स्वातंत्र्यवीर सावरकरांची 'बॅरिस्टर' पदवी परत मिळवणार!

27 May 2025 15:21:07

Swatantryaveer Savarkar

मुंबई  : "भारतीय तरुणांमध्ये स्वातंत्र्याची ज्वाला प्रज्वलित करणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांची 'बीए' आणि 'बॅरिस्टर' ही पदवी ब्रिटिशांनी काढून घेतली. त्यापैकी 'बीए'ची पदवी मुंबई विद्यापीठाने परत केली. मात्र, वीर सावरकरांचा सन्मान असलेली 'बॅरिस्टर' ही पदवी अद्याप परत मिळालेली नाही. ती परत मिळवून सावरकरांना मरणोत्तर 'बॅरिस्टर' हा मान मिळवून देण्यासाठी आम्ही सर्वोतोपरी प्रयत्न करू", अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवार, दि. २७ एप्रिल रोजी दिली.

मुंबई विद्यापीठाच्या वतीने आयोजित 'स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर अभ्यास आणि संशोधन केंद्रा'च्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. या कार्यक्रमाला राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ रवींद्र कुलकर्णी, प्र कुलगुरू अजय भामरे, कुलसचिव प्रसाद कारंडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

वीर सावरकरांची बॅरिस्टर पदवी परत मिळवण्याच्या कामात या नव्या संशोधन केंद्राने मदत करावी. त्याबाबत प्रस्ताव आणि कागदपत्रे सादर करावीत, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह नवी दिल्लीत ज्या कार्यालयात बसतात, तेथे त्यांच्या खुर्चीच्या मागे दोनच चित्र आहेत. एक आर्य चाणक्य आणि दुसरे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे. त्यामुळे त्यांची सावरकर भक्ती शब्दांत सांगण्याची गरज नाही. सावरकरांचे जीवन प्रेरणादायी आहे. बालवयात अभिनव भारत सारखी संस्था स्थापन करून त्यांनी भारतीय स्वातंत्र्याविषयी जागृती केली. लंडनमध्ये इंडिया हाऊसच्या माध्यमातून मोठे कार्य उभारले.

राहुल गांधींना दिले आवाहन


- सर्वात खतरनाक क्रांतिकारक कोण असेल तर ते सावरकर आहेत, असा उल्लेख ब्रिटिशांच्या पत्रात आढळतो. म्हणूनच त्यांच्या पदव्या काढून घेतल्या. मार्सेलीस बंदरात सावरकरांना अटक झाली नसती, तर भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास वेगळा असता. दोनवेळा जन्मठेप झालेले ते एकमेव स्वातंत्र्यसैनिक. पण काही मूर्ख त्यांना माफीवीर म्हणतात, त्यांना माझे एकच आवाहन आहे, की तुम्ही अंदमानच्या त्या कोठडीत फक्त ११ तास घालवून दाखवा, मी तुम्हाला पद्मश्री देण्याची शिफारस करेन, असा हल्लाबोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

- सावरकरांचे जेवढे भय जेवढे इंग्रजांना होते, तेवढेच विरोधकांना आहे. कारण सावरकरांचे विचार पुनर्प्रस्थापित झाले, तर आपल्याला आयुष्यात कधीच सत्ता मिळणार नाही, याची भीती त्यांना आहे. मी त्या न्यायाधीशांचे आभार मानेन, ज्यांनी यांना ताकीद दिली, की यापुढे सावरकरांविषयी अवमानकारक शब्द उच्चारला तर याद राखा, असे फडणवीस म्हणाले.

संशोधन केंद्राला निधी कमी पडू देणार नाही!


भारतात इंग्रज आल्यानंतर त्यांनी जी भाषा रूढ केली, त्याला पर्यायी शब्द आपल्याकडे नव्हते. ते शब्द सावकारांनी दिले. ज्यात विज्ञान नाही, ते मला मान्य नाही असे ते परखडपणे सांगायचे. सावरकर विज्ञाननिष्ठ होते. ते केवळ व्यक्ती नव्हे, तर संस्था होते. त्यामुळे मंत्री चंद्रकांत पाटील आणि मुंबई विद्यापीठाचे अभिनंदन, त्यांनी या अतिशय महत्त्वाच्या संशोधन केंद्राची स्थापना केली. राज्य सरकारच्या वतीने मी आश्वस्त करू इच्छितो की, या संशोधन केंद्राला कधीच निधी पडू देणार नाही, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

कलिनामध्ये भव्य संशोधन केंद्र - चंद्रकांत पाटील


अतिशय गौरवशाली कामगिरी करणाऱ्या मुंबई विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांच्या यादीत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नावाचा समावेश नव्हता. तो आम्ही करून घेतला, याचा अभिमान आहे. आता स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर अभ्यास आणि संशोधन केंद्राची स्थापना करीत आहोत. मुंबई विद्यापीठाच्या कलिना येथील संकुलात हे केंद्र असेल. तेथे पदवी ते पीएचडीपर्यंत अभ्यास आणि संशोधन करता येईल. या केंद्रात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्याला साजेसा पुतळा उभारणार आहोत, अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

Powered By Sangraha 9.0