‘डरो मत...’ अशी डायलॉगबाजी काँग्रेस नेते राहुल गांधी टी-शर्ट घालून आणि दंड फुगवून नेहमी करत असतात. मात्र, स्वातंत्र्यवीर सावरकरांवर धादांत खोटे आरोप करणार्या राहुल गांधींनाच आपल्या डायलॉगचा विसर पडला असावा. त्यामुळेच न्यायालयीन कारवाईद्वारे राहुल गांधींना जेरीस आणणार्या सात्यकी सावरकर यांना लक्ष्य करण्यासाठी त्यांना अखेर नथुरामचा आधार घ्यावा लागणे, हा गांधी विचारांचा पराभवच आहे.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि लोकसभेचे विद्यमान विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरोधात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी मानहानीचा खटला पुणे येथील न्यायालयात दाखल केला. राहुल गांधी यांनी लंडन येथे एका कार्यक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी धादांत खोटे वक्तव्य केल्याचा सात्यकी सावरकर यांचा आरोप असून, त्यासाठी त्यांनी राहुल गांधी यांना न्यायालयात खेचले. सात्यकी यांनी त्यांच्या मानहानीच्या खटल्यात गांधींवर मार्च २०२३ साली लंडनमध्ये दिलेल्या भाषणात हिंदुत्ववादी विचारवंत विनायक दामोदर यांच्याविरुद्ध अपमानास्पद टिप्पणी केल्याचा आरोप केला होता. सात्यकी यांनी असा दावा केला की, गांधींनी सावरकरांच्या लेखनातील एक घटना उद्धृत केली होती, ज्यामध्ये सावरकरांनी एका मुस्लीम पुरुषावरील हल्ल्याचे वर्णन ‘आनंददायी’ असे केले होते. सात्यकी यांनी सावरकरांच्या लेखनात अशा कोणत्याही उतार्याचे अस्तित्व नाकारले आणि गांधींना भारतीय दंड संहितेच्या ‘कलम ५०० (बदनामी)’ आणि ‘कलम ३५७’ सीआरपीसी अंतर्गत भरपाई मिळावी, यासाठी न्यायालयात धाव घेतली. या खटल्याची पुढील सुनावणी आता दि. १२ जून रोजी होणार आहे.
मात्र, योगायोगाने दि. २८ मे रोजीच म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीदिनीच राहुल गांधी हे या मानहानी खटल्यास घाबरले असल्याचे सिद्ध झाले. या खटल्याच्या बुधवारी झालेल्या सुनावणीवेळी राहुल गांधी यांच्यातर्फे न्यायालयात अतिशय बालिश असा दावा करण्यात आला. कायदेशीर तज्ज्ञांच्या मते, राहुल गांधी यांना या खटल्यात शिक्षा होण्याची भीती वाटली असण्याची सर्वाधिक शयता. त्यामुळेच राहुल गांधी यांनी अतिशय बालिश युक्तिवाद केला असावा.
तर तो युक्तिवाद असा की, सात्यकी यांनी जाणूनबुजून, पद्धतशीरपणे, अतिशय हुशारीने आपल्या मातृवंशाचा खुलासा टाळला आणि दडपला. त्यांचा गोडसे कुटुंबाशी थेट कौटुंबिक संबंध स्थापित असून, जो मानहानीच्या खटल्याचा निर्णय घेण्यासाठी उपयुक्त आहे. गांधींच्या अर्जात अधोरेखित केले आहे की, तक्रारदाराची आई हिमानी अशोक सावरकर केवळ गोपाळ गोडसे यांची मुलगी आणि नथुराम गोडसे यांची भाची नव्हती, तर ‘अभिनव भारत’ आणि ‘अखिल भारतीय हिंदू महासभा’सारख्या हिंदुत्ववादी संघटनांशी संबंधित एक सक्रिय राजकीय व्यक्तीदेखील होत्या. गांधींच्या मते, गोडसे आणि सावरकर कुटुंबांमध्ये वैचारिक आणि रक्ताचे नाते आहे आणि मानहानीच्या दाव्याच्या केंद्रस्थानी असलेल्या विनायक दामोदर सावरकर यांच्या प्रतिष्ठा आणि वारशाचे मूल्यांकन करण्यासाठी हे ऐतिहासिक संबंध महत्त्वाचे आहे. तक्रारदाराची ‘आईच्या आईवडिलां’कडूनची वंशावळ खूप महत्त्वाची आहे. कारण, तक्रारदाराचे ‘आईच्या आईवडिलां’कडून आजोबा गोपाळ विनायक गोडसे आणि नथुराम विनायक गोडसे हे सख्खे भाऊ आहेत आणि त्यांचा विनायक दामोदर सावरकर कुटुंबाशी इतिहास, रक्ताचा संबंध आहे, जे महात्मा गांधींच्या हत्येचा प्रमुख आरोपीदेखील आहे. गांधींनी असाही दावा केला आहे की, सात्यकीचे कौटुंबिक संबंध न्यायालयासाठी बदनाम झाले आहे की नाही, हे मूल्यांकन करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. गांधींनी न्यायालयाकडून सात्यकीला त्याच्या आईच्या वंशावळीची माहिती देणारे प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश मागितले आहेत. जर ते असे करण्यात अयशस्वी झाले, तर गांधींनी ‘कलम १७३(८)’ सीआरपीसी अंतर्गत पुढील तपासासाठी खटला विश्रामबाग पोलीस ठाणे, पुणे येथे हस्तांतरित करण्याची विनंती केली आहे.
सात्यकी सावरकर यांचा खटला आणि त्यामध्ये राहुल गांधी यांनी केलेला हा युक्तिवाद याचा कोणताही परस्परसंबंध नसल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळेच न्यायालयानेही राहुल गांधी यांचा हा युक्तिवाद फेटाळून लावला. मात्र, राहुल गांधी यांनी हा युक्तिवाद सात्यकी सावरकर यांच्यावर दबाव आणण्यासाठीच केल्याचे स्पष्ट होते. कारण, हिंदुत्व चळवळीस बदनाम करण्यासाठी विरोधकांकडून नेहमीच नथुराम गोडसे हा मुद्दा पुढे केला जातो. नथुराम गोडसे याने महात्मा गांधी यांची हत्या केल्यानंतर हिंदुत्व चळवळीस जनतेच्या मनात ‘व्हिलन’ ठरविण्यासाठी अनेकांना संधी मिळाली होती. त्यामुळेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांनाही गांधी हत्येत गोवण्यात आले होते. त्याचप्रमाणे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही तेव्हा बंदी लादण्यात आली होती. त्यानंतर अगदी आजही हिंदुत्ववाद्यांना ‘गोडसेवादी’ ठरविण्यात काँग्रेस, समाजवादी आणि त्यांचे समविचारी आघाडीवर असतात. त्यामुळे या खटल्यातही सात्यकी सावरकर यांच्यावर दबाव आणण्यासाठीच राहुल गांधी यांनी नथुराम गोडसेचा मुद्दा आणला आहे. अर्थात, न्यायालयीन कामकाजामध्ये अशा मुद्द्यांना शून्य महत्त्व असते. त्यामुळेच न्यायालयही राहुल गांधी यांचा हा युक्तिवाद फेटाळण्याची शक्यताच अधिक.
राहुल गांधी यांच्या युक्तिवादास एकप्रकारचा दर्प आहे. तो म्हणजे "हा कोण सात्यकी सावरकर, जो मला न्यायालयात खेचतो.” राहुल गांधी यांचा हा युक्तिवाद पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रसिद्ध ‘नामदार विरुद्ध कामदार’ हे वक्तव्यही आठवते. "राहुल गांधी हे नामदार असून आपण कामदार आहोत. कामदार पंतप्रधान झाल्यानेच नामदारांना त्रास होत आहे,” अशा अर्थाचे वक्तव्य पंतप्रधानांनी संसदेत केले होते. आताही एका बाजूला राहुल गांधी आहेत. लोकसभेचे विरोधी पक्षनेते, काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष, ज्यांचे वडील, आजी आणि पणजोबा देशाचे पंतप्रधान होते, तर काका आणि आजोबा खासदार होते. ज्यांची बहीणही आता खासदार आहे. जन्मापासूनच राहुल गांधी यांनी आपल्या घरात सत्ता बघितली आहे, तर दुसरीकडे आहेत सात्यकी सावरकर. पुण्यात राहणारा हा तरुण एका खासगी कंपनीत नोकरी करतो. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा नातू असलेला हा तरुण सावरकर विचारांचा अभ्यासक असून, तो एक प्रकाशनही चालवतो. असा व्यक्ती ज्यावेळी राहुल गांधी यांना न्यायालयात खेचतो, त्याचा राग राहुल गांधी यांच्यासारख्या ‘नामदारा’स येणे स्वाभाविकच. मात्र, त्यामुळेच सात्यकी सावरकर यांच्या धाडसाला दाद द्यावीच लागेल.
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करण्यावरून राहुल गांधी यांना यापूर्वी नुकतेच सर्वोच्च न्यायालयात न्या. दीपंकर दत्ता यांनीही फटकारले होते. "सावरकरांविषयी तुमच्या आजीचे काय मत होते, हे एकदा वाचून या,” अशा शब्दांत राहुल गांधी यांना तंबी दिली होती. अर्थात, स्वातंत्र्यवीर सावरकर यांना लक्ष्य करणे, ही पुरोगामी ‘इकोसिस्टम’ची नियोजनबद्ध योजना आहे आणि राहुल गांधी यांनी सावरकरांना लक्ष्य करणे, हा त्यातील एक लहानसा भाग. देशातील हिंदुत्व चळवळीस स्वातंत्र्यवीर सावरकर या नावाने मोठे बळ मिळते. सावरकरांचा हिंदुत्वविषयक विचार असो, सामाजिक प्रश्नांविषयीचे विचार असो, परराष्ट्र धोरण आणि संरक्षणविषयक विचार असो अथवा विज्ञाननिष्ठ विचार असो; असे विविधांगी सावरकर नेमके काय आहे, याची कल्पना कदाचित विरोधकांनाच जास्त असावी. त्यामुळेच सावरकरांना लक्ष्य करणे, ही दीर्घकालीन योजना आहे. अर्थात, न्यायालयाद्वारे अशा योजनांना त्यांची जागा दाखवून देणे, हेदेखील महत्त्वाचे ठरते.