मुंबई, देशाच्या आर्थिक नकाशावर आपली छाप कायम ठेवत, महाराष्ट्राने परकीय थेट गुंतवणुकीच्या (एफडीआय) शर्यतीत पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावले आहे. उद्योगविश्वाच्या नजरा आकर्षित करणारा हा पराक्रम म्हणजे केवळ आकड्यांचा खेळ नसून, विश्वास, स्थिर धोरणे आणि सक्षम यंत्रणेचा ठसा आहे. ‘मेक इन इंडिया’पासून ‘मेक इट इन महाराष्ट्र’पर्यंतचा प्रवास यशस्वी ठरवणाऱ्या या कामगिरीमुळे राज्याने पुन्हा भारताच्या आर्थिक इंजिनामध्ये आपले स्थान भक्कम केले आहे.
महाराष्ट्राने २०२४-२५ या आर्थिक वर्षात एकूण १ लाख ६४ हजार ८७५ कोटी रुपयांची विक्रमी परकीय गुंतवणूक आकर्षित केली. ही गुंतवणूक देशात आलेल्या एकूण ४ लाख २१ हजार ९२९ कोटी रुपयांपैकी तब्बल ४० टक्के आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा महाराष्ट्रात ३२ टक्क्यांनी अधिक गुंतवणूक झाली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
गेल्या आर्थिक वर्षात (जानेवारी ते मार्च २०२५) शेवटच्या तिमाहीत २५ हजार ४४१ कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रात आली. हे वर्ष महाराष्ट्रासाठी विक्रमी ठरले असून, मागील १० वर्षांतील सर्वोच्च परकीय गुंतवणुकीचा नवा उच्चांक प्रस्थापित झाला आहे. विशेष म्हणजे, हा उच्चांक आर्थिक वर्षाच्या पहिल्या ९ महिन्यांतच पार झाला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
या ऐतिहासिक आणि विक्रमी गुंतवणुकीसाठी महाराष्ट्रातील जनतेचे मनःपूर्वक अभिनंदन. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री उदय सामंत आणि मंत्रिमंडळाच्या नेतृत्त्वाखाली राज्याची प्रगती अशीच सुरू राहील.