मुंबई : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे या पिता-पुत्राला अटक करण्यात आली असून आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. शुक्रवार, २३ मे रोजी त्यांनी कोल्हापूर येथे माध्यमांशी संवाद साधला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "आज सकाळी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेंना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी योग्य कारवाई केली आहे. पुढेही हे प्रकरण लॉजिकल एण्डला नेण्याकरिता ज्या गोष्टी करण्याची आवश्यकता आहे त्या गोष्टी पोलिस करतील. अशा प्रकारे प्रताडित करून आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणे, या गोष्टी सहन केल्या जाणार नाही. त्यामुळे याप्रकरणी कायद्यानुसार जी कडक कारवाई करता येईल ती केली जाईल," असे ते म्हणाले.
मकोका लावणार का?
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात मकोका लावण्याची मागणी तिच्या कुटुंबियांकडून करण्यात येत आहे. याबद्दल बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "मकोका लावण्याकरिता त्याचे काही नियम आहेत. त्या नियमात बसल्यास ते लावता येईल.पण नियमात बसणार की, नाही यासंदर्भात आज सांगता येत नाही. त्यामुळे त्यावर आज काही बोलू शकणार नाही. आजच्या एकविसाव्या शतकात मुलींमध्ये आणि सुनांमध्ये फरक करणे चुकीचे आहे, अशा परिस्थितीत अशा प्रकारची वागणूक देणे हे पाप आहे आणि ते याठिकाणी झालेले दिसून येते," असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "अजितदादा याप्रकरणी गंभीर नाही असे नाही. कोणत्याही कार्यकर्त्याकडे किंवा समाजात कोणाकडे लग्नाला बोलावलं तर आपण जातो. त्यावेळी पुढे काय घडणार याची कल्पना आपल्याला नसते. एवढेच सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पोलिसांनी आरोपींना पकडले आहे. पोलिसांनी उचित कारवाई केली असून पुढेही ते उचित कारवाई करतील. आता या प्रकरणाला खूप फाटे फोडणे चुकीचे आहे," असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.