मासिक पाळी आणि शाळा

    22-May-2025
Total Views | 45

Vaidehi Patil (Mahad)

पिता रक्षति कौमारे भर्ता रक्षति यौवने ।
रक्षन्ति स्थविरे पुत्रा न स्त्री स्वातन्त्र्यं अर्हति ।

स्त्री प्रतिष्ठेच्या, एकता आणि एकात्मतेच्या बढाया करणारे आम्ही, या मनुस्मृति मधील श्लोका प्रमाणे जस अलंकाराच्या गोंडस नावाखाली स्त्रीला जखडलं तसच, मासिक पाळी नावाच्या विटाळ संकल्पनेत आमच्या पुरुषत्वाला ग्रासलेचे मला आज दिसते आणि आज हाच विषय चिंतेचा होऊन बसतो, तरी याबद्दल तुम्ही आम्ही चिंता करायची गरज नाही, कारण चिंता ही माणसाच्या आयुष्याला चीते कडे घेऊन जाणारी असते. आणि चिंतन हेच माणसाच्या आयुष्यात चैतन्य फुलवण्याचं काम करते.
 
मासिक पाळी आली म्हणून, आईने मला करू दिली नाही देव पूजा खरच मासिक पाळी येणे ही स्त्रियांसाठी असते का हो सजा? मासिक पाळी आली की, आई नियमांची यादीच बनवून देते नशीब माझं मासिक पाळी प्रत्येक महिन्यात पाच दिवसच येते "Birthday आहे तिचा", "Mc आलीय", "कावळा शिवला "," युद्धावर आहे ती " हे सर्व कोडवर्ड मासिक पाळीत असतात. पाळी हा विषय चारचौघांत बोलता येईलच असं नाही. खरंतर पाळी ही स्त्रीची ओळख, बाईपणाची मिरवता येईल अशी खूण !

तरीही पाळीला विटाळ म्हणुन संबोधले जाते. पुर्वीपासुन चालू असलेल्या गैरसमजुतीनीं स्त्रीला वाळीत टाकलेल्या सारखीच स्थिती असते. "मासिक पाळी आणि शाळा" हा असा विषय आहे की जो कदाचित काही लोकांना अस्वस्थ करेल. पण तुम्हा सर्वांना माहीतच आहे की 28 मे हा दिवस जागतिक मासिक पाळी दिन म्हणून साजरा करतात. याच दिवसाचे औचित्य साधून आपण मासिक पाळी या विषयावर आज खुलून बोलायला हव. काहींना विचित्र वाटेल आणि काहीजण त्यावर उघडपणे बोलायला टाळतील. पण मला असं वाटतं की मुळात जी समस्या नाही. पण तिच्याकडे समस्या म्हणूनच पाहिले जाते. ती स्त्रीची मासिक पाळी उंबरठ्या आतला विषय आपण उंबरठ्याबाहेर काढूया. चला तर मग तिच्यावर बोलू काही.....

मैत्रिणींनो आपण शाळेमध्ये सायन्स शिकतो. शरीर रचना, प्रजनन प्रक्रिया, हार्मोन्स सर्वकाही. पण मासिक पाळी हा विषय जेव्हा खऱ्या आयुष्याच्या समोर येतो. म्हणजे एखाद्या मुलीला तिची मासिक पाळी येते तेव्हा बऱ्याच वेळा शाळा मौन राहते, शिक्षक मौन राहतात, पालक हि मौन राहतात. पण या सगळ्यात सर्वात जास्त त्रास कोणाला होतो माहित आहे? त्या मुलीला, जी अजून लहान आहे, घाबरलेली आहे. आणि आपल्याला कोणीतरी समजून सांगावं असं तिला वाटत असतं. शाळेमध्ये विशेषता ग्रामीण भागात मासिक पाळी सुरू झाल्यानंतर मुली गहाळ राहतात. काही मुली तर शिक्षणच अर्धवट सोडतात. कारण काय शाळे मध्ये स्वच्छतागृह, सॅनिटरी नॅपकिन्स मिळत नाही. आणि अजूनही समाजात या विषयावर खुलेपणाने बोलायला संकोच वाटतो.

माझ्यासोबत झालेल्या एक प्रसंग मला आज येथे नमूद करावासा वाटतो. माझ्यासोबत ची एक मुलगी आम्ही सहावीला असताना अचानक एक दिवस ती रडत रडत घरी निघून गेली. शाळेतही आली नाही पुन्हा भेट झाल्यावर असं कळलं की, तेव्हा तिला तिची पहिली मासिक पाळी आली होती. तिने शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त बघितलं. तिला काहीच माहित नव्हतं ती खूप घाबरून गेली. शिक्षकांना सांगायची हिंमत झाली नाही. काही मुलं तिच्याकडे बघून हसू लागली. म्हणून तिला पुन्हा त्या शाळेत जाण्याची भीती वाटू लागली. किती शर्मिची गोष्ट आहे. कितीतरी मुलींना असे अनुभव येत आहेत. पण अजूनही आपण समाज म्हणून, शाळा म्हणून, पालक म्हणून गप्प बसलो आहोत. म्हणूनच मला असं वाटतं की शाळा हे केवळ शिक्षणाचे केंद्र नसावं. ते विचारांचे केंद्र असावं. तिथे पाळी या विषयावर योग्य ते शिक्षण देणे खूप गरजेचे आहे. कारण शिक्षण म्हणजे गणित आणि विज्ञान नव्हे, तर स्वतःला समजून घेणे आणि स्वतः सोबत स्त्रीत्वाचा सन्मान राखता येणे हे देखील आहे.

भारतातच नव्हे तर जगातील अशा बऱ्याच देशांमध्ये मासिक पाळीबद्दल अंधश्रद्धा पाळल्या जातात. नेपाळमध्ये 'चौपाडी' नावाची प्रथा आहे. पाळी आलेल्या महिलेस घरात न राहता, गोठ्यात राहावं असं सांगितलं जातं. आसामच्या कामाख्या देवीचं मंदिर एक शक्तिपीठ म्हणून पाहिलं जातं. हे मंदिर गुवाहाटी इथे आहे. कामाख्या देवीला "Menstruation Goddess" असा दर्जा दिला आहे म्हणजे 'मासिक पाळीची देवी'. एकीकडे शक्तिपीठ म्हणून कामाख्या देवीची पूजा केली जाते तर दुसरीकडे मासिक पाळीबद्दल असणाऱ्या अंधश्रद्धांना वाव दिला जातो. मासिक पाळी या गोष्टीकडे आपण कधी उघड्या आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलंच नाही. हे दुर्दैवच म्हणावे लागेल.

मला असं वाटतं हे सगळं थांबायला हवं. त्यामुळे शाळेने पुढाकार घेणे खूप गरजेचे आहे. शाळा प्रशासनाने मुलींन बरोबर मुलांनाही या विषयाची समज आणि शिकवण देणं. त्यांना संवेदनशील करणे खूप महत्त्वाचा आहे. कारण एका मुलाला कळलं की मासिक पाळी हा विषय काय? तर तो गर्ल्स प्रॉब्लेम नाही तर ह्यूमन बॉडीचा एक नित्यक्रम आहे. तर समाज जीवनात खूप मोठा बदल होवू शकतो. त्याच बरोबर समाजात स्त्री बाबत आदराची आणि समानतेची भावना निर्माण होणे गरजेच आहे. या सगळ्याची सुरवात शाळेपासून व्हायला हवी.

Nelson Mandela म्हणतात,

"Education is the most powerful weapon which you can use to change the world."

खरच जर शिक्षण हे जग बोलणार शस्त्र असेल तर, शाळांनी मुलींसाठी स्वच्छता, सुरक्षितता आणि आत्मसन्मान सुनिश्चित करणारी पायाभूत सुविधा तयार करणे गरजेचे आहे. आरोग्य शिक्षणाच्या माध्यमातून मासिक पाळीबाबत जागरूकता वाढवली पाहिजे. शिक्षकांनी या विषयावर संवेदनशीलता दाखवली पाहिजे.

म्हणूच जाता जाता इतकच म्हणते......

"होवूद्या ना वाद आता, संवाद झाला पाहिजे, माणसाच्या स्पंदनाचा नाद आला पाहिजे, एक नवी साद जी होवू द्यावी पोरखी, अरे माणसाच्या अंतरातून नाद आला पाहिजे... 

तो नाद स्त्री जाणीवेचा असावा, तो नाद शाळा आणि मासिक पाळी यांच्या समन्वयाचा असावा इतकाच आशावाद व्यक्त करते आणि थांबते. 
धन्यवाद. 
प्रथम पारितोषिक विजेता : गट क्र. १
कु.वैदेही पाटील
कोकण एज्युकेशन सोसायटी ग.द.आंबेडकर हायस्कूल बिरवाडी,महाड
वय :- १४, इयत्ता ८ वी

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121