे निर्बंध लादण्यात आले आहेत. या निर्बंधातील कोणत्याही अपवादासाठी भारत सरकारची पूर्व परवानगी आवश्यक असेल."
पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला मोठा आर्थिक फटका बसणार
जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील वाघा-अटारी सीमा देखील बंद करण्यात आलेली आहे. तसेच भारतातील पाकिस्तानी नागरिकांना देखील भारत सोडण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. पाकिस्तानी विमानांसाठी भारताने आपले हवाई क्षेत्र बंद करण्यात आले आहे. यानंतर आता पाकिस्तानमधून होणाऱ्या सर्व आयातीवर भारताने बंदी घातली आहे. त्यामुळे या सर्व निर्णयांचा परिणाम पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर होणार असल्याचे बोलले जात आहे.