- मत्स्यव्यवसाय आणि बंदरेमंत्री नितेश राणे यांचे कडक निर्देश
02-May-2025
Total Views |
मुंबई: (investigation of illegal workers in the fisheries sector) “पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ‘सागरी मंडळा’च्या अखत्यारीत असलेल्या सर्व प्रकल्पांमध्ये तसेच बंदरे, जेट्टी आणि मत्स्यव्यवसायासाठी वापरल्या जाणार्या सर्व ठिकाणी काम करणारे कामगार तसेच, या जागेत वावर असणार्या सर्व व्यक्तींची सागरी सुरक्षा दलाने आणि महाराष्ट्र पोलिसांनी कसून चौकशी करावी,” असे निर्देश राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांनी दिले आहेत. बुधवार, दि. 30 रोजी आयोजित सागरी सुरक्षेबाबत आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत मंत्री नितेश राणे यांनी हे निर्देश दिले.
“महाराष्ट्राला विस्तीर्ण असा 720 किमीची समुद्र किनारपट्टी लाभली आहे. त्यावरील सर्व बंदरे, मच्छी व्यवसाय प्रकल्पांवर सुरक्षेबाबत पावले उचलावीत,” असे निर्देश वरिष्ठ प्रशासकीय अधिकार्यांच्या बैठकीत बोलताना मंत्री नितेश राणे यांनी दिले. तसेच, पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत सागरी सुरक्षा पोलीस महानिरीक्षक यांच्या कार्यालयाकडून कोणत्या प्रकारच्या खबरदारीच्या उपाययोजना सांगण्यात आल्या आहेत, याचा आढावा घेतला.
“सागरी सुरक्षेबाबत अधिक जागरूक आणि सजग राहण्यासाठी ‘सर्च ऑपरेशन’, ‘कोम्बिंग ऑपरेशन’ राबवून कामगारांच्या ओळखपत्रांची तपासणी, आधार कार्डची तपासणी इत्यादींची चौकशी करा,” अशा सूचनादेखील त्यांनी यावेळी दिल्या. यामध्ये विशेषतः ससून डॉक क्षेत्रामध्ये काम करणारे कर्मचारी, बोट चालक, फेरीवाले तसेच तिथे काम करणार्या सर्व व्यक्तींची चौकशी आणि तपासणी करण्याचे निर्देशही मंत्री नितेश राणे यांनी यावेळी दिले.
“बंदरे आणि समुद्र किनारपट्टीवर काम करणार्या सर्व कामगारांना पोलीस पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करावे. सर्व कामगारांनी ओळखपत्र बाळगावे, सर्व व्यक्तींची चौकशी करण्याबाबत तत्काळ नोटिसा संबंधित अधिकार्यांना पाठवण्यात याव्यात,” अशा सूचनादेखील मंत्र्यांनी यावेळी दिल्या.
“महाराष्ट्र सागरी मंडळा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गेटवे ऑफ इंडिया ते अलिबाग, तसेच गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा फेरी कामगारांमध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध बांगलादेशी नागरिक काम करत असल्याबाबतची माहिती असल्याने हा परिसर संवेदनशील आहे. त्यामुळे सागरी सुरक्षा पोलीस महानिरीक्षक तसेच कोकण विभाग पोलीस महानिरीक्षक आणि ‘महाराष्ट्र सागरी मंडळा’ने सर्वांची चौकशी आणि तपासणी करावी,” असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
सागरी सुरक्षेबाबत आढावा बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित करण्यात आली होती. ‘महाराष्ट्र सागरी मंडळ’, मुंबईचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीप, राज्याचे मत्स्यव्यवसाय आयुक्त किशोर तावडे, कोकण विभागाचे पोलीस महानिरीक्षक दराडे, सागरी सुरक्षा पोलीस महानिरीक्षक शारदा राऊत तसेच मुंबई पोर्ट झोनचे पोलीस उपायुक्त या बैठकीला ऑनलाईन उपस्थित होते.