मुंबई : मुसळधार पावसाने मुंबई मेट्रो-३च्या आचार्य अत्रे चौक भुयारी स्थानकात पाणी शिरल्याने प्रवाशांचे हाल झाले. येथील एक संरक्षक भींत कोसळल्याने स्थानकात पाणी शिरल्याची प्रार्थमिक माहिती एमएमआरसी प्रशासनाने दिली. डॉ. अॅनी बेझंट रोडलगत असलेल्या आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकाच्या बांधकाम सुरू असलेल्या प्रवेश मार्गावर हे पाणी शिरले. ही घटना सांडपाणीनिःसारण नाल्यातून अचानक आलेल्या पाण्यामुळे वॉटर-रिटेनिंग वॉल कोसळल्याने घडलेली आहे, ही भिंत प्रवेश/निकास संरचना सुरक्षित ठेवण्यासाठी उभारण्यात आली होती, अशी माहिती प्रशासनाने दिली.
एमएमआरसीने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार, “स्थानकाचे अद्याप काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे जेथून हे पाणी शिरले तो मार्ग आगमन वा प्रस्थानासाठी वापरण्यात येत नव्हता. मात्र, तेथून पाणी येऊ नये म्हणून तात्पुरती संरक्षक भींत उभारण्याचे काम सुरू होते. हे पूर्ण काम १० जूनपर्यंत पूर्ण होईल, असा अंदाज होता. मात्र, पाऊस लवकर आला. लगतच्या भागातून पाण्याचा मारा आणि मुसळधार पावसाने यामुळे ती पडली’’, असे सांगण्यात आले आहे. दरम्यान पक्क्या भिंतीचे बांधकाम हे तीन महिन्यांत पूर्ण होणार आहे, अशी माहितीही देण्यात आली.
’’खबरदारीचा उपाय म्हणून वरळी ते आचार्य अत्रे चौक येथील मेट्रो वाहतूक तात्पुरती थांबविण्यात आली आहे. आरे जेव्हीएलआर ते वरळीपर्यंतची भुयारी मेट्रो वाहतूक सुरळीतपणे सुरू आहे. मेट्रो-३चे अभियंते आणि सुरक्षा चमू यावर युद्धपातळीवर काम करीत आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेला आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. आपत्ती व्यवस्थापन, अभियांत्रिकी व सुरक्षा पथकाने घटनास्थळी तात्काळ कार्यवाही सुरू केली आहे. प्रवाशांची सुरक्षितता आमच्यासाठी सर्वोच्च प्राधान्याची असून, सर्व प्रणाली पूर्णपणे कार्यक्षम झाल्यानंतरच सेवा पूर्ववत सुरू करण्यात येईल. प्रवाशांना होणाऱ्या त्रासाबद्दल आम्ही दिलगीर व्यक्त करतो.’’ असे एमएमआरसीने म्हटले आहे.