मुंबई: ‘उबाठा’ गटाचे नाशिकचे माजी आमदार नरेंद्र दराडे, तसेच मुंबईतील माजी नगरसेविका सुजाता सानप यांनी शनिवार, दि. २४ मे रोजी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
माजी आमदार दराडे यांच्यासह डॉ. सुधीर जाधव, उत्तमराव आहेर, अजय जैन, दयानंद जावळे, नगरसेवक अंबादास कस्तुरे यांच्यासह उबाठाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
तसेच मुंबई पालिकेतील स्थायी समिती सदस्या आणि कुलाब्यातील माजी नगरसेविका सुजाता सानप, उबाठाचे कुलाबा विधानसभा संघटक गणेश सानप यांनी कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेनाप्रणित शिक्षक सेनेच्या राज्य प्रमुखपदी आमदार किशोर दराडे यांची नियुक्ती करण्यात आली.
पक्षप्रवेशावेळी उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, शिवसेना दिलेला शब्द पाळते आणि बाळासाहेबांचा विचार पुढे नेत आहे. त्यामुळे राज्यातून आणि राज्याच्या बाहेरुन देखील राजकीय पदाधिकारी कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत. शिवसेनेतील बंडानंतर काहीजण म्हणाले होते तुमच्यासोबत गेलेला एकही आमदार निवडून येणार नाही, पण विधानसभा निवडणुकीत ५० चे ६० आमदार झाले, असा टोला त्यांनी उबाठाला लगावला.
धनुष्यबाण आणि शिवसेना गहाण टाकण्याचे काम तुम्ही केले, अशी टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उबाठावर केली. राज्यातील जनतेने हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांचीच खरी शिवसेना आहे यावर शिक्कामोर्तब केले, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
आतापर्यंत मुंबईतील ६५ माजी नगरसेवक शिवसेनेत
मुंबई महापालिकेतील उबाठाचे जवळपास ६५ माजी नगरसेवक शिवसेनेत दाखल झाले आहेत. त्याचबरोबर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक मिळून नगरसेवकांची मोठी फौज शिवसेनेत आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीचाच भगवा फडकेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.
विधानसभा निवडणुकीत जी आश्वासने दिली होती, ती टप्प्याटप्याने पूर्ण करणार, असे ते म्हणाले. विरोधी पक्षाने कितीही टीका केली तर लाडकी बहिणी योजना, शेतकऱ्यांशी संबधित योजना बंद होणार नाहीत, असा पुनरुच्चार शिंदे यांनी केला.