“तिच्यावर बोलू काही…” – मासिक पाळीवर मुक्त संवाद साधणारी जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा

20 May 2025 12:29:19

Tichyavar Bolu Kahi Seva Sahayog Foundation

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Tichyavar Bolu Kahi Seva Sahayog Foundation)
मासिक पाळी स्वच्छता दिनानिमित्त (२८ मे) सेवा सहयोग फाउंडेशन आणि महानगर गॅस लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने “तिच्यावर बोलू काही…” या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. किशोरी विकास प्रकल्पांतर्गत राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचा उद्देश किशोरवयीन मुली आणि महिलांमध्ये मासिक पाळी विषयी खुलेपणाने संवाद घडवणे, सामाजिक टॅबूंना आव्हान देणे आणि त्यांचं मानसिक-शारीरिक सक्षमीकरण करणे हा होता.

हे वाचलंत का? : विज्ञानयोगी खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन!

स्पर्धेची पूर्वतयारी व प्राथमिक फेरी दि. १८ मे रोजी महाड, कर्जत, पालघर आणि ठाणे या ठिकाणी संपन्न झाली. स्पर्धेत युवक, युवती, महिला आणि पुरुष अशा विविध वयोगटांतील सहभागींनी भाग घेतला. मासिक पाळी या विषयावर आपल्या वैयक्तिक अनुभवांचे, भावनिक गुंतवणुकीचे आणि सामाजिक वास्तवाचे प्रभावी चित्रण त्यांनी केले.

स्पर्धेसाठी तीन वयोगटांनुसार विषय निश्चित करण्यात आले होते :
गट १ (११-१६ वर्षे) करीता सॅनिटरी पॅडची भेट, शरीरातील बदल आणि माझे मन, पहिली पाळी – जोर का झटका धीरेसे, मासिक पाळी आणि शाळा
गट २ (१७-२१ वर्षे) करीता कळी उमलताना, मासिक पाळी – लाजेची की सन्मानाची?, ‘ती’च्या नवीन भावना, स्त्रीशक्तीची सुरुवात – पाळी
गट ३ (२१ वर्षांवरील) करीता उंच माझा झोका, तारुण्याच्या उंबरठ्यावर, तिची पाळी, माझी पाळी, मुझे कुछ कहना है

या स्पर्धेचे वेगळेपण म्हणजे पुरुष स्पर्धकांचा सहभागही दिसून आला, ज्यामुळे समाजात लैंगिक समतेबाबत सकारात्मक संकेत मिळाला. स्पर्धकांनी केवळ भाषण नव्हे, तर अनुभव, समज आणि भावनिक समरसता यांची उत्तम सांगड घालत मन हेलावणारी भाषणे सादर केली.

ठाण्यातील मो. ह. विद्यालय येथे दि. १८ मे रोजी स्पर्धेची अंतिम फेरी मोठ्या उत्साहात पार पडली. प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी विधान परिषद आमदार चित्रा वाघ यांची प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थिती स्पर्धेचे विशेष आकर्षण ठरली. त्यांच्यासोबत सेवा सहयोग फाउंडेशनचे संचालक किशोर मोघे, किशोरी प्रकल्पाचे ईसी रवींद्र मीठे, पीईसी डॉ. अस्मिता हेगडे, डॉ. भावना मिस्त्री, वर्षा परब आणि किशोरी प्रकल्प प्रमुख आरतीताई नेमाने यांचीही उपस्थिती लाभली.

चित्रा वाघ यांनी आपल्या भाषणात किशोरींशी संवाद साधताना त्यांच्या भावनिक गरजा, समाजातील रूढींना तोडण्याची गरज आणि मासिक पाळी विषयी खुलेपणाने बोलण्याचे महत्व अधोरेखित केले. विशेष म्हणजे, त्यांनी “या स्पर्धेत केवळ मुलीच नव्हे तर मुलेही उत्साहाने सहभागी होत आहेत, हे समाजात बदल होत असल्याचं लक्षण आहे” असे नमूद करत युवकांच्या सहभागाचे कौतुक केले.

स्पर्धेचा निकाल जाहीर करताना पुढील विजेत्यांना गौरविण्यात आले:
गट १ (११-१६ वर्षे):
प्रथम : वैदेही लक्ष्मण पाटील
द्वितीय : सोनाली पासी
तृतीय : सुजल शेळके
उत्तेजनार्थ : रुचिता शेषनाथ झा

गट २ (१७-२१ वर्षे):
प्रथम : समृद्धी मोराणकर
द्वितीय : स्नेहा शिंदे
तृतीय : श्रावण कदम
उत्तेजनार्थ : वर्षाली ठाकूर

गट ३ (२१ वर्षांवरील):
प्रथम : तन्वी महेंद्र मेस्त्री
द्वितीय : प्रेमनाथ शाम पाटील
तृतीय : यश रवींद्र पाटील
उत्तेजनार्थ : प्राची प्रदीप राव

कार्यक्रमादरम्यान इयत्ता १० वीमध्ये उत्तम गुणांनी उत्तीर्ण झालेल्या किशोरींचा सत्कारही करण्यात आला. परीक्षकांनी स्पर्धेच्या निकषांची माहिती देत स्पर्धकांच्या भाषणातल्या बलस्थानांवर प्रकाश टाकला.

तसेच ह्या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ दि. २८ मे रोजी काशीनाथ घाणेकर सभागृह, ठाणे येथे होणार आहे. प्रत्येक विजेत्याला रोख पारितोषिक (₹५०००, ₹३०००, ₹२०००), सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. “तिच्यावर बोलू काही…” ही स्पर्धा केवळ भाषणाचा कार्यक्रम न राहता, पाळीसारख्या संवेदनशील विषयावर समाजात मोकळेपणाने संवाद सुरू करणारा आणि स्त्री-पुरुष समतेचा विचार रुजवणारा सामाजिक शिक्षणाचा प्रेरणादायी मंच ठरला. किशोरी विकास प्रकल्पाच्या माध्यमातून सेवा सहयोग फाउंडेशन व महानगर गॅस लिमिटेड यांनी एक सकारात्मक सामाजिक परिवर्तनाची दिशा दाखवली आहे.

Powered By Sangraha 9.0