मुंबई : (WAVE 2025 Summit) मध्ये ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी आपल्या उत्साही उपस्थितीने संमेलनात रंग भरले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कला आणि मनोरंजन क्षेत्रासाठी घेतलेल्या पुढाकाराचे त्यांनी विशेष कौतुक केले आणि या उपक्रमामुळे भारतीय कलाक्षेत्राला एक नवी दिशा मिळेल, असा विश्वासही व्यक्त केला.
यावेळी बोलताना अनुपम खेर म्हणाले, "हे शिखर संमेलन ऐतिहासिक ठरणार आहे. कारण हे मंच भविष्यात लेखक, अभिनेते, दिग्दर्शक आणि सर्जनशील विचारवंतांना एकत्र आणणार आहे. पंतप्रधान मोदींनी कला व संस्कृती क्षेत्रासाठी घेतलेली ही भूमिका अभिनंदनीय आहे." याच भाषणात त्यांनी बॉलीवूड आणि साऊथ इंडस्ट्रीबाबतही सकारात्मक मत व्यक्त केलं. ते म्हणाले, “भारतीय चित्रपटसृष्टी ही केवळ मुंबईपुरती मर्यादित राहिलेली नाही. सध्या साऊथ इंडस्ट्री अतिशय ताकदीनं पुढे आली आहे. त्यांच्या कथा, तंत्रज्ञान आणि अभिनय यात प्रचंड ताकद आहे. याचा प्रभाव संपूर्ण देशावर पडतो आहे. बॉलीवूडने देखील यामधून शिकण्यासारखं खूप काही आहे.”
ते पुढे म्हणाले, “आपण एकत्र आलो, तर भारतीय सिनेमाचं जागतिक स्थान अधिक भक्कम होईल. भेद न करता, सर्जनशीलता केंद्रस्थानी ठेवून काम केल्यास भारत हा एक सिनेमा पॉवरहाऊस म्हणून उभा राहील.” WAVE 2025 मध्ये देशभरातील कलावंत, लेखक, संगीतकार, निर्माते आणि धोरणकर्ते एकत्र येऊन भारतीय कलासंस्कृतीचा विकास आणि भविष्य यावर चर्चा करत आहेत. अनुपम खेर यांच्या स्पष्ट आणि प्रेरणादायी वक्तव्यामुळे या मंचाला एक प्रगल्भ आणि व्यापक दृष्टिकोन लाभला आहे.