पुणे : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर मंत्री उदय सामंत यांनी कस्पटे कुटुंबियांची भेट घेतली असून हा निचपणाचा कळस आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. तसेच या नीचपणाला शिक्षा झाली पाहिजे हीच आमची भूमिका असल्याचेही ते म्हणाले.
भेटीनंतर माध्यमांशी बोलताना मंत्री उदय सामंत म्हणाले की, "मी आताच वैष्णवी हगवणेच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. हा निचपणाचा कळस आहे, असे मला वाटते. याबाबतीत मी पोलीस अधिकाऱ्यांशीदेखील चर्चा केली आहे. याप्रकरणी तीन जणांना अटक केली असून दोन जण फरार आहेत. त्या दोन जणांचा शोध घेण्यासाठी ६ पथक तैनात केली आहेत. पुढील काही तासात त्यांनादेखील तुरुंगात टाकण्यात पोलिस यशस्वी होतील, अशी सगळ्यांनाच अपेक्षा आहे. परंतू, हगवणे कुटुंबीयांनी जो निघ्रृणपणा आणि नीचपणा दाखवला आहे त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे, हीच आमच्या सगळ्यांची भूमिका आहे. हीच भूमिका मी त्यांच्या वडिलांसोबत आणि काकांसोबत बोललो आहे. अशा पद्धतीचे धाडस भविष्यामध्ये कोणी करू नये, अशा पद्धतीची शिक्षा या पाचही लोकांना झाली पाहिजे," असे ते म्हणाले.
हे वाचलंत का? - मंत्री आदिती तटकरेंनी घेतली वैष्णवी हगवणे यांच्या पालकांची भेट! म्हणाल्या, "न्यायाच्या प्रक्रियेत..."
ही प्रवृत्ती ठेचली गेली पाहिजे!
"सुदैवाने १० महिन्यांचे बाळ कस्पटे कुटुंबीयांच्या ताब्यात दिले आहे. या सगळ्या गोष्टींचा परिणाम समाजावर कायमस्वरुपी होत असतो. त्यामुळे नुसता पाच जणांपूरता तपास न थांबवता यात अजून काही कंगोरे आहेत का? याचादेखील तपास पोलिस करतील. गेलेली व्यक्ती परत येऊ शकत नसली तरी या घरासोबत जो मोठा आघात झाला आहे, तो भविष्यात कुठेही होऊ नये किंवा अशी पुनरावृत्ती होऊ नये, याचीदेखील पोलिसांनी दखल घेतली पाहिजे. त्याच पद्धतीने आमचे पोलीस डिपार्टमेंट काम करत आहे. ही प्रवृत्ती ठेचली गेली पाहिजे. या नीचपणाला शिक्षा झाली पाहिजे, हीच आमची भूमिका आहे," असेही मंत्री उदय सामंत म्हणाले.