‘लूप’ हा इंग्रजी शब्द आपल्या रोजच्या आयुष्यातही अनेकदा वापरला जातो. एखाद्या गोष्टीत पुन्हा पुन्हा अडकणे, एकाच ठिकाणी अडकल्यासारखं वाटणे किंवा सारखं तेच घडत राहणे, अशा अर्थांनी ‘लूप’चा शब्दप्रयोग होताना दिसतो. विज्ञानकथांमधील ‘टाईम लूप’ ही कल्पनादेखील याचाच विस्तार असते. एक अशी परिस्थिती, जिथे एखादी व्यक्ती काळाच्या विशिष्ट क्षणात अडकते आणि तेच तेच दिवस, त्याच घटना किंवा अनुभव पुन्हा पुन्हा एकामागोमाग एक घडत राहतात. काही वेळा ही कल्पना विनोदी अंगाने दाखवली जाते, तर काही वेळा भयावह. पण, ’भूल चूक माफ’ या नव्याकोर्या सिनेमात ‘लूप’ची ही संकल्पना भावनिक, सामाजिक आणि तात्त्विक पातळीवर आपल्या मनाला स्पर्श करुन जाते.
राजकुमार रावने रंजन ही प्रेमात पडलेल्या, जीवनाकडे साध्या नजरेने पाहणार्या आणि एका स्वप्नाळू लग्नाच्या कल्पनेत हरवलेल्या तरुणाची भूमिका साकारली आहे. त्याच्या आयुष्यात आलेली तितली (वामीका गब्बी) ही केवळ एक प्रेमिका नाही, तर आत्मभान असलेली, निर्णयक्षम आणि आपल्या कुटुंबाच्या सन्मानासाठी कठोर भूमिका घेणारी मुलगी. तिच्या वडिलांची अट एकच, रंजनला सरकारी नोकरी पाहिजे! मग काय, या अपेक्षापूर्तीच्या नादात रंजन आयुष्यात काही चुकीचे निर्णय घेतो. लाचही देतो आणि एक शॉर्टकट स्वीकारतो आणि हळूहळू आपल्या मूल्यांपासून भरकटत जातो.
पण, नियतीचं गणित काहीसं वेगळंच असतं. त्याच्या लग्नाच्या पूर्वसंध्येला काहीतरी विचित्र घडतं आणि रंजनचा दिवस संपतो... मग पुन्हा सुरू होतो, पण परत 29 तारखेलाच! पुढचा दिवस उगवतच नाही. वेळेला एक साचलेलं रूप प्राप्त होतं. काळ थबकतो आणि रंजन त्यात अडकतो. ही केवळ वैज्ञानिक गडबड नाही, तर रंजनच्या आयुष्यातील एक आंतरिक गोंधळाचं प्रतीक बनते. तो ‘लूप’मध्ये अडकलाय. पण, का? आणि यातून त्याची सुटका होईल का? यासाठी हा चित्रपट बघावा लागेल.
म्हणजेच काय तर प्रत्येक नव्या 29 तारखेचा दिवस हा रंजनसाठी एक परीक्षाच ठरतो. तो वेगवेगळ्या प्रकारांनी या ‘लूप’मधून बाहेर पडायचा प्रयत्न करतो. पळून जाऊन, माफी मागून, समजावून सांगून, अगदी आत्महत्या करूनसुद्धा! पण, वेळ त्याचं काही ऐकत नाही आणि शेवटी, तो स्वतःच्या आत डोकावायला लागतो. त्याला कळतं की, हा ‘लूप’ केवळ वेळेचा खेळ नाही, तर आपल्या चुकांची कबुली आणि त्यातून शिकण्याची तयारी यांची कसोटी आहे.
चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन करणार्या करण शर्मा यांनी ‘लूप’चा वापर केवळ गंमत म्हणून न करता, त्यामागे एक अख्खी विचारसरणी उभी केली आहे. चित्रपटाच्या दुसर्या भागात ही विचारांची खोली प्रकट होते. पहिल्या भागातील हलकाफुलका, विनोदी प्रवास क्षणार्धात गंभीर रूप धारण करतो. प्रेक्षकही हसता हसता मग अंतर्मुख होतो.
‘भूल चूक माफ’ या नावामागची साधीशी संकल्पना - चूक झाली तर माफ करा; ही प्रत्यक्षात किती कठीण आहे, हे रंजनला ‘लूप’मध्ये अडकल्यावर लक्षात येतं. आपण कधी ना कधी चुकतोच, पण त्या चुका स्वीकारणं, माफी मागणं आणि आपल्यात मनापासून बदल घडवणं, हे सहजसाध्य नसतं. रंजन जसजसा ‘लूप’मधून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो, तसतसा त्याचा हा अंतर्गत प्रवास अधिक गडद आणि गहन बनतो. तो केवळ तितलीचं प्रेम परत मिळवण्यासाठी झगडत नाही, तर स्वतःला सावरण्यासाठी, स्वतःला पुन्हा मिळवण्यासाठीही नेटाने लढतो.
राजकुमार रावच्या अभिनयात नेहमीप्रमाणे एक खास सहजता आहे. त्याचं पात्र रंजन एक सामान्य, चुका करणारं, पण अंतःकरणाने भला माणूस. तो अत्यंत प्रामाणिकपणे साकारतो. त्याचा गोंधळ, त्याची हतबलता, त्याचा पश्चात्ताप हे सगळं इतकं नैसर्गिक वाटतं की प्रेक्षक त्याच्यात स्वतःला पाहू लागतो.
वामीका गब्बी ही तितलीच्या भूमिकेत एकदम उठून दिसते. तिचं पात्रही फक्त नायिकेपुरतं मर्यादित न राहता, एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व म्हणून आपली छाप सोडतं. तिच्या डोळ्यांमधून व्यक्त होणारी निर्णयक्षमता आणि प्रेम यांचं मिश्रण मनाला भिडतं.
झाकीर हुसेन, रघुबीर यादव, संजय मिश्रा यांच्यासारख्या कसलेल्या कलाकारांनी या कथेला अधिक सखोल बनवलं आहे. विशेषतः संजय मिश्रांचा एका दृश्यातील दीर्घ संवाद तो प्रेक्षकांच्या अंतर्मनाला हलवतो. हा ‘मोनोलॉग’ केवळ चित्रपटाचा ‘टर्निंग पॉईंट’ नसून, तो या संपूर्ण कथेचा गाभा आहे. इतर कलाकारांनीही आपल्या भूमिकेला न्याय दिला असून, ही कथा अधिक जिवंत केली आहे.
चित्रपटात कुठेही जबरदस्तीचा भपका नाही. छायाचित्रणदेखील सुरेख असून ते कथानकाच्या भावनिक चढउतारांना साजेसे आहे. एडिटिंगने कथेला योग्य लय दिली आहे. ‘टाईम लूप’सारखी संकल्पना मांडताना जे तांत्रिक अडथळे येतात, त्यांतूनही चित्रपट अगदी सहज मार्ग काढतो. पार्श्वसंगीतही कथेला पूरक आहे. जरी गाणी विशेष लक्षात राहणारी नसली, तरी कथानकात ती अडथळा ठरत नाहीत.
‘भूल चूक माफ’ हा फक्त विज्ञानावर आधारित सिनेमा नाही. तो एका सामाजिक-सांस्कृतिक बिंबातून समोर येतो. भ्रष्टाचार, शॉर्टकट्स, चुकीच्या निर्णयांचे परिणामकारक चित्रण करताना तो कोणताही मोठा उपदेश देत नाही, पण प्रेक्षकाच्या मनात विचार रुजवतो. आपल्या चुकांचं ओझं सोडणं आणि ते ओझं स्वीकारणं यात फरक काय आहे, हे या सिनेमाच्या शेवटच्या 30 मिनिटांत फार परिणामकारकपणे दाखवलं जातं.
या चित्रपटाचा शेवट हेच सांगतो की, वेळ बदलत नाही, आपण बदललो, तर वेळही आपल्याला संधी देते. माफ करणं हे दुसर्यांपेक्षा स्वतःसाठी अधिक गरजेची क्रिया आहे. ‘भूल चूक माफ’ हा चित्रपट आपल्या चुका स्वीकारून पुन्हा नवी सुरुवात करण्याचा संदेश देतो, तोही कुठलाही उपदेश न करता! केवळ कथा, भावना आणि पात्रांच्या प्रवासातून...
‘भूल चूक माफ’ हा सर्वार्थाने एक आगळावेगळा चित्रपट आहे. हा चित्रपट म्हणजे केवळ मनोरंजन किंवा संदेश नाही, तर तो एक प्रवास आहे. प्रवास अशा माणसाचा जो चुकतो, अडकतो, गोंधळतो; पण शेवटी स्वतःला शोधतो आणि आपल्यालाही शोधायला लावतो. पाश्चात्यांपेक्षा भारतीय भावनांनुसार साकारलेला ‘टाईम लूप’चा हा प्रयोग प्रेक्षकांना केवळ चित्रपटगृहात खिळवूनच ठेवत नाही, तर ही कथा चित्रपट पाहिल्यानंतरही मनाच्या एका कोपर्यात दीर्घकाळ रेंगाळते.
हा चित्रपट फक्त ‘पाहणं’ पुरेसं नाही, तर तो मनात उतरवावा लागतो. त्याच्या प्रत्येक ‘लूप’मध्ये स्वतःची सावली शोधावी लागते आणि मग कुठेतरी आपणही ‘भूल चुक माफ’ म्हणत आयुष्यात पुढे जायला तयार होतो.
लेखक आणि दिग्दर्शक : करण शर्मा
कलाकार : राजकुमार राव, वामीका गब्बी, रघुबीर यादव, संजय मिश्रा, सीमा पावा, झाकीर हुसेन.