नवी दिल्ली : (India - Pakistan Conflict) पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे आणि हा तणाव दिवसागणीक वाढत आहे. या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात आक्रमक भूमिका घेत पाकिस्तानसोबतच्या सिंधू पाणी कराराला तात्काळ स्थगिती देण्याचा निर्णय घेतला. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ (Khawaja Asif) यांनी पुन्हा 'जर भारताने सिंधू नदीवर धरण बांधून पाणी अडवलं तर पाकिस्तान हल्ला करेल', अशी पोकळ धमकी दिली आहे.
"जर सिंधू नदीचे पाणी थांबवले तर पाकिस्तान भारतावर हल्ला करेल"
"जर भारताने पाकिस्तानला जाणारे पाणी रोखण्यासाठी सिंधू नदीवर कोणतेही धरण बांधले तर पाकिस्तान भारतावर हल्ला करेल. सिंधू नदीवर कोणतेही धरण बांधणे हे सिंधू पाणी कराराचे उल्लंघन ठरेल आणि पाकिस्तानवर थेट हल्ला समजलं जाईल आणि असे झाल्यास पाकिस्तान गप्प बसणार नाही.", असे पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले आहेत.
सिंधू नदीसाठी आम्हीही टोकाची भूमिका घ्यायलाही तयार - बिलावल भुट्टो
पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनी देखील भारताला पुन्हा एकदा पोकळ धमकी दिली आहे. "पाकिस्तानला युद्ध नको पण जर तशी वेळ आली तर मग आम्हीही मागे हटणार नाही. सिंधू नदीच्या पाण्यासाठी आम्ही कोणत्याही थराला जायला मागेपुढे पाहणार नाही", अशी दर्पोक्ती भुट्टो यांनी केली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधू पाणी करार रद्द करण्याचा निर्णय घेतला होता, त्यानंतर पाकिस्तानमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\