मुंबई तुंबली! लोकलसेवा विस्कळीत; राज्यभरात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस

26 May 2025 12:37:43

Mumbai Rain 
 
मुंबई : केरळमध्ये मान्सूनचे आगमन झाल्यानंतर आता राज्यातही मान्सून दाखल झाला आहे. राज्यातील विविध भागांत गेल्या २४ तासांत झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच मुंबईतील अनेक भागांत जोरदार पावसाने हजेरी लावली असून ठिकठिकाणी पाणी तुंबले आहे.
 
यावर्षी जून महिना सुरु होण्याच्या आधीच राज्यात मान्सून दाखल झाला आहे. रविवार, २५ मे रोजी सायंकाळपासून मुसळधार पावसाची सुरुवात झाली आहे. सोमवारी सकाळी ६ वाजतापासून मुंबईतील अनेक भागांत ढग दाटून आल्याने सर्वत्र काळोख निर्माण झाला होता.
 
हे वाचलंत का? -  राज्यात विविध भागांत मुसळधार पाऊस! नागरिकांनी खबरदारी बाळगावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आवाहन
 
मुंबईत सकाळपासूनच मुसळधार पावसाचा जोर सुरु असून अनेक मुख्य रस्त्यांवर पाणी साचले आहे. दादर, वरळी, प्रभादेवी, परळ यासह अनेक भागांत जोरदार पाऊस कोसळला. राज्यात सध्या मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे आणि नाशिक या जिल्ह्यांत पावसाचा सर्वाधिक जोर दिसून येत आहे. पुढील ३ ते ४ तासांत राज्यातील अनेक जिल्ह्यांत ५० ते ६० किमी प्रतितास वेगाने वाहणारा सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, या परिस्थितीत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
 
लोकलसेवा विस्कळीत!
 
सततच्या मुसळधार पावसाने मुंबईची लोकलसेवा विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेवरील वाहतूक सेवा १० ते १५ मिनिटे उशीराने सुरु असून प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. अनेक रेल्वे स्थानंकावर पाणी साचले आहे, अनेक ठिकाणी प्रवाशांची गर्दी पाहायला मिळते आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0