मुजोरी

24 May 2025 11:09:54
 
Vaishnavi Hagavane suicide case in Pune is currently making headlines across the state. Even in this modern era such ruthless inhumane incidents happen in an educated society
 
 
पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण सध्या राज्यभरात गाजत आहे. या आधुनिक काळातदेखील अशा प्रकारच्या निर्दयी, माणुसकीला काळिमा फासणार्‍या घटना सुशिक्षित समाजात घडतात, यातूनच त्यांची नेमकी ‘हुशारी’ लक्षात येते.
 
या प्रकरणाचे समाजमाध्यमांवर आणि समाजात ज्या प्रकारे संतप्त पडसाद उमटले, ते परिपक्व समाजजागृतीचे लक्षण आहे. मात्र, असे असले तरी ज्या कारणातून त्या विवाहितेला आपले प्राण गमावावे लागले, तीदेखील या समाजातील मागासलेपणाची आणि मुजोरशाहीची एक ठसठशीत बाजू आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.
 
ज्या पद्धतीने या प्रकरणातून रोज नवनवे खुलासे होत आहेत, ते धक्कादायक तर आहेतच, मात्र मुजोरपणाचा कळस गाठणारे आहेत. समाजात एका विशिष्ट प्रकारचा आव आणून राहणार्‍या घटकांचे प्रतिनिधित्व करणारी ही घटना भारतीय संस्कृतीमधील महिलांच्या सन्मानाचे जे काही संकेत आखून दिलेले आहेत, त्यांच्या चिंधड्या उडविणारी आहे. हे संकेत पायदळी तुडविले जात आहेत, हेच या घटनेतून अधोरेखित झाले. आजच्या आधुनिक काळात आताच्या पिढीने तरी या वाटेने न जाता, अशा नराधमांना धडा शिकविण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, जेणेकरून भविष्यातील पिढ्यांसाठी अशा प्रकारच्या निर्दयी रूढी समाजात रूजणार नाहीत. हगवणे कुटुंंबीयांना कठोर शिक्षा मिळेल, ही तीव्र भावना जितकी स्वाभाविक आहे, तितकेच समाजाने यातून धडा घेणेदेखील गरजेचे आहे.
 
 
पैशांचा माज, श्रीमंतीचे विकृत प्रदर्शन, राजकीय वजन आणि माणुसकी वेशीवर टांगून आणला जाणारा नैतिकतेचा आव, हे सारं संतापजनक आणि खरे तर किळसवाणेच. ही घटना महिलांच्या सन्मानाला सर्वस्वी ठेच पोहोचविणारी आहे. एकीकडे महिलांच्या स्वातंत्र्याचे गोडवे गायचे आणि मूठभर महिलांनी स्वैराचार करून महिलांनाच खाली मान घालायला भाग पाडायचे, हे अशोभनीयच.त्यामुळे भविष्यात अशा वैष्णवी विकृत समाजव्यवस्थेच्या बळी होता कामा नयेत, यासाठी सर्वांनी जागरूक असले पाहिजे. तसेच महिलांनी आपल्यावरील अत्याचार निमूटपणे, दबावातून सहन न करता, त्याविरोधात आवाज उठवायला हवा. आंधळे प्रेम आणि श्रीमंतीपायी आलेली ही मुजोरी प्रदर्शित करणार्‍यांना धडा शिकविण्याची ही समाजासाठी संधी आहे.
 
बेपर्वा
 
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण उजेडात आलेले असताना, काल-परवा आलेल्या अवकाळी पावसाने प्रशासनाच्या बेपर्वा वृत्तीचीदेखील पोलखोल केल्याचे गेल्या दोन दिवसांत बघायला मिळाले. विशेष म्हणजे, पुण्यातील लोकप्रतिनिधींनी नागरिकांची गैरसोय होऊ नये, म्हणून उन्हाळ्यातच मनपा प्रशासनाला बैठका घेऊन पावसाळापूर्व कामांना गती देण्याबाबतही सूचित केले होते. त्यासाठी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील, माधुरी मिसाळ, आ. हेमंत रासने तसेच सिद्धार्थ शिरोळे आदींनी यासाठी प्रशासनाला वेळोवेळी परिस्थितीची वास्तविकता निदर्शनासही आणून दिली होती, तरीदेखील प्रशासनाची बेपर्वाई नागरिकांचे हाल करीत असल्याचे भीषण वास्तव पुणेकरांना सोसावे लागत आहे.
 
प्रशासनातील अधिकारी आणि ठेकेदारी प्रवृत्ती इतकी मुजोर आणि बेपर्वा का झाली, हा संशोधनाचा विषय नसला, तरी पडद्यामागील आर्थिक हितसंबंध आणि कामातील दिरंगाईच याला कारणीभूत असल्याचे अवकाळी पावसाने सिद्ध केले. नागरी मूलभूत समस्यांचे निवारण करण्यासाठी उपलब्ध असणारी यंत्रणा या महानगरातील सामान्य लोकांना अक्षरशः वार्‍यावर सोडत असल्याचे विसंगत चित्र नक्कीच अशोभनीय आहे.
 
महापालिकेकडे मुबलक निधी असताना उपलब्ध मनुष्यबळात योग्य नियोजन करून पावसाळापूर्व कामे करता येणे शक्य आहे. मात्र, कामे करण्याची मुळी मानसिकताच नसलेल्या प्रशासकीय दिरंगाईमुळे पुणेकरांचे हाल होत आहेत, हे वास्तवदेखील संतापाचा कडेलोट करणारे. यासाठी आता नागरिकांच्या संतापाचा कडेलोट झाला, तर या लोकांची कामे करणार्‍या अधिकारी-ठेकेदारांना पुणेकर सळो की पळो करून सोडतील. अशी स्थिती आणायची असेल, तर अजूनही वेळ गेलेली नाही. नाल्यांची स्वच्छता आणि रस्त्यांवरील खड्डे, बुजवून ते दुरुस्त करणे, शिवाय पाण्याची पाईपलाईन सुरळीत करण्यावर प्राधान्याने भर देणे आवश्यक आहे. मनपा भविष्यात ही कामे युद्धपातळीवर करेल, अशी आशा बाळगायला हरकत नाही, अन्यथा ही बेपर्वाई नागरिकांचा बळी घेतल्याशिवाय राहणार नाही, हेदेखील तितकेच खरे!
 
 - अतुल तांदळीकर 
Powered By Sangraha 9.0