नवी दिल्ली, ऑपरेशन सिंदूरबद्दल जगातील प्रमुख देशांना माहिती देण्यासाठी आणि पाकिस्तानचा दहशतवादासोबतचा संबंध उघड करण्यासाठी भारताचा ‘ग्लोबल आउटरिच प्रोग्राम’ बुधवारपासून सुरू झाला आहे. सात प्रतिनिधी मंडळांपैकी दोन प्रतिनिधी मंडळांना आपल्या प्रवासास प्रारंभ केला आहे.
जदयु खासदार संजय झा यांच्या नेतृत्वाखालील प्रतिनिधी मंडळ सर्वप्रथम रवाना होणार आहे. प्रतिनिधी मंडळ इंडोनेशिया, मलेशिया, कोरिया प्रजासत्ताक, जपान आणि सिंगापूरला जाईल. त्यात भाजप खासदार अपराजिता सारंगी, ब्रिजलाल, हेमांग जोशी आणि प्रदान बरुआ, तृणमूल काँग्रेसचे अभिषेक बॅनर्जी, सीपीएमचे जॉन ब्रिटास, माजी परराष्ट्र मंत्री आणि काँग्रेसचे नेते सलमान खुर्शीद आणि माजी राजनयिक मोहन कुमार यांचा समावेश आहे.
त्यानंतर शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ निघेल. हे पथक युएई, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो, सिएरा लिओन आणि लायबेरियाला जाणार आहे. या शिष्टमंडळात भाजप खासदार बांसुरी स्वराज, अतुल गर्ग, मनन कुमार मिश्रा, माजी खासदार एसएस अहलुवालिया, इंडियन युनियन मुस्लिम लीगचे खासदार ईटी मोहम्मद बशीर, बीजेडी खासदार सस्मित पात्रा आणि माजी राजनयिक सुजन चिनॉय यांचा समावेश आहे.
काँग्रेसचे शशी थरूर, द्रमुकच्या के. कनिमोझी, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) च्या सुप्रिया सुळे, भाजपचे बैजयंत पांडा आणि भाजपचे रविशंकर प्रसाद यांच्या नेतृत्वाखालील इतर प्रतिनिधी मंडळे पुढील काही दिवसांत रवाना होतील.
अशी झाली देशांची निवड
• पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्ध संदेश देण्यासाठी भारताने सुमारे तीन डझन देशांपर्यंत पोहोचण्याचा एक मोठा राजनैतिक उपक्रम सुरू केला आहे. त्याविषयी मंगळवारी परराष्ट्र सचिव विक्रम मिश्री यांनी सात प्रतिनिधी मंडळांना माहिती दिली.
• त्यांचा हवाला देत, भाजप खासदार अपराजिता सारंगी म्हणाल्या की त्यापैकी सुमारे १५ देश संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे सदस्य आहेत, ज्यामध्ये दर दोन वर्षांनी पाच स्थायी आणि १० अस्थायी सदस्य आहेत.
• याशिवाय, यादीत नजीकच्या भविष्यात संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे सदस्य बनणारे पाच देश देखील समाविष्ट आहेत.
• जागतिक व्यासपीठावर सामान्यतः ऐकले जाणाऱ्या काही देशांचीही निवड करण्यात आली आहे.