‘रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी’ आयोजित दोनदिवसीय समाजमाध्यम साहित्य संमेलनात समाजमाध्यम, अभिव्यक्ती, समाजमन अशा वेगवेगळ्या विषयांवर सृजनसंवाद घडला. या साहित्य संमेलनाचा थोडक्यात घेतलेला मागोवा...
साहित्य संमेलन म्हटले की, नजरेसमोर येते एक भव्य व्यासपीठ. त्या व्यासपीठावर विराजमान झालेली साहित्यिकांची मांदियाळी. काहीशी विचार प्रवर्तक, तर काहीशी लांबलेली भाषणे आणि या सगळ्यानंतर होणारी कुरबूर, समाजमाध्यमांवर होणारे वादविवाद. मागील काही वर्षांपासून राष्ट्रीय पातळीवर घडणार्या साहित्य संमेलनाने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले. साहित्य संमेलन आणि राजकीय तथा अराजकीय वादविवाद ही तर जणू ठरलेलीच गोष्ट. परंतु, मराठी मनाची आणि जनमानसाच्या अभिव्यक्तीची व्यापकता लक्षात घेता, केवळ एका साहित्य संमेलनात हे साकार होईल, असे नाही. आजमितीला 100 पेक्षा जास्त साहित्य संमेलने आपल्या राज्यात भरत असतात. वेगवेगळ्या विचारांची, लिखाणाची, मांडणी या सगळ्या संमेलनांच्या व्यासपीठावर होत असते. परंतु, या सगळ्या मांडणीला छेद देत भाईंदरच्या उत्तन गावातील ‘केशवसृष्टी’ येथे एक नवीन प्रयोग साकारण्यात आला. ‘केशवसृष्टी’च्या ‘रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी’च्या संकुलात, ‘आभासातून प्रत्यक्षाकडे...’ समाजमाध्यम साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. समाजमाध्यमे तथा समाजमाध्यमांवरील अभिव्यक्ती याकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन या दोनदिवसीय साहित्य संमेलनातून श्रोत्यांना-वाचकांना मिळाला.
तंत्रज्ञानाच्या आगमनामुळे भारतामध्ये माध्यमांचे लोकशाहीकरण झाले. काही मूठभर लोकांची, गटांची मक्तेदारी ज्या माध्यमांवर होती, त्यांव्यतिरिक्त आता सामान्य माणसेसुद्धा व्यक्त व्हायला लागली. फेसबुक, ट्विटर यांसारख्या माध्यमांमुळे एकाचवेळी कोट्यवधी लोकांच्या संपर्कात येणे शक्य झाले. लोकांना जोडत असताना, विविध समाजाभिमुख उपक्रम लोकांनी, लोकांसाठी करायला सुरुवात केली. ग्रामपंचायत पातळीवर आपल्या समस्यांच्या निवारणासाठी तयार केलेले व्हॉट्सअॅप, फेसबुक ग्रुप असो किंवा वाचन कट्टा, कवी कट्टा यांसारखे उपक्रम. समविचारी लोकांना एकत्र आणण्यामध्ये या समाजमाध्यमांची खूप महत्त्वाची आणि मोलाची भूमिका कदापि नाकारता येणार नाही. दुसर्या बाजूला, यात समाजमाध्यमांची लागणारी चटक, त्यातून उद्भवणारे दुष्परिणाम हेही ओघाने आलेच. परंतु, ही चौथी औद्योगिक क्रांती भारतासारख्या देशाला विकासाच्या मार्गावर गतिमान करणारी होती, हे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
समाजमाध्यम साहित्य संमेलनाची निर्मिती करताना, मुळातच आयोजक आणि समन्वयकांकडून एक सकारात्मक भूमिका मांडण्यात आली होती. सोशल मीडियाचे दुष्परिणाम, वाढणारा स्क्रीनटाईम यावर जागोजागी विचारविमर्श होताना आपल्याला बघायला मिळते. परंतु, आपल्या अभिव्यक्तीसाठी या समाजमाध्यमांचा प्रभावी वापर कशाप्रकारे करता येईल, समाजमांध्यमातून एक व्यक्ती अर्थार्जन कशा प्रकारे करू शकेल, याबद्दलचे प्रबोधन लोकांना व्हावे, या विचाराने या संमेलनाची आखणी करण्यात आली होती. राज्यसभेचे माजी खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी या साहित्य संमेलनात आपली भूमिका मांडताना वर्तमानातल्या समाजमनाची नसच ओळखली की काय, असे वाटावे इतकी प्रगल्भ मांडणी त्यांनी केली. समाजमाध्यम म्हणजे उत्कटतेचा उत्सव आहे. परंतु, त्याच्या पलीकडे आपली समाजमाध्यमे म्हणजे मूलभूत मांडणीचे व्यासपीठ व्हावे, केवळ प्रतिक्रियावादी न राहता, कृतिशीलपणे समाजमन या व्यासपीठावर एकत्र कसे येईल, याचा विचार व्हावा, हे त्यांनी श्रोत्यांना सांगितले. अभिरुचीचे संस्कार एकेकाळी सहजरित्या घरांमधून विद्यार्थ्यांना मिळत असत. परंतु, बदलत्या जीवनशैलीमुळे आस्वाद घेण्याची कला आपण हरवून बसलो. त्या कलेचे आणि जाणिवांचे पुनरुज्जीवन कशा प्रकारे करता येईल, हा विचार त्यांनी मांडला.
दोन दिवसांच्या या साहित्य संमेलनाच्या वातावरणात एक मोकळेपणा होता, अगदी तसाच मोकळेपणा समाजमाध्यमांनी आपल्याला प्रदान केला आहे. विविध विषयांचा आढावा घेणारी चर्चासत्रे, त्यामध्ये होणारी मांडणी यांमध्ये विचारांची स्पष्टता नजरेस येत होती. नेमकेपणाचा हा संवाद ही या साहित्य संमेलनाची जमेची बाजू. समाजमाध्यमांचे जग आभासी आहे. परंतु, या आभासी माध्यमातूनच खरी माणसे जोडली जातात. कधी एखाद्या परिवर्तनशील चळवळीला सुरुवात होते, तर कधी गरजू लोकांपर्यंत संसाधने पोहोचवली जातात. अभिव्यक्तीचा आविष्कार आणि अभिव्यक्तीचा जागर एकाच वेळी उपस्थित श्रोत्यांना अनुभवायला मिळाला. व्यक्तीच्या उत्थानासोबतच, समाजमनाच्या पुनरुत्थानाचा विचारसुद्धा इथे मांडण्यात आला.
आपल्या भोवताली आपण विचारांची लढाई रोज बघतोय. या विचारांच्या लढाईसाठी व्यक्तीने तसेच समाजाने कशा प्रकारे तयारी करायला हवी, या वैचारिक संघर्षाचा आशय, त्या संघर्षातून तयार होणारे समाजमन याबद्दल एक प्रगल्भ मांडणी या संमेलनात बघायला मिळाली. राष्ट्रविचारांची, राष्ट्रवादाची मांडणी करणार्या लोकांबद्दल एक नकारात्मक प्रतिमा जाणीवपूर्वक समाजमाध्यमांवर तयार केली जाते. यामागचे वास्तव नेमके काय आहे, ‘नॅरेटिव्ह’चे महत्त्व काय, अशा विषयांना हात घालत खर्या अर्थाने ‘आभासातून प्रत्यक्षाकडे’ या साहित्य संमेलनाने प्रवास केला. ‘सज्जनांची मांदियाळी’ किंवा ‘झुंड’ ही खर्या अर्थाने एकत्र आली पाहिजे, हा ओंकार दाभाडकर यांनी मांडलेला हा विचार सुरुवातीला गमतीशीर वाटला; परंतु खोलात जाऊन विचार केल्यास असे लक्षात येईल की, समाजमन कलुषित करणारी, विद्ध्वंस माजवणारी टोळी एकत्र येऊन लोकांमध्ये दहशत पसरवत असते आणि दुर्दैवाने आपल्या कामात ती माणसे यशस्वी होतात. अशा वेळी सज्जनांनी एकत्र येऊन आपली भूमिका ठामपणे का मांडू नये? एखाद्या सकारात्मक ती कार्यक्रमात का सहभागी होऊ नये? हा विचार मनात आला.
भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन, मानपान आणि अनेक दिवस चालणारे साहित्य संमेलन यांपेक्षा दोनच दिवसांच्या कालावधीत प्रगल्भ मांडणी करणार्या लोकांना मिळालेले व्यासपीठ अधिक सयुक्तिक आहे, याची प्रचिती या समाजमाध्यम साहित्य संमेलनातून आली.
एकूणच या आगळ्या-वेगळ्या समाजमाध्यम साहित्य संमेलनाविषयी विचार करताना असे लक्षात येते की, समाजमाध्यमांनी ’साहित्य’ या अविष्काराची व्याप्ती वाढवली आहे. दुसर्या बाजूला, समाजमाध्यमांवर लिहू लागल्यामुळे, मूळ संदर्भांचा शोध घेणे, हेदेखील तितकेच गरजेचे झाले आहे. या साहित्य संमेलनाच्या समारोपादरम्यान नाटककार अभिराम भडकमकर असे म्हणाले की, “समाजमाध्यमांमुळे मंथनयुगाची सुरुवात झाली. या मंथनयुगाची प्रचिती प्रत्येकालाच येत असते.” समाजमाध्यमांच्या समुद्रात वावरताना, अशा प्रकारे आयोजित केलेले समाजमाध्यम साहित्य संमेलन होकायंत्राचे काम करेल, यात शंका नाही.
गोष्ट इथे संपत नाही!
‘रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी’ आयोजित समाजमाध्यम साहित्य संमेलनाचा आकर्षणबिंदू ठरलेला कार्यक्रम म्हणजे ‘गोष्ट इथे संपत नाही.’ छत्रपती शिवाजी महाराजांच्या दक्षिण दिग्विजयाची विजयगाथा सांगणार्या या कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. अवघ्या हिंदुस्थानाचे राष्ट्रदैवत असणार्या शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष या कार्यक्रमातून उलगडत गेली. सारंग भोईरकर आणि सारंग मांडके या दोन तरुणांनी शिवछत्रपतींच्या दक्षिण दिग्विजयाची यशोगाथा अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडली. निवेदनात्मक पद्धतीने इतिहासातील अत्यंत गुंतागुंतीचे प्रसंग, तथा परकीय शासकांनी शिवकालाविषयी केलेल्या नोंदी लोकांपर्यंत अत्यंत सहजरित्या पोहोचवले गेले. या सादरीकरणाचे यश म्हणजे या निवेदनालासुद्धा स्वतःची एक विशिष्ट लय आहे. ही लय सांभाळून, घटनांची आणि घटितांची अत्यंत तपशीलवार मांडणी श्रोत्यांना अनुभवायला मिळते. इतिहास आणि ऐतिहासिक घटना यांवर सध्या समाजमनात वेगवेगळ्या प्रकारची चर्चा आपल्याला अनुभवायला मिळते. परंतु, या चर्चेच्या मागे, काही एक विचारांची, अध्यापनाची पक्की बैठक आहे, हा प्रश्न बर्याचदा विचारात घ्यायचा राहून जातो. अशा या काळात ‘गोष्ट इथे संपत नाही’ या कार्यक्रमाची आवश्यकता लक्षात येते. जास्तीत जास्त तरुणांनी, अभ्यासकांनी हा कार्यक्रम बघायला हवाच. त्याचसोबत, सप्रमाण इतिहासाची मांडणी, तसेच अपरिचित ऐतिहासिक वास्तूंची भेट किती आवश्यक आहे, याचेसुद्धा महत्त्व लक्षात घ्यायला हवे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून इतिहासाचे एक समृद्ध दालन श्रोत्यांसमोर खुले केले जाते आणि त्या दालनात प्रवेश करून, नित्य नूतन गोष्टींचा शोध घ्यावासा वाटत राहतो, हेच या सादरीकरणाचे यश आहे.
मुकुल आव्हाड
9967826983