मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Lesson on Operation Sindoor in Madaras) भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले. भारतीय लष्कराच्या शौर्याची गाथा उत्तराखंडच्या मान्यताप्राप्त मदरशांमध्ये शिकवली जाईल; याबाबत उत्तराखंडच्या पुष्कर सिंह धामी सरकारने मंगळवारी मोठी घोषणा केली. धामी यांनी धामी यांनी मदरसा बोर्डाचे अध्यक्ष मुफ्ती शमून कासमी यांच्याशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेतला.
मदरशातील विद्यार्थ्यांना देशाच्या सैन्याचे शौर्य आणि बलिदान समजेल, याअर्थी उत्तराखंड मदरसा बोर्डाने राज्यातील सर्व मदरशांमध्ये ऑपरेशन सिंदूर विषयी धडे देण्याचा निर्णय घेतला. मुफ्ती शमून कासमी यांनी मंगळवारी दिल्लीत केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत शिक्षणतज्ज्ञ, विचारवंत आणि सूफींचे शिष्टमंडळही उपस्थित होते. ऑपरेशन सिंदूरमध्ये शहीद झालेल्या सैनिकांच्या कुटुंबियांना आणि जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानी हल्ल्यात मारल्या गेलेल्या नागरिकांना विशेष आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी संरक्षणमंत्र्यांकडे केली.
संरक्षणमंत्र्यांचे अभिनंदन करताना मुफ्ती कासमी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्याने पाकिस्तानमधील दहशतवादी अड्ड्यांवर मोठा हल्ला केला. या धाडसी कृतीमुळे भारताच्या रणनीती आणि सुरक्षा धोरणाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुक होत आहे. ऑपरेशन सिंदूरचा समावेश उत्तराखंड मदरसा बोर्ड त्यांच्या नवीन अभ्यासक्रमात समावेश करण्यामागचा उद्देश असा आहे की मदरशांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना देशाच्या लष्करी कामगिरी आणि राष्ट्रीय सुरक्षेची जाणीव व्हावी.
राजकीय नव्हे तर शैक्षणिक आणि राष्ट्रवादी भावनांनी प्रेरित निर्णय
मुफ्ती शामून कासमी पुढे म्हणाले की, अभ्यासक्रमात ऑपरेशन सिंदूरचा समावेश करण्यासाठी एक विशेष अभ्यासक्रम समिती स्थापन केली जाईल. या समितीमध्ये शिक्षणतज्ज्ञ, लष्करी इतिहासकार आणि मदरसा शिक्षण तज्ञांचा समावेश असेल. हा विषय कोणत्या वर्गात, कसा आणि किती खोलीत शिकवायचा हे समिती ठरवेल. हा निर्णय राजकीय नसून शैक्षणिक आणि राष्ट्रवादी भावनांनी प्रेरित असेल. मुलांना केवळ धार्मिक शिक्षणाबद्दलच नव्हे तर देशाच्या इतिहासाबद्दल, संस्कृतीबद्दल आणि समर्पणाच्या भावनेबद्दल देखील जागरूक करणे महत्वाचे आहे.