विमानातील 227 प्रवाशांचा जीव धोक्यात...तरीही पाकिस्तानची लँडिंगची मनाई!

28 May 2025 17:42:51
 
227 passengers on the plane are in danger Pakistan refuses to land
 
 
नवी दिल्ली : पाकिस्तानच्या भारताविरोधात कुरापती पुन्हा एकदा जगापुढे उघड झाल्या आहेत. दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या देशाने आता भारतीयांच्या जीवाशी खेळण्याचा आणखी एक काळा कारनामा केल्याचे उघड झाले आहे. एका भारतीय विमानाला आपत्कालीन लँडींग करण्यासाठी हवाई मार्ग वापरण्यास स्पष्ट नकार देण्यात आला.
 
दरम्यान या विमानाचे यशस्वी लँडींग श्रीनगरमध्ये झाले आणि सर्व प्रवासी सुखरुप भारतात पोहोचले. या विमानात एकूण २२७ प्रवासी प्रवास करत होते. परंतु वैमानिकाने प्रसंगावधान दाखवल्याने श्रीनगरमध्ये लँडींग होऊ शकले.
 
श्रीनगर विमानळावरील आपत्कालीन लँडिंगनंतरचे या विमानाची अवस्था दाखवणारे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. व्हायरल फोटो , व्हिडिओतील विमानाची अवस्था पाहून घडणारी एक मोठी दुर्घटना थोडक्यात टळली असेच दिसून येते. दिल्लीहून श्रीनगरच्या दिशेने जाणाऱ्या या इंडिगोच्या विमानाला अचानक खराब हवामानामुळे गारपिटीचा सामना करावा लागला, ज्यामुळे विमानाच्या पुढील भागाचे बरेच नुकसान झाले.
 
इंडिगोने आपल्या निवेदनात म्हटले होते की, दिल्लीहून श्रीनगरच्या दिशेने जाणारे त्यांचे 6E2142 हे विमान खराब हवामानामुळे अचानक मार्गात आलेल्या गारपिटीच्या तडाख्यात मिळाले. इंडिगोने कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, "विमान आणि कर्मचाऱ्यांनी असलेल्या नियमांचे पालन करत विमान श्रीनगरमध्ये आपत्कालीन परीस्थितीत सुरक्षितपणे उतरवले."
 
पाकिस्तानची आडकाठी!
 
वैमानिकाने लाहोर ATC ला उद्धभवणारी आपत्कालीन परीस्थिती टाळण्यासाठी त्यांच्या हवाई हद्दीचा वापर करण्याची परवानगी मागितली, तेव्हा पाकिस्तानने या आपत्कालीन लँडिंगला मनाई केली. आता DGCA म्हणजेच नागरी उड्डाण महासंचालनालय घडलेल्या या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहे.
 
प्रवाशांचा थरकाप
 
२२७ पेक्षा जास्त प्रवाशांना घेऊन जाणारे हे विमान अचानक खराब हवामानामुळे गारपिटीच्या तडाख्यात मिळाले. गारपिटीच्या तडाख्याने प्रवाशांचा थरकाप सुरू झाला दरम्यान वैमानिकाने प्रसंगावधान दाखवत श्रीनगर विमानतळावरील ATC म्हणजेच हवाई वाहतूक नियंत्रणाला 'आपत्कालीन' परीस्थितीची माहिती दिली. आणि नंतर हे विमान सुरक्षितपणे उतरले.
 
भारत-पाक युध्दाचा परिणाम
 
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकच्या युध्दातणावामुळे दोन्ही देशांनी त्यांची हवाई वहातूक हद्द एकमेकांसाठी बंद केली आहे.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0