श्री श्रृंगेरी शारदापीठाचे तेहेतीसावे आचार्य जगद्गुरू श्री सच्चिदानंद शिवाभिनव नृसिंह भारती महास्वामीजी यांनी एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस आद्य शंकराचार्यांचे जन्मस्थळ असलेल्या केरळमधील कालडी क्षेत्राचा शोध लावला. पुढे 1910 साली कालडी येथे श्री आद्य शंकराचार्यांच्या मंदिराची प्राणप्रतिष्ठाही संपन्न झाली. आज आद्य शंकराचार्य यांच्या जयंतीनिमित्ताने कालडी जन्मस्थानाच्या शोधामागची कथा सांगणारा हा लेख...
भारतीय आस्तिक दर्शनपरंपरेत वेदांत किंवा उत्तर मीमांसा दर्शनाला विशेष स्थान आहे. महर्षी बादरायण प्रणित ब्रह्म अथवा वेदांत सूत्रे, उपनिषद आणि श्रीमद्भगवद्गीता या प्रस्थानत्रयीवर वेदांत दर्शन आधारलेले आहे. ऐतिहासिकदृष्ट्या इ. स. नवव्या शतकात अद्वैतमतप्रवर्तक जगद्गुरू श्री आद्य शंकराचार्य यांनी या प्रस्थानत्रयीवर सर्वप्रथम भाष्ये रचली. श्री आद्य शंकराचार्य यांनी आपल्या अवघ्या 32 वर्षांच्या अल्पायुषात विपुल ग्रंथसंपदेची निर्मिती केली. भारताच्या चार दिशांमध्ये चार ‘आम्नाय’ किंवा वैदिक मठांची स्थापना हेदेखील आचार्यांचे अत्यंत विधायक असे योगदान होते. आचार्यांच्या कालखंडाबद्दल तसेच त्यांनी स्थापन केलेल्या मठांच्या संदर्भात अनेक मतमतांतरे आहेत. पण, एक गोष्ट निश्चित आहे की, त्यांचा जन्म केरळमधील पूर्णा नदीच्या (आजची पेरियार नदी) तटावर असलेल्या कालडी या गावी वैशाख शुक्ल पंचमी या दिवशी एका नंबुद्री ब्राह्मण कुटुंबात झाला.
त्यांच्या मातापित्यांचे नाव होते आर्याम्बा आणि शिवगुरू. दुर्दैवाने आचार्यांच्या तिरोभावानंतर त्यांचे हे जन्मस्थान विस्मृतीत गेले. एवढेच नव्हे तर काही मठांचा अपवाद वगळता, भारतीय जनमानसाला खुद्द आचार्यांचा आणि त्यांच्या अतुलनीय कार्याचादेखील विसर पडला. अशा परिस्थितीत आद्य शंकराचार्य यांनी स्थापन केलेल्या श्री श्रृंगेरी शारदापीठाचे तेहेतीसावे आचार्य जगद्गुरू श्री सच्चिदानंद शिवाभिनव नृसिंह भारती महास्वामीजी यांनी एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस कालडी क्षेत्राचा शोध लावला. श्री सच्चिदानंद शिवाभिनव नृसिंह भारती महास्वामीजी यांनी सनातन धर्माच्या उत्थानाकरिता शंकर जयंती उत्सवाचा प्रारंभ केला. त्यांच्या अनेक विजययात्रांमध्ये महास्वामीजींच्या असे लक्षात आले की, भारतीय लोकांना आद्य शंकराचार्य आणि त्यांचे बहुमोल कार्य या दोन्हींचे विस्मरण झाले आहे.
श्री आद्य शंकराचार्य आणि त्यांचे उत्तुंग कार्य सर्व आस्तिकांमध्ये पुनरुज्जीवित करण्याचा प्रण महास्वामीजींनी केला. याकरिता सर्वप्रथम महास्वामीजींनी श्री आद्य शंकराचार्य यांच्या जन्मस्थानाचा शोध घेण्याचा निर्धार केला. सनातन धर्मात अयोध्या प्रभू श्रीरामांचे जन्मस्थान, तसेच मथुरा हे भगवान श्री वासुदेव कृष्णांचे जन्मस्थान म्हणून ओळखले जाते. परंतु, श्री आद्य शंकराचार्य यांचे जन्मभूमीचे स्थान निश्चितपणे सांगता येत नव्हते. श्रृंगेरीमठाचे बारावे आचार्य जगद्गुरू श्री विद्यारण्य महास्वामीजी यांनी इ. स. चौदाव्या शतकात ‘माधवीय शंकर दिग्विजय’ हा श्री आद्य शंकराचार्य यांच्यावरील चरित्रग्रंथ रचला. यात स्पष्ट उल्लेख आहे की, श्री आद्य शंकराचार्य यांचा जन्म पूर्णा नदीच्या तटावर वसलेल्या कालडी नामक गावी झाला. इतर चरित्रग्रंथांमध्येदेखील श्री आद्य शंकराचार्य यांचे जन्मस्थान म्हणून कालडीचाच उल्लेख सापडतो. इ. स. आठव्या शतकात कालडी हे एक अग्रहार आणि विद्येचे केंद्र होते. कालडीच्या परिसरात अनेक महत्त्वाची मंदिरे होती. जसे त्रिचूरचे वडकनाथ स्वामी मंदिर आणि माणिकमंगलचे दुर्गा मंदिर. श्री आद्य शंकराचार्य यांचे वडील शिवगुरू या दुर्गामंदिरात पुजारी होते, असे म्हटले जाते.
कालडीच्या शोधाबद्दल पुढे चर्चा करण्याआधी थोडे श्रृंगेरीमठाचे तेहेतीसावे जगद्गुरू श्री सच्चिदानंद शिवाभिनव नृसिंह भारती महास्वामीजी यांच्या दिव्य जीवनाबद्दल थोडे जाणून घेऊया. महास्वामीजी आणि आद्य शंकराचार्य यांच्या जीवनामध्ये अनेक साम्यस्थळे होती आणि म्हणूनच महास्वामीजींना ‘अभिनव शंकर’ असेही म्हटले जाते. दोघांचेही पितृछत्र त्यांच्या लहानपणीच हरपले. दोघांनाही त्यांच्या गुरूंकडून संन्यास दीक्षा त्यांच्या वयाच्या आठव्या वर्षी प्राप्त झाली. दोघेही जीवनमुक्त लोकोत्तर गुरू. महास्वामीजींचा जन्म दि. 11 मार्च 1858 रोजी म्हैसूर येथे झाला. त्यांचे वडील शतकोटी रामशास्त्री जे ‘कुणीगळ रामशास्त्री’ म्हणूनदेखील ओळखले जात. हे त्या काळातले अत्यंत नावाजलेले संस्कृत विद्वान होते. महास्वामीजींचे पूर्वायुष्यातील नाव होते शिवस्वामी. वडिलांच्या पश्चात शिवस्वामी यांना त्यांच्या थोरल्या भावाने वाढवले आणि त्यांचा उपनयन संस्कारदेखील केला.
महास्वामीजींच्या संन्यास स्वीकारानंतर त्यांनी त्यांचे गुरू श्री नृसिंह भारती महास्वामीजी (श्रृंगेरी मठाचे बत्तीसावे आचार्य) यांच्या सान्निध्यात 12 वर्षे दक्षिण भारताची विजययात्रा संपन्न केली. त्यांच्या गुरूंच्या कैवल्यप्राप्तीनंतर ते श्रृंगेरीमठाचे तेहतीसावे आचार्य म्हणून व्याख्यान सिंहासनावर विराजमान झाले. महास्वामीजींनी अनेक वर्षे घोर तप केले. अनेक लोकांपर्यंत त्यांनी उपनिषदांतील गहन तत्त्वज्ञान पोहोचविले. त्यांनी उत्तर भारताचीदेखील विजययात्रा संपन्न केली. ही यात्रा करताना महस्वामीजींना असे लक्षात आले की, भारतीय आस्तिकांना आद्य शंकराचार्य यांच्या जीवनाचा आणि योगदानाचा विसर पडला आहे. त्यांच्या अलौकिक जीवनाची आणि कार्याची स्मृती पुन्हा जागृत करण्याकरिता महास्वामीजींनी ‘शंकर जयंती’ महोत्सवास प्रारंभ केला. हा महोत्सव पाच दिवस साजरा केला जात असे आणि आजही श्रृंगेरीमठात तो तितक्याच श्रद्धेने आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने साजरा करण्यात येतो. या उत्सवादरम्यान श्री आद्य शंकराचार्य यांचे पूजन होत असे आणि त्यांच्या भाष्यांचे पारायण होत असे. संध्याकाळी महास्वामीजी स्वतः अद्वैत वेदांत दर्शनावर अनुग्रह भाषणे देत असत. हे सर्व करत असताना महास्वामीजींच्या मनात असा विचार आला की, आद्य शंकराचार्य यांचे एक मंदिर बांधले गेले पाहिजे आणि तेही त्यांच्या जन्मस्थानावर!
श्री आद्य शंकराचार्य यांच्या जन्मस्थानाचे नाव कालडी तर निश्चित होते, पण त्याचे अचूक भौगोलिक स्थान मात्र माहीत नव्हते. याच सुमारास ‘म्हैसूर संस्थाना’चे दिवाण के. शेषाद्री अय्यर महास्वामीजींचे दर्शन घेण्याकरिता श्रृंगेरीला आले. महास्वामीजी यांनी त्यांना श्री आद्य शंकराचार्य यांचे जन्मस्थान शोधण्याचे कार्य सुपूर्द केले. अय्यर यांना मलबार प्रांतात कालडी नाव असलेली तीन खेडी सापडली. या तीन खेड्यांमध्ये एर्नाकुलम जवळ असलेले कालडी हेच श्री आद्य शंकराचार्य यांचे जन्मस्थान असल्याचे निश्चित करण्यात आले. कारण, हे गाव पूर्णा किंवा आधुनिक पेरियार नदीच्या तटावर होते. शंकर दिग्विजयातील वर्णनाबरोबर या गावाचे स्थान तंतोतंत जुळत होते. श्री आद्य शंकराचार्य यांच्या जन्मस्थानचा शोध लागल्यामुळे महास्वामीजींना अतिशय आनंद झाला. श्रृंगेरीमठाने लगेच कालडी येथे थोडी जमीन विकत घेतली.
त्याचबरोबर महास्वामीजींनी ‘त्रावणकोर संस्थान’चे दिवाण सर व्ही. पी. माधवराव आणि श्रृंगेरीमठाचे प्रतिनिधी ए. रामचंद्र अय्यर यांना कालडी येथे धाडले. या गावात श्री आद्य शंकराचार्य यांच्याशी निगडित काही मौखिक परंपरा होत्या. त्यातील एक म्हणजे, ‘क्रोकोडाईल घाट.’ असे म्हटले जाते की, एका मगरीने श्री आद्य शंकराचार्य आठ वर्षांचे असताना त्यांचा पाय पकडला आणि शेवटी त्यांच्या मातेने म्हणजेच आर्याम्बा यांनी त्यांना संन्यास घेण्याची परवानगी दिल्यावरच त्या मगरीने आद्य शंकराचार्य यांना मुक्त केले. हा प्रसंग या ठिकाणी घडल्याचे मानण्यात येते.
तसेच आर्याम्बा यांचा अंत्यसंस्कार जेथे करण्यात आला होता, तेथे एक दगडी दिवा अखंड तेवत असे. कालडी येथे असलेल्या श्रीकृष्णांच्या मंदिराचे स्थानदेखील ‘माधवीय शंकर दिग्विजय’ यातील वर्णनाशी हुबेहूब जुळत होते. या सर्व गोष्टींमुळे कालडी हेच आद्य शंकराचार्य यांचे जन्मस्थान आहे, यास दुजोरा मिळाला. याव्यतिरिक्त पूर्णा नदी आणि श्रीकृष्ण मंदिर यांच्या भौगोलिक स्थानांच्याआधारे आद्य शंकराचार्य यांचे कालडीमध्ये असलेल्या निवासस्थानाच्या जागेचादेखील शोध लावण्यात आला.
कालडीचे पुनरुज्जीवन होण्याकरिता ‘त्रावणकोर संस्थाना’ची मोठी भूमिका होती. या संस्थानचे शासक श्रृंगेरीमठाच्या आचार्यांना गुरूस्थानी मानत. इ. स. 1904 मध्ये ब्रिटिश सरकारने ‘ढहश अपलळशपीं चेर्पीाशपीीं झीशीर्शीींरींळेप अलीं’ हा कायदा लागू केला. यामुळे श्री आद्य शंकराचार्य यांच्या जन्मस्थानाचे संवर्धन करण्यास मदत झाली.
याच सुमारास ‘त्रावणकोर’चे दिवाण आणि श्रृंगेरीमठाचे सर्वाधिकारी यांनी ‘त्रावणकोर संस्थान’चे राजे महाराजा मूलं थिरुणाल यांची भेट घेऊन श्रृंगेरीच्या जगद्गुरूंचा मानस त्यांना कळवला. महाराजा मूलं थिरुणाल यांनी स्वतः त्यांच्या संस्थानात पुरातन वास्तूंच्या जतनाकरिता एक कायदा अमलात आणला आणि श्रृंगेरीमठाला सर्वपरीने साहाय्य करण्याचे आश्वासन दिले. कालडी येथे भूमी मिळवण्याकरिता श्रृंगेरीमठाला ‘त्रावणकोर संस्थाना’ने मोठ्या स्तरावर साहाय्य केले. श्री सच्चिदानंद शिवाभिनव नृसिंह भारती महास्वामीजी यांनी कालडी येथे श्री आद्य शंकराचार्य आणि भगवती शारदाम्बा यांची मंदिरे बांधण्याकरिता आदेश दिले.
इ. स. 1910 मध्ये महास्वामीजी कालडी जवळ असलेल्या पेरुम्बवूर नावाच्या गावी पोहोचले. इथल्या वास्तव्यादरम्यान त्यांच्या स्वप्नात एक दिव्य वृद्ध माता आल्या आणि त्यांनी महास्वामीजींना असे सांगितले की, त्या एका वृक्षाखाली निवास करतात आणि त्यांनी महास्वामीजींना तेथे बोलावले. महास्वामीजींच्या लक्षात आले की, या साक्षात आर्याम्बा होत्या आणि तो वृक्ष म्हणजे एक अशोक वृक्ष होता, ज्याच्याखाली आर्याम्बा यांचा अंत्यसंस्कार श्री आद्य शंकराचार्य यांनी केला होता. कालडी येथील मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या दहा दिवस आधी ते त्या वृक्षाकडे गेले आणि तेथे साष्टांग नमस्कार करून वृक्षाची प्रदक्षिणा केली. तेथे एक दगडी दिवा तेवत होता.
माघ शुक्ल द्वादशी म्हणजेच दि. 21 फेब्रुवारी 1910 रोजी कालडी येथे भगवती शारदाम्बा आणि श्री आद्य शंकराचार्य यांच्या मंदिरांची प्राणप्रतिष्ठा संपन्न झाली. या उत्सवाकरिता स्वतः महास्वामीजी हजर होते. या दोन्ही मंदिरांचे स्थापत्य हे उपनिषदांतील तत्त्वांवर आधारलेले आहे. त्याचदिवशी महास्वामीजींच्या पुढाकाराने श्री आद्य शंकराचार्य यांच्या समग्र वाङ्मयाचे पहिले दहा खंड प्रकाशित करण्यात आले. या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने महास्वामीजींनी काही स्तोत्रांचीदेखील रचना केली.
इ. स. 2010 मध्ये कालडी येथील दोन्ही मंदिरांच्या प्राणप्रतिष्ठेला 100 वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने श्रृंगेरीमठाने कालडीच्या शोधाचा इतिहास सांगणारी एक डॉक्युमेंटरी प्रसिद्ध केली होती. तिचे नाव आहे ‘घरश्ररवू: ढहश ढीर्ळीाहि ेष ऋरळींह र्ेींशी ढळाश.’ त्याचबरोबर श्रृंगेरीमठाचे छत्तीसावे आचार्य जगद्गुरू श्री भारती तीर्थ महास्वामीजींनी श्री आद्य शंकराचार्य आणि श्री सच्चिदानंद शिवाभिनव नृसिंह भारती महास्वामीजी यांची महती सांगणारे एक संस्कृत स्तोत्र रचले. या स्तोत्राला ‘गुरुद्वय अभेदानुसन्धानम्’ असे म्हटले जाते. या स्तोत्रात श्री सच्चिदानंद शिवाभिनव नृसिंह भारती महास्वामीजी हे आद्य शंकराचार्य यांचेच अवतार होते, असे सांगण्यात आले आहे.
कालडीचा शोध हे भारतीय इतिहासातील एक सोनेरी पान आहे. आस्तिकांना जसे अयोध्या आणि मथुरा प्रार्थनीय आहेत, तसेच कालडीदेखील पूजनीय आहे. ‘शंकर जयंती’ महोत्सवाचे औचित्य साधून भगवती शारदाम्बा, श्री आद्य शंकराचार्य आणि श्रृंगेरीमठाची अविच्छिन्न गुरूपरंपरा यांना वंदन करून त्यांची कृपा संपादन करू या!
- स्नेहा नगरकर