मुंबई, दि. २० : विशेष प्रतिनिधी धारावी पुनर्वसनासाठी मिठागर जमिनीचा वापर करण्यास काँग्रेसने केलेला विरोध हा निव्वळ राजकीय दुटप्पीपणाचा सर्वोत्तम नमुना आहे. सत्ता असताना हा पर्याय काँग्रेसनेच मांडला होता मात्र आज सत्तेपासून दूर असल्यामुळे काँग्रेस हा पर्याय नाकारत आहे. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा आणि खासदार वर्षा गायकवाड आणि आमदार ज्योती गायकवाड यांनी अलीकडे धारावीकरांसाठी "फक्त इन-सिटू पुनर्वसनच हवे" अशी मागणी केली आहे. मात्र या मागणीच्या विरोधात तथ्य आणि इतिहास हा स्वतः काँग्रेसच्या कारकिर्दीतच सापडतो.
दि.'४ फेब्रुवारी २००४' रोजी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारने काढलेल्या शासकीय निर्णयात (GR) स्पष्ट नमूद केले होते की, धारावीतील कुटुंबापैकी जर एकाहून अधिक पात्र सदस्य असतील, किंवा जागेअभावी इन-सिटू पुनर्वसन शक्य नसेल, तर त्यांचे पुनर्वसन सॉल्ट पॅन आणि अन्य शासकीय जमिनीवर केले जाईल. इतकेच नव्हे, तर २७ सप्टेंबर २०११ रोजी मुंबईत झालेल्या ‘शहरी गरिबी निर्मूलन व राजीव आवास योजना’ विषयक राष्ट्रीय परिषदेत काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वतः मिठागर जमिनीचा वापर करण्याचा मुद्दा मांडला होता.
त्यावेळी त्यांनी असे स्पष्टपणे म्हटले होते की, "मुंबईत जमीन ही अत्यंत मर्यादित संसाधन आहे. जर सॉल्ट पॅन जमिनी विकासासाठी खुल्या केल्या, तर मुंबईवरील जमीन तणाव काही अंशी कमी होईल." प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या अधिकृत वेबसाइटवर ही माहिती उपलब्ध आहे. आज या इतिहासाकडे काँग्रेसचे नेते पाठ फिरवत आहेत. धारावीसारख्या दाट वस्ती असलेल्या भागात, जिथे १० लाखांहून अधिक नागरिक राहतात, तेथे सर्वांना फक्त मूळ जागीच पुनर्वसित करणे भौगोलिकदृष्ट्या शक्य नाही. त्यामुळे मिठागर जमीन आणि इतर शासकीय जमिनींचा पर्याय हा आवश्यकच आहे. मात्र गायकवाड भगिनी सत्तेबाहेर असताना लोकभावना भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. हे करत असताना त्यांनी स्वतःच्या पक्षाच्या धोरणांना व इतिहासालाही नाकारले असल्याचे वरील उदाहरणातून स्पष्ट दिसते आहे.